जनतेने आता गंभीरपणे विचार केला पाहिजे. आमच्या धर्मग्रंथात जे जीवन वर्णन केलेले आहे त्याचे व आम्ही तयार केलेल्या घटनेत काही साम्य आहे काय? जर साम्य नसेल तर त्याचे कारण काय? आमचा धर्म व घटना या दोहोंपैकी एक गोष्ट आम्ही स्वीकारली पाहिजे. एक तर धर्माला जिवंत ठेवले पाहिजे किंवा घटनेलाच जगवले पाहिजे. दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी राहू शकत नाही. दोहोंत मेळ बसू शकत नाही.हिंदू धर्मात अनेक मते आहेत. त्या सर्वात शंकाराचार्याचेच मत चांगले समजले जाते. शंकराचार्याचा ‘बह्म सत्यम् जगन्मिथ्या’ हा सिद्धांत सर्वात अधिक महत्त्वपूर्ण समजला जातो, परंतु बौद्ध धर्माच्या उच्च सिद्धांतासमोर तो अगदी तुच्छ व निर्थक आहे.नवीन झालेल्या बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारला बौद्ध मंदिरात गेले पाहिजे. असे जर झाले नाही तर नवीन बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी बुद्ध मंदिरे निर्माण झाली पाहिजेत. लंका, बर्मा, तिबेट, चीन आदी देशांतील बौद्ध भिक्षूंनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व हिंदुस्थानातील बौद्ध लोकांना मदत करावी.आपण भारताचा प्राचीन इतिहास समजून घेतला पाहिजे. हिंदुस्थानात सर्वात प्रथम आर्य आणि नाग लोकांचे युद्ध जुंपले. आर्याजवळ युद्धास घोडे होते. त्या बळावर त्यांनी नाग लोकांवर विजय मिळविला. हेच नाग लोक आज हिंदू आहेत. नागांनी सर्वात प्रथम बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सफलता मिळाली, परंतु या नागांचा नायनाट करण्याकरिता आर्यानी वेळोवेळी प्रयत्न केले. याचे पुरावे महाभारतात अनेक ठिकाणी आढळून येतात. पुढे आर्यानी ब्राह्मण धर्माला व्यापक बनविले. त्यात अनेक दोष निर्माण झाले. चातुर्वण्र्य व्यवस्थेचा उदय हा ब्राह्मणांनीच केला. भगवान बुद्धाने चातुर्वण्र्याला घोर विरोध केला. त्यांनी चातुर्वण्र्य नष्ट करून समतेचा प्रचार केला व याच आधारावर बौद्ध धर्माची स्थापना केली. भगवान बुद्धाने ब्राह्मणांच्या यज्ञांना अमान्य केले व त्यांना तिलांजली दिली. ब्राह्मणांनी िहसेची प्रथा सुरू केली होती ती नष्ट करून भगवंताने अहिंसेचा प्रचार केला. भगवंताने म्हटले आहे की, बौद्ध धर्म महासागराप्रमाणे आहे. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करून त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला. हिंदूू धर्माच्या मुळात रोग झालेला आहे. याच कारणामुळे आम्हाला वेगळा धर्म ग्रहण केला पाहिजे. माझ्या समजुतीप्रमाणे बौद्ध धर्म हाच योग्य धर्म आहे. यात उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जाती-पाती आदी भावना नाहीत. अस्पृश्य वर्गाचे कल्याण बौद्ध धर्म स्वीकारल्यानेच होण्याची शक्यता आहे. हिंदू समाजात असलेली असमानता, भेदाभेद, अन्याय व कुप्रथा बौद्ध धर्म स्वीकार केल्याने दूर होऊ शकतात. हिंदूू धर्माच्या कपाळावर अस्पृश्यता हा एक भयंकर कलंक लागला आहे. याचमुळे हिंदू जातीच्या हृदयातील दुष्टता दिसून येते. अस्पृश्य पवित्र व शुद्ध होऊन देवदर्शनासाठी जातात तरी त्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. शिवाशिवी, भेदाभेद, जातपात यांना समूळ नष्ट करणे हे सवर्ण हिंदूंचे कर्तव्य आहे.आज मी अस्पृश्यांना आवाहन करतो की त्यांनी अशाच धर्माचा स्वीकार करावा की ज्या धर्मात मनुष्यमात्रात भेदाभेद नाही, सारखेपणा आहे व मित्रत्वाच्या नात्याने ते एकत्र येऊ शकतात. हाच उच्च आदर्श बौद्ध धर्मात आहे. ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात व आपले अस्तित्व विसरतात, त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर सर्व लोक समान होतात. कोणत्याही प्रकारची विषमता त्यांच्यात राहात नाही. बौद्ध धर्म अस्पृश्यांनाच नव्हे, तर अखिल मानवांनादेखील कल्याणकारक आहे. सवर्ण हिंदूंनी या धर्माचा अवश्य स्वीकार करावा. इतर धर्मात सृष्टी निर्माता ईश्वर समजला जातो व जे दोष राहिले त्याबद्दल ईश्वरालाच जबाबदार पकडले जाते. तशी विचारसरणी बौद्ध धर्मात नाही. बौद्ध धर्मात जगात दु:ख आहे असे म्हटले आहे. त्या दु:खाचे निरोधन होऊ शकते व त्याकरिता कोणते मार्ग आहेत याचा विचार केला आहे. हिंदू धर्मात रूढीवर सारी विचारसरणी आधारित आहे. ही रूढी चातुर्वण्र्य पद्धतीतून जन्माला आली. हिंदूंना न्याय करण्याचा अधिकार होता, पण त्यांनी आजवर अस्पृश्यांवर अन्यायच केला आहे. हिंदूंपासून आपण पृथक होऊन भगवान बुद्धाच्या चरणावर नम्र झाले पाहिजे.मला काठमांडू येथील पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊ दिले नाही, असे खोटेच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याचे मी ऐकले. मी कोणत्याच हिंदू मंदिरात जात नाही. मला शंभर वेळा प्रार्थना केली असती तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते. माझ्या खासगी सेक्रेटरीला नेपाळच्या महाराजाने आदल्या दिवशी बोलावून डॉक्टर साहेबास मंदिरात न जाऊ देण्याबद्दलची सूचना केली होती व म्हटले होते की, बौद्धांना हिंदूू मंदिरात जाऊ देण्याइतपत आजची परिस्थिती नाही. बौद्धांनी कधीही हिंदूंच्या देवळात जाऊ नये. बौद्ध मंदिरात सर्व समान आहेत, कोणाचाही तिथे निषेध करू नये. काशी येथील मंदिर प्रवेश हा राजकीय स्टंट आहे-डाव आहे. त्यापासून दलितांना कसलाच फायदा व्हावयाचा नाही. म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच बंधुत्वाचा व समतेचा दर्जा प्राप्त करणे एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे.(रघुवंशी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे’ या पुस्तकावरून साभार)संकलन - शेखर जोशी*नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.