२००८ पासून होत असलेल्या आयपीएलच्या जत्रेचा यंदाचा नववा हंगाम. कसली भारी जत्रा आहे ही. घर सोडायचं काम नाही, खर्चाला कहर नाही, चिल्लीपिल्ली गर्दीत हरवण्याची भीती नाही, भाऊगर्दीत पाकीट हरवण्याचा धोका नाही. काही टेन्शनच नाही..

हाच तो क्षण आणि हीच ती वेळ. पहिली ते दहावी वयोगटातली तमाम मुलं, मुली परीक्षांच्या कचाटय़ातून मोकळी होऊ लागली आहेत. त्यांच्या जोडीला महाविद्यालयीन परीक्षाही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे मेक इन इंडियाचं आद्य उत्पादन असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात क्रिकेटरूपी जत्रेची वेळ झाली. सकाळी नऊपासून सूर्यदेव आग ओकत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणं फारच घातक. बॉडी टॅन वगैरे कोण करून घेईल ना. तुमच्या हाती हे लिखाण पडेपर्यंत जत्रेचा वॉर्मअप राऊंड सुरू झाला असेल. पण जसजशी नव्या भारताचे भवितव्य असलेली युवा मंडळी अकॅडमिक इंटरेस्टमधून बाहेर पडू लागतील तसतसं या जत्रेची खुमारी वाढत जाईल. जत्रा म्हटल्यावर पिपाण्या, आकाशपाळणे, मौत का कुवा, रिंग गेम, देखावे, आवाज म्हणजे रेकणे असा समज करून घेतलेली विक्रेती मंडळी असं सगळं नॉस्टॅलेजिक चित्र तुमच्या चित्तचक्षुंपुढे उभं राहिलं असेल. ते कायम ठेवा, विरू देऊ नका. कसं आहे जागेची मर्यादा फार शहरांमध्ये. त्यात आवाज झाला की हल्ली डेसिबल मीटर घेऊन कार्यकर्तेपण हिंडतात म्हणे. मग तमाम जत्राप्रेमींसाठी २००८ पासून टीव्हीवरच जत्रा भरते. सोयीचं आहे की नाही-तुम्हीच सांगा. घर सोडायचं काम नाही, खर्चाला कहर नाही, चिल्लीपिल्ली गर्दीत हरवण्याची भीती नाही, भाऊगर्दीत पाकीट हरवण्याचा धोका नाही. काही टेन्शनच नाही. तर या जत्रेचा नववा हंगाम मायबाप रसिकांच्या भेटीला सादर होतो आहे आणि तुमच्या मनोरंजनाची जबाबदारी संयोजकांची. पिपाणी कुठे म्हणता-अहो दिलंय की तुम्हाला, व्हेव्हेझुएला म्हणतात त्याला. जत्रा ज्या स्टेडियमवर आहे तिकडे जा-वन टाइम. १९ किलोमीटपर्यंत कान किटतील असा हा पिपाणीचा फिरंगी अवतार कायमस्वरूपी मिळेल तुम्हाला. आकाशपाळण्याला ओशाळवेल असा स्पायकॅम आहे. प्लेयर्सच्या चेहऱ्यावरच्या घामाच्या ठिपक्यापासून डगआऊटमध्ये बसलेल्या आणि संघात नसलेल्या खेळाडूच्या जांभईपर्यंत टिपणार तो. असा गरागरा फिरतो सांगतो तुम्हाला, मॅच सुरू असताना फिरतो असा ३६० डिग्री झपाझप. कधी कधी बॉलचा मारपण खातो. एवढं करावंच लागणार की तुमच्या मनोरंजनासाठी. आता आपले गेलदादा आहेत. कोण म्हणून काय विचारता-पोलडान्स, टॅटू, हेअरस्टाइल, अजब पद्धतीचं खाणं आणि मजाक मजाक वाटावा असे सिक्सेस मारणं हे त्यांचं काम. एवढय़ा मॅचेस असतात, फोकस कधी कधी चुकतो त्यांचा. मग काय होतं-समोरच्या किंवा बॅकसाइडच्या अंपायरलाच बॉल लागतो. बरं गेलदादांची ताकद तुम्हाला माहितेय ना-एकदम मौत का कुवा. असं हार जाणार होय-मग आता हेल्मेट दिलेत अंपायर्स मंडळींना. आता कोणी गेल वाकडं करू शकत नाही त्यांचं. देखावे राहिले म्हणताय- असं कसं होईल- मॅच कोणाचीही असो, मॅचआधी फटाके, मॅच संपली की नयनरम्य आतषबाजी. खास पर्यावरणस्नेही फटाके आहेत. बिनआवाजी. देखाव्यांवरून आठवलं- सारखं सारखं क्रिकेट पाहून तुम्ही कंटाळणार- म्हणून चीअरलीडर्स पण आहेत. मोनोटोनस नको व्हायला (एकजिनसी म्हटलं तर