रेल्वे-पालिका यांच्या संयुक्त भागीदारीतून उभारणी ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलूंड स्थानकादरम्यान प्रस्तावित असलेल्या स्थानक मनोरुग्णालयाच्या जागेवरच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे आणि महापालिकेच्या भागीदारीतून हे स्थानक उभारले जाणार असून त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० कोटींचा भार महापालिका उचलण्यास तयार आहे तर उर्वरित ५० कोंटींचा भार रेल्वे उचलेल, अशी अपेक्षा आहे. तसेच रेल्वे आणि नगरविकास मंत्रालय यांच्यात एक नुकताच करार झाला असून त्यानुसार मनोरुग्णालयाच्या विस्तारीत स्थानकाच्या विकासासाठी अमृत योजनेचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहीती ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिली. ठाणे स्थानकातून दररोज सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानकात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलूंड स्थानकादरम्यान रेल्वेचे नवे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. तसेच पुर्व द्रुतगती महामार्गावर मनोरुग्णालयास लागून उन्नत रेल्वे स्थानक उभारण्यात येणार होते आणि त्यासाठी आठ एकर जागा संपादीत केली जाणार असल्याचा प्रस्तावही मध्यंतरी पुढे आला होता. मात्र, तो प्रस्ताव मागे घेण्यात आला असून उन्नतऐवजी मनोरुग्णालयाच्या जागेवरच हे विस्तारीत स्थानक उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त जयस्वाल यांनी दिली. हा प्रकल्प लोकसहभागातून राबविण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु त्यासाठी मिळणारा प्रतिसाद आणि लागणारा कालावधी लक्षात घेऊन महापालिका आणि रेल्वेने संयुक्तपणे हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्थानकाच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० कोटींचा भार महापालिका उचलण्यास तयार आहे, अशी माहिती आयुक्त जयस्वाल यांनी दिली. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून परिसराचा विकास केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि नगर विकास मंत्रालय यांच्यात नुकताच एक संयुक्त करार झाला आहे. त्यामध्ये देशातील दहा शहरांची निवड करण्यात आली असून ठाणे शहराचा समावेश आहे. रेल्वे स्थानक आणि त्या भोवतालचा परिसर विकासासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून निधी मिळणार आहे. त्यामुळे विस्तारीत स्थानक उभारताना त्याचा फायदा होणार आहे. तसेच नागरिकांच्या हितासाठी हे स्थानक उभारण्यात येणार असल्यामुळे ती जागा मिळविताना अडथळे येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.