सन : २०११-१२ स्थळ : पाडळी, ता. बदनापूर, जि. जालना उचकी लागल्यासारखे दहा मिनिटाला एकदा मोटार थोडेसे पाणी बाहेर टाकायची. पुढे तेदेखील बंद झाले. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरवर आलेला. त्या वर्षांत दत्तात्रय हरिराम शिरसाट यांनी दोन एकरांवरील मोसंबीची बाग काढून टाकली. दोन वष्रे जपलेली झाडे मोडून काढताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. फळबाग लागवड केली, की जरा अधिक पैसे मिळतील म्हणून डाळिंब शेती केली. ती बागही मोडली. आता काय करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. कोणी तरी सांगितले की, ठिबक करा. मग सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकरी हजार रुपये कर्ज दिले. ठिबकच्या नळ्या आल्या. पण त्या नळ्यांमधून जाईल एवढेही पाणी नव्हते. सारे काही उद्ध्वस्त होत गेले. सहा वर्षांपासून उन्हाळ्यात लागलेल्या टँकरच्या फेऱ्या वाढल्या. सारा गाव काळजीत पडला. या वर्षी कसे तरी भागेल. पुढे पाणी टिकवायचे कसे? दरम्यान, काही कार्यकर्ते गावात पाणी कसे साठवणे आवश्यक आहे, याच्या बैठका घेत होते. त्यात दोन वष्रे एका कानाने ऐकायचे आणि दुसरीकडून सोडून द्यायचे असेच चालले होते. पण आता ठिबकही चालणार नाही असे लक्षात आले आणि पाडळीतील तरुणांनी पाणी पिकविण्याचा निर्णय घेतला. गावालगत दुधना नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होता. तो फुटला त्यानंतरही विहिरी कोरडय़ाच पडत गेल्या. पिण्याच्या पाण्याचे हाल असल्याने शेतीच्या पाण्याचा विचार मनात डोकावणेही कोणालाच शक्य नव्हते. दरम्यान, गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू झाल्या होत्या. तरुणांनी जुन्या नेत्यांना सरळ बाजूला व्हा, आम्ही आता कारभार हाकतो, असे स्पष्टपणे सुनावले. तरुणांचा एक गट मनाने एकत्र बांधला गेला. नाबार्डकडून शेतकऱ्यांनी ठिबकसाठी कर्ज घेतले होते. पण पाणी नसल्याने त्याचे काय करायचे, असा प्रश्न होता. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेमध्ये गावाच्या भोवतालच्या नद्यांचे खोलीकरण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यात या तरुणांचा सहभाग मोठा होता. त्यातील काही तरुण म्हणत होते, बाहेरून येऊन कोणी आपला उद्धार करणार नाही, आपल्यालाच काही तरी करावे लागेल. गावात तरुणांनी मग खोलीकरणाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती केली. २४ तास कामावर लक्ष ठेवताना त्याचे व्यवस्थापन कसे असावे याचा एक आराखडा बनविण्यात आला. खोलीकरणासाठी पोकलेन लावण्यापूर्वी किती वाहनांतून नदीमधील गाळ, घाण काढावी लागेल, याचा अंदाज घेण्यात आला. काढलेला गाळ कोणाच्या शेतात टाकायचा हे आधी ठरले. ज्या शेतकऱ्याला गाळ न्यायचा असेल त्याने ४०० रुपये द्यावेत असे ठरले. त्यासाठी पावतीपुस्तक छापून घेण्यात आले. एक पोकलेन दिवसभर सतत काम करत असेल तर त्याला १७ ट्रॅक्टर लागतात. तशी वाहने भाडय़ाने घेण्यात आली. त्यासाठी प्रत्येकाने वर्गणी द्यावी, असे ठरले. प्रत्येक विहीर असणाऱ्या शेतकऱ्याने दहा हजार रुपये द्यायचे ठरले. गावात ३५ विहिरी निघाल्या. काही रक्कम जमा झाली आणि उर्वरित रक्कम सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उद्योग जगताकडून मिळविली. गावातील