तुम्हाला वाटायचं जिनसाची यादीच देतोय.) म्हणून गटणेबाजीचा मोह टाळला. तर असा सगळा क्रिकेटेन्मेंटचा माहौल तयार झाला एकदम. बरं तुमच्यासाठी इंटरनॅशनल मॅचचा टिळा लागलेले हाय डेसिबल पिचमध्ये बोलणारे कॉमेन्टेटर्स घेतलेले आहेत. लोक किती कमिटेड असतात, तुम्ही शिका जत्रेतून काही. परवा म्हणजे मागच्या आठवडय़ात रवीदादांची असाइनमेंट संपली. बीसीसीआयच्या टीम इंडियाचे टीम डिरेक्टर होते ते. एकदम हाय प्रोफाइल जॉब, हंगामी का असेना. तीन तारखेला कॉन्ट्रॅक्ट संपलं त्यांचं. दुसरं कोणी असतं तर सात वर्षांच्या लेकीला घेऊन तारापोरवाला मत्सालयात गेलं असतं. पण बाप हा बाप असतो. त्यांनी मुलींच्या सुखकर भविष्यासाठी दुसरा जॉब धरला, लगेच. रेस्ट घेऊ, चिलआऊट करू, हॉलिडे वगैरे. बिलकूल नाही. आठ  तारखेलाच त्यांनी फॉर्मल वेअर्स परिधान केली, बीसीसीआयचा बूम हाती घेतला आणि काम सुरू. इतकी डिव्होटेड माणसं. पैसा पैसा दिसतो तुम्हाला, पण शेडय़ुल बघा- ६० मॅचेस. रोज एअरपोर्ट, हॉटेल, स्टेडियम अशी त्रिसूत्री. त्यात जेटलॅग, ट्रॅफिकजॅम, फॉग अशी कारणं द्यायलाही संधी नाही. डायरेक्ट २९ मेला फ्री होणार. जत्रा वनटाइम असते, मग आता नाही कमावणार मग कधी. बरं सर्वसमावेशक पॅकेजचं ठरलंय, त्यात हयगय नाही. जत्रेचा दीड महिना सोडला तर वर्षभरात गायब असणाऱ्या चार अँकर्सनाही पाचारण केलंय खास तुमच्यासाठी. एवढं पुरेसं नाही- ग्राहकराजाला खूश करण्यासाठी सिद्धूपाजींनाही आणलंय, आहात कुठे. आम्हाला एका थिअरीची फार गंमत वाटते बुवा. आयपीएल म्हटलं की भारतातली म्हणू नका, परदेशातली म्हणू नका, सगळी मंडळी पटापटा फिट होऊ लागतात. शीघ्र शेरोशायर, वाचाळपंडित सिद्धूपाजी अगदी आतापर्यंत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाटेवर होते. आम्हाला तो शब्द उच्चारताना जिभेची बोबडी वळतेय अशा आजारातून ते बाहेर आलेत. जत्रेला ट्रॅडिशनल व्ह्ॅल्यू असते. सगळं पैशात तोलायला जाता तुम्ही आणि चुकता. साठ दिवस, साठ टाय, ९२७ पीजे, १०३७ हिंदी सुभाषितं, ५७ इसापनीतीतल्या गोष्टी असा भरगच्च साठा घेऊन आलेत ते. आणि जवळपास काही महिने न बोलल्यामुळे आता एकदमच ऑल सेट आहेत ते.

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

जत्रा म्हणजे दरारा, धाक. दीड महिन्यात कोणी डेअरिंग करत नाही नवीन काही सुरू करायची, लाँच करायची. तोंडावर आपटून घ्यायची हौस कोणाला असते. एरव्ही थिएटरच्या डेट्सवरून एकमेकांच्या उरावर बसणारे प्रोडय़ुसर्स, डिरेक्टर्स जत्रेदरम्यान एकजुटीचा मापदंड प्रस्थापित करतात. जत्रेचा कोप झाला की विचारू नका. मोठा मार्केट लॉस होतो, कोण सोसणार तो. असं ठरतं की दीड महिना थांबू या. मग आणू आपलं प्रॉडक्ट. सासू-सून आणि लग्नवेल्हाळ सीरियल्सची मोठीच पंचाईत जत्रेमुळे. एरव्ही कसं घरातल्या होम मिनिस्टरपुढे मान तुकवून सीरियल्सचा मारा झेलतात मंडळी. पण होतं काय जत्रेची टायमिंग कन्विनिइंट ठेवलेलं. रात्री आठ. समस्त चाकरमानी मंडळी दमून, थकूनभागून घरटय़ात परतली, चहापाणी झालं, फ्रेश झाली रे झाली की जत्रा सुरू. डिनर, कॉफी, नाइटवॉक-वाट्टेल ते करा जत्रेदरम्यान. फळणार तुम्हाला. अहो एवढे रंग तुम्ही एकसाथ कधी पाहणार. नारिंगी म्हणू नका, जांभळा म्हणू नका, हवी ते रंगाची शेड मनात पकडा. ती जत्रेत सापडणार तुम्हाला. तुमचं