कळवा रेतीबंदर परिसरातील हप्तेखोरी उघड; पक्के घर करण्यासाठी शिवसेना नेत्याला ‘अर्थ’ नैवेद्य गेल्या काही दिवसांपासून शहरातील बेकायदा डान्स बार, लॉज, गॅरेजेस्, हुक्का पार्लरवर धडाक्यात कारवाई केल्यानंतर कळव्यातील बहुचर्चित चौपाटीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी रेती बंदरावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे बुधवारी सकाळी या भागातील भूमाफियांकडून सुरू असलेल्या हप्तेबाजी आणि नफेखोरीचा तपशीलच उघड झाला. खाडीकिनारी पक्के घर खरेदी करण्यासाठी या भागातील एका बडय़ा शिवसेना नेत्याला आम्ही तीन ते पाच लाख रुपये मोजल्याच्या तक्रारी येथील काही रहिवाशांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केल्या आहेत. जे रहिवासी भाडय़ाच्या घरात राहात आहेत, त्यांना येथील भूमाफियांना महिन्याला तीन ते पाच हजार रुपयांचा ‘प्रोटेक्शन मनी’ द्यावे लागत असल्याचा तपशीलही यावेळी उघड झाला. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खाडीकिनारी बेकायदा बांधकामे बांधून कळवा चौपाटीची वाट रोखून धरणाऱ्या मुजोर नेत्यांचा दबाव झुगारून बुधवारी सकाळपासून ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी विभागामार्फत येथील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली. त्यापूर्वी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सायंकाळी या परिसराची पाहणी करत येथील रहिवासी व व्यावसायिकांशी संवाद साधला. तसेच ज्या रहिवाशांकडे २० वर्षांचे रहिवासाचे कायदेशीर पुरावे आहेत, त्यांना बीएसयूपी प्रकल्पातील घरांमध्ये कायमस्वरूपी सदनिका देण्यात येतील किंवा रेंटल हौस्िंाग योजनेत तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केले होते. या भागातील २०० ते २५० घरांमधील राहाणाऱ्या काही रहिवाशांनी शिवसेनेच्या एका ‘दादा’ नेत्याचे नाव घेत हप्तेबाजीचा सखोल तपशीलच वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे मांडल्याचे बोलले जात आहे. येथील घरे कुणाला विकायची असतील किंवा नव्याने खरेदी करायची असतील तर या दादाला तीन लाख रुपये द्यावे लागतात, अशा तक्रारी यावेळी पुढे आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तसेच भाडय़ाने राहाणाऱ्या रहिवाशांना तीन ते पाच हजार रुपये नियमित भूमाफियांना द्यावे लागत असून वसुलीसाठी खास व्यक्ती नेमण्यात आल्याचे जबाब यावेळी महसूल विभागाकडे नोंदवून घेण्यात आले आहेत. शासकीय जमिनीवर अशा प्रकारे घरबांधणी करून पैसे उकळल्याचा आरोप होऊ लागल्याने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या सूचना संजीव जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कल्याणकर यांना दिल्या आहेत. त्यानुसार महसूल विभागाचे प्रातांधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून या प्रकरणी लवकरच फौजदारी कारवाई होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी महापौर संजय मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रकरण माहीत नसल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी दूरध्वनी उचलला नाही. स्थानिकांना भडकवण्याचा प्रयत्न आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी पालिकेचे पथक रेतीबंदर परिसरात येऊन धडकले. रेतीबंदरावर साधारण २०० ते २५० घरे आहेत. त्या सर्वाचे सर्वेक्षण करून त्यांच्याजवळील असलेल्या पुराव्यावरून त्यांना सदनिका देण्यात येतील, असे ठरले होते. असे असतानाही काही स्थानिक नेत्यांनी बुधवारी कारवाई सुरू होताच येथील रहिवाशांची माथी भडकविण्याचा प्रयत्न केला. रेतीबंदर परिसरात कारवाईदरम्यान अतिक्रमणविरोधी पथकाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचा तपशील आताच उघड करणे योग्य होणार नाही. या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट केली जाईल. -संजीव जयस्वाल, आयुक्त