शेतातील भाजी थेट घरापर्यंत पोहोचवण्याच्या सरकारी पातळीवरील प्रयोगाला अद्याप यश आले नसले तरी मळ्यातली हिरवीगार तरकारी शहरातील अनेक सहकारी सोसायटय़ा आणि कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचवण्याच्या आशा नव्याने ताज्या झाल्या आहेत. ठाणे कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून तसा प्रस्ताव तयार केला आहे. ६५ गृहसंकुलांमधील नागरी संघटनांसोबत विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. यासंदर्भात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केला जाणारा मर्यादित स्वरूपातील प्रयोग वगळता रानातील रसरशीत भाजी शहरातील मध्यमवर्गीयांच्या घरांपर्यंत पोहोचलेली नाही. ठाणे कृषी विभागाने या प्रयोगाला अजून विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांत पिकवली जाणारी भाजी शहरवासीयांना थेट पुरवण्यासाठी एक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यासाठी काही वसाहतींनीही यात सहभागी होण्याचे ठरवले आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाली की ठाणे जिल्ह्य़ासोबत पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनाही विविध शहरांमध्ये भाजी विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.ठाणे कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत याविषयी चर्चा झाली. येत्या ऑक्टोबरनंतर ही योजना प्रत्यक्ष कार्यरत होऊ शकेल, अशी माहिती ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. योजनेनुसार गृहसंकुलांशी शेतकऱ्यांनी करार केल्यानंतर त्यांना ५० टक्के अनुदानाची सोयही कृषी विभागाकडून केली जाणार आहे. शेतात चांगले पीक आहे, पण चांगला भाव नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था असते. दर वेळी दलालच नफ्यावर डल्ला मारत असतो. पाच पैशाच्या हिशेबाला रुपयाचे तेल जाळण्याची वेळ आजवर शेतकऱ्यांवर आल्याची ओरडही सातत्याने केली जाते. दलालीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात या घाऊक दरातील भाज्या स्वस्त दरात मिळत असूनही किरकोळ बाजारात त्या महाग मिळतात. याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत.आरंभशूर नकोमोठमोठय़ा शब्दांत महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करायच्या. सुरुवातीला काही प्रमाणात प्रतिसाद मिळवायचा आणि नंतर मात्र ग्राहकांअभावी उपक्रमच बंद करायचा, असे अनेक प्रकार याआधी घडले आहेत. यातून धडा घेऊन कृषी विभागाने यासंबंधीचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. गृहसंकुलांशी करार करून भाजी विकण्याची परवानगी घ्यावी, अशी अट शेतकऱ्यांना घालण्यात येणार आहे. थेट गृहसंकुलाशी असे करार करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला आणि शेतमालाच्या लागवडीसाठी ५० टक्के सरकारी अनुदान मिळेल. शेतमालाच्या वाहतुकीसाठी सुमारे दोन लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्याच बरोबर विक्री साहित्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे, असे कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी सांगितले.उपक्रमाची वैशिष्टय़े* भाजी उत्पादक शेतकरी गट आणि गृहसंकुल यांच्यामध्ये विक्रीसाठी करार करण्यात येईल.* ठाणे शहरातील ६५ गृहसंकुलांनी यास परवानगी दिली आहे.* करार करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य कृषी विभागाकडून केले जाणार आहे.* शेतमाल थेट गृहसंकुलाच्या प्रांगणात उतरवून त्याची शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.* शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि ग्राहकांना स्वस्थ भाजी यामुळे मिळू शकणार आहे.* कृषी क्षेत्रातील दलाली यामुळे बंद होऊ शकणार आहे.