आपलं उगाच-जत्रेमुळं वातावरण बिघडलं, संस्कार नाहीसे झाले, काही सामाजिक भान वगैरे. तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना- जत्रा सगळ्याची काळजी घेणार. वातावरण बिघडायला-आता कुठे मोठं आयडियलिस्टिक वातावरण आहे. बघता बघता देशद्रोही बोलता तुम्ही काहीबाही आणि संस्काराच्या गप्पा मारता. अहो काय म्हणता, दुष्काळ. दुष्काळ नवीन आहे का आपल्याला-सुका दुष्काळ, ओला दुष्काळ, वैैचारिक दुष्काळ, सहिष्णूतेचा दुष्काळ, आयडियाच्या कल्पनांचा दुष्काळ. तिकडे अमेरिकेचे ट्विन टॉवर्स पाडले अतिरेक्यांनी. म्हणून आपण पर्यावरणद्रोही असलेल्या स्कायस्कॅ्रपर्स बांधायचं सोडलं का-नाही ना. एवढा मोठा देश आपला. एकीकडे पावसाचं लँडिग होत असताना दुसऱ्या टोकात थंडीनं हुडहुडी असते. आता एकीकडे म्हणता संकुचितपणा टाळा, कोतेपण कमी करा. म्हणून ही ग्लोबल जत्रा. अहो अगदी आतापर्यंत वॉर्नसाहेब त्यांच्या देशातलं अन्न आणि पाणी घेऊन यायचे, त्यांना वाटायचं-एलिफंट्स आणि स्नेक्स कंट्री. पण जत्रेमुळे सर रवींद्र जडेजा लहान भाऊ झाले त्यांचे. ब्राव्होदादा आणि धोनीची गट्टी जमली. अशी किती बाँन्डिग सांगू तुम्हाला-परिशिष्ट जोडावं लागेल. आणि कसं आहे शेवटी- पैशाचा प्रश्न आहे सगळा. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं आणता येत नाही. दीड महिन्यात वर्षभराची बेगमी होतेय. कसं दुर्लक्ष करणार. हॉटेलं, पर्यटन, खरेदी-विक्री असं डेव्हलप होतं दीड महिन्यात. एरव्ही उन्हाळ्यात दीड महिन्यात साधा स्लॅबपण पूर्ण होत नाही, इथं लोकांची घरांची, गाडय़ांची, महालांची, ब्रँडेड वस्तूंची स्वप्नं साकार होतात. रोजगार निर्मित्ती ही खरी अडचण आपल्यापुढची. पण जत्रेमुळं किती हातांना काम मिळतं, ते पाहा तुम्ही. आठ वर्षांपूर्वी मुंबईतल्या भांडुपजवळच्या नाहूरला राहणाऱ्या प्रवीण तांबेला तुम्ही ओळखलं असतंत का- नाही. आता ओळखता, टीव्हीवर बघता, त्याला चीअर पण करता. जत्रेमुळे झाला बदल. अंथरूण पाहून पाय पसरावे असं सांगतात म्हणी आपल्या. पण जत्रेने आपलं अंथरूणरूपी क्षितिज विस्तारलं. श्रीमंत होण्याचं स्वप्नं दाखवलं. आता श्रीमंत झाल्यावर माजलात तर तो जत्रेचा दोष नव्हे, नाही का? जत्रेमुळे सेलिब्रेटी आणि हूज हू यांच्याशी बोलता येतं, सेल्फी काढता येतो.

वाईट माणसं कुठे नसतात. बाजूला झाले की ते. माल्यादादा सक्रिय होते जत्रेत. झोल झाला. बाजूला झाले ते. जत्रा काय, देश सोडला त्यांनी. तिरुपतीभक्त श्रीनिवासन आणि मंडळी तसंच योगप्रसारक आणि हंगामी अभिनेत्री शिल्पा शेट्टी मॅडम यांच्याकडून आगळीक झाली जत्रेदरम्यान. दोन वर्ष बॅन केलं त्यांना. लॉ आणि ऑर्डर असावी तर जत्रेसारखी. काही टवाळ पोरं माजली होती. त्यांना तर हाकलूनच दिलं. विषयच मिटला. जत्रा सुरू राहायला हवी कारण ही आपली देणगी आहे जगाला. आपल्या जत्रेच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियात, बांगलादेशात, श्रीलंकेत, पाकिस्तानात, वेस्ट इंडिजात, दक्षिण आफ्रिकेत प्रतिजत्रा सुरू झाल्या. पण एकीलाही आर्थिक यश नाही. काही जत्रा तर एव्हाना बंदही पडल्या आहेत. आपल्या जत्रेचं अधिष्ठानच तेवढं प्रभावी आहे. म्हणून सांगतो, भारतीय टेलिव्हिजनवरच्या शक्तिशाली रिअ‍ॅलिटी शो जत्रेचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com