हिंदू सणांमध्ये विशेष महत्त्व असणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव कल्याणात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कल्याणचा दुर्गाडी किल्ला सुमारे हजारो पणत्यांनी बुधवारी न्हाऊन निघाला. त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने दिव्यांची आरास पाहण्यासाठी आणि गडावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी कल्याणकरांनी एकच गर्दी केली होती. कल्याणमध्ये दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. १९०७ पासून शहरातील ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावर दिव्यांची आरास करण्यात येते. किल्ले दुर्गाडी त्रिपुरोत्सव समितीच्या वतीने त्रिपुरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात येते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून उत्सवाचे व्यवस्थापन करण्यात येते. यासाठी संघ स्वयंसेवक आठवडाभर आधी घरोघरी जाऊन पणत्या, तेल, वाती गोळा करतात. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी संघ स्वयंसेवकांनी गोळा केलेल्या पणत्या, तेल, वाती गडावर एका ठिकाणी ठेवल्या जातात. त्यानंतर स्वयंसेवकांच्या वतीने गडाची साफसफाई करण्यात येते. गडाची साफसफाई झाल्यानंतर गडावर रांगोळ्या काढण्यात येतात. दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून ते गडावरील रस्ता, मंदिर परिसर, बुरूज अशा गडाच्या विविध भागांत या पणत्या ठेवण्यात येतात. किल्ल्यावरील गणपतीची पूजा प्रथम करण्यात येते. गणपती पूजेनंतर गडावरील देवीची आरती करून तिच्या पुढे पहिला त्रिपुर लावण्यात येतो. त्यानंतर मग किल्ल्यावरील सर्व पणत्या लावण्यात येतात. यंदाच्या वर्षी किल्ल्यावर सुमारे पाच हजार नागरिकांनी हजेरी लावली. त्रिपुरी पौर्णिमा उत्सवाला कल्याणकरांनी उत्तम सहकार्य केल्याचेही या वेळी दिसून आले. दुर्गाडी किल्ल्यावर पणत्यांची आरास केल्याने परिसर उजळला होता.