गणेश घाट, डोंबिवली (प.) डोंबिवलीत जी काही मोजकी मोकळ्या हवेची ठिकाणे आहेत, त्यात पश्चिमेकडच्या गणेश घाटाचा समावेश होतो. हा परिसर रम्य असला तरी इथे अनेक समस्या असल्याने इथे फेरफटका मारायला येणारी मंडळी नाराज आहेत. प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. शहरीकरणाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे ठाणे-डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये मोकळ्या हवेची ठिकाणे क्वचितच दृष्टीस पडतात. डोंबिवली पश्चिम भागात असलेल्या मोठा गाव परिसरातील गणेश घाट त्यापैकी एक. इथे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मूर्ती विसर्जन केले जाते. पश्चिमेला राहणाऱ्या डोंबिवलीकरांना प्रभातफेरीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याने डाव्या बाजूला वळताच प्रभातफेरीसाठी आलेले नागरिक काही समूहाने तर काही एकटेच चालताना दिसतात. येथे येणारी प्रत्येक व्यक्ती गणेश घाटापासून मुख्य मार्गाकडे आणि मुख्य मार्गापासून गणेश घाटाकडे अशा जेमतेम पाच ते सहा फेऱ्या मारतात. अनेक जण येथे असलेल्या कट्टय़ालगत व्यायाम करताना, तर महिलावर्ग येथील बाकांवर गप्पा मारताना दिसतो. काँक्रीटचे जंगल असलेल्या डोंबिवली शहरात ही जागा मोकळी आहे, मात्र त्याव्यतिरिक्त इथे कोणत्याही सुविधा नाहीत. इथे लांबून येणाऱ्या पर्यटकांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. सर्व वयोगटांतील महिला आणि पुरुष इथे फिरायला किंवा व्यायाम करायला येतात. शहरात अनेक ठिकाणी आता ‘ओपन जिम’ची सुविधा आहे. इथे मात्र व्यायाम करण्याची कोणतीही साधने नाहीत. महापालिका प्रशासनाने तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी तशी सुविधा इथे उपलब्ध करून द्यावी. किमान डबल बार तरी उभारावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. इथे फिरायला येणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. प्रसाधनगृहाअभावी त्यांची गैरसोय होते. त्यामुळे इथे स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत. गणेश घाट परिसरात प्रभातफेरीसाठी लोक वापरत असलेला मार्ग अगदीच अरुंद आहे अशातच अनेक शिकाऊ वाहनचालक याच मार्गावर सरावासाठी येत असल्याने या मार्गावरून फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांना याचा भरपूर त्रास होतो. काही अतिउत्साही तरुण या रस्त्यावर भरधाव गाडय़ा चालवीत असतात. विसर्जनानंतर या गणेश घाटावर घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. एकूणच परिसर रम्य असला तरी किमान सुविधा नसल्याने रहिवाशांची गैरसोय होते. प्रभात फेरीसाठी या ठिकाणी अनेक लोक येतात. त्यामध्ये साधारण ३० ते ४० टक्के महिला आहेत. येथे स्त्रियांसाठी प्रसाधनगृह नाही. त्यामुळे त्यांची अडचण होते. याच कारणाने इथे महिला येण्यास टाळाटाळ करतात. स्वच्छतागृहाची सोय झाल्यास रहिवाशांची सोय होईल - किशोर देसाई, नागरिक आम्ही दररोज सकाळी येथे प्रभात फेरीसाठी येतो, जेणेकरून आम्हाला ताजेतवाने वाटेल. मात्र इथे असलेली घाण पाहून आमचा भ्रमनिरास होतो. येथे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जर येथे सफाई कामगार असतील तर हा परिसर स्वच्छ राखायला मदत होईल - विजय तेजे, नागरिक