दुधनाच्या खोलीकरणाचे काम धडक्यात सुरू झाले. पुढे गावात चांगला पाऊस झाला. नदीमध्ये पाणी साठले. आता या कामासाठी सातत्य ठेवणाऱ्यांचा १०-१२ जणांचा एक चमू तयार झाला आहे. पाच वर्षांच्या दुष्काळाने पाणी पिकविण्याचा सामूहिक प्रयत्न नव्या जाणिवा निर्माण करणारा आहे. आता पाणलोटाच्या कामाकडे लक्ष देणारी ही मंडळी पुढचे पाऊल टाकत आहेत. गावात जैवविविधता टिकवून ठेवता यावी, यासाठी एक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गावातील विहिरींना आता मे महिन्याच्या अखेरीस चांगले पाणी आहे. गाव : पाडळी सन : २०१७ गावातील स्वस्त धान्य दुकानाचे मालक अप्पासाहेब शिरसाट सांगत होते, आमच्याकडे दर महिन्याला सरासरी २१ क्विंटल गहू येतो. या वर्षी तो उचललाच जात नाही. कारण पाडळी गावात या वर्षी रब्बी हंगामात गहू झाला. तब्बल ७५० क्विंटल गहू जलयुक्तच्या कामामुळे झाला. मागच्या १३ वर्षांत एवढे पीक कधीच झाले नव्हते. गावातील शेतकऱ्यांना चांगले पीक झाले आणि विविध योजनांमधून मिळणाऱ्या गहू खरेदीवर ५० टक्के परिणाम झाला. ज्यांच्याकडे शेती नाही किंवा ज्यांनी गहू लावला नव्हता अशांना आता तो वितरित केला जातो. केवळ एवढेच नाही तर गावात या वर्षी उन्हाळी मका पीक घेण्यात आले. तूर आली ती विकली. त्यात एक दिवसाचा मुक्काम झाला पण पैसे आता जमा झाले आहेत. गाव खूश आहे. तरुण मुलांनी दुधनाचे खोलीकरण केले आणि सारे गाव बदलले. जी मंडळी जलयुक्त शिवार योजनेला तांत्रिकदृष्टय़ा बाद ठरवितात त्यांनी पाडळीतील गावकऱ्यांची आवर्जून भेट घ्यावी. केवळ पाडळी बदलली असे नाही, तर भोवतालची गावे आता या कामात स्वत: गुंतवून घेत आहेत. कृष्णा शिरसाट, अविनाश शेळके, तुकाराम शिरसाट, दत्तात्रय शिरसाट या मंडळींकडे भोवतालीची गावे आता कौतुकाने पाहू लागली आहेत. स्वत:ची फळबाग उखडून टाकणारे दत्तात्रय शिरसाट यांनी आता पुन्हा फळबाग लावली आहे. गावात बीजोत्पन करण्यास एक कंपनी करार करण्यास उत्सुक आहे. कारण गावात पाणी पिकले आहे. जसे पाडळीचे घडले त्यापूर्वी अशी प्रक्रिया म्हात्रेवाडीमध्ये घडली. भगवान म्हात्रे, सांडू वाघ, सुभाष वाघ, देविदास जाधव, चंद्रशेखर घन या मंडळींनी गावातील भोरडी नदीचे खोलीकरण केले. त्यासाठी वर्गणी गोळा केली. कोणी साठलेले पाणी उपसून घेणार नाही, याची तजवीज केली. आता शिवार जलमय झाले आहे. मे महिन्यात विहिरींना पाझर कायम आहे. मात्र ज्या कामावर सरकारची जलयुक्त शिवार योजना सुरू आहे त्या कामापेक्षा समाजाने उभे केलेले काम अधिक दर्जेदार असल्याचे दिसून येत आहे. एखादी योजना लोकचळवळ म्हणून पुढे येत असते, तेव्हा त्या मागे निर्माण होणारे अर्थकारण कमालीचे विस्तारलेले असते. जलयुक्त शिवारमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या आयुष्यात मोठा फरक जाणवू लागला आहे. भले तज्ज्ञ या योजनेच्या तांत्रिकतेवर प्रश्न निर्माण करो किंवा योजनेच्या प्रारूपावर टीका करो, गावागावातून पाणी पिकवणाऱ्यांनी जगण्याला नवी उभारी दिली आहे. एका बाजूला हताश भावनेने कृषी क्षेत्र व्यापलेले असताना त्यात संघभावनेने काम करणारी मंडळी संपासारख्या आंदोलनाचा सजगपणे विचार करतात, पण काम आपल्यालाच करावे लागणार आहे, याची निर्माण झालेली भावना उमेद वाढविणारी आहे. सुहास सरदेशमुख, औरंगाबाद