ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरे, खेडय़ापाडय़ातील डाकघरात दिवसाला साधारण ६५ हजार साधी पत्रे आणि रजिस्टर, पार्सल पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कल्याण ‘रेल मेल्स सव्र्हिस’ म्हणजेच आरएमएस सेवेला कल्याणमधून ठाणे येथे हलविण्यात येत असल्याच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. रेल्वे लेव्हल क्रॉसिंगमुळे सेवेत उशीर होत असल्याचे कारण सांगून ही सेवा येथून हलविण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कल्याण येथील सेवा बंद झाल्यास टपाल पोहोचण्यास आणखी विलंब होणार आहे. कल्याण जंक्शनचे महत्त्व ओळखून भारतीय डाक सेवेकडून १९६६-६७ मध्ये कल्याण पूर्वेकडे फलाट क्रं. ७ जवळ आरएमएस कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरे तसेच गावपाडय़ातील टपाल कार्यालयात (मुरबाड, वसई, भातसानगर, शहापूर, वाशिंद, कसारा) दिवसाला ६० ते ६५ हजार साधी पत्रे तसेच ४ ते ५ हजार रजिस्टर पत्रे, ५०० ते ७०० पार्सल पोहोचविण्याचे काम केले जाते. कल्याण हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्यामुळे १४ मेल एक्स्प्रेसमार्फत महाराष्ट्राच्या विविध शहरांमधून ठाणे जिल्ह्याचे टपाल कमीत कमी वेळेत जिल्ह्य़ातील लहान डाकघरापर्यंत पाठविले जाते. यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे, बॅंक, कोर्टाची कागदपत्रे, १० वी १२ वी च्या प्रश्न व उत्तरपत्रिका असतात. हे सर्व टपाल या आरएमएस सेवेतून वेळेचे नियोजन करून ठिकठिकाणी पाठविली जातात. अशी अत्यावश्यक सेवा देणारे आरएमएस कार्यालय टपाल विभागाच्या १५ मेल गाडय़ा कल्याण विठ्ठलवाडी स्थानकादरम्यानचे रेल्वेफाटक ओलांडून कार्यालयाकडे ये-जा करतात. मात्र हे फाटक सकाळ संध्याकाळ तीन तास बंद असल्यामुळे टपाल गाडय़ांना विलंब होत असल्याचे कारण सांगून कल्याणहून ते ठाणे येथे स्थलांतरित करण्याचा विचार डाक प्रशासन करीत आहे.’या कार्यालयात दुपारी ४ ते ९-३० या वेळेत रजिस्टर पत्रे व स्पीड पोस्ट बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा रेल्वे स्थानकावर असल्याने ते जनतेला सोयीस्कर पडते. ’जव्हार, मोखाडा व विक्रमगड या दुर्गम भागातील पत्रे कल्याणला बस सुविधेने येतात. त्यानंतर आरएमएसमध्ये त्यांची छाननी करून ती पुढे पाठविले जातात. ’कल्याणचे कार्यालय ठाणे येथे हलविल्यास सर्वच गाडय़ा ठाणे येथे थांबत नाही. त्यामुळे सीएसटीहून टपाल ठाणे येथे येण्यास आणि तेथून पुढे सॉर्टिग होण्यास वेळ लागणार असल्याने टपाल पोहोचण्यास आणखी विलंब होईल.रेल मेल्स सर्विसच्या कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर एक मजली इमारत देण्यात आली आहे. मात्र रेल्वे व टपाल यांच्यात समन्वय नाही. या इमारतीचे भाडे टपाल विभागाकडून थकविण्यात आले आहे. याविषयी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, मुंबई जनरल पोस्ट मास्तर यांना पत्रव्यवहार केला असून सदर कार्यालय हलविण्याचे प्रयोजन काय याविषयी वस्तुस्थितीजन्य अहवाल मागविला आहे.