विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे यासाठी लोकसत्ताने ब्लॉग बेंचर्स ही स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये ‘देव पहाया कारणे’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. यापैकी पवन रवींद्र शिंदे या विद्यार्थ्यांने मांडलेल्या विचारांना या आठवडय़ाचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे कोणाचातरी श् वास गुदमरतो, स्वत:वर होणाऱ्या भेदभावाची जाणीव होते, चालत आलेल्या चुकीच्या परंपरा आणि नव्या विश्वात प्रवेश करण्यास मदत करणारे आधुनिक विचार यांचे डोक्यामध्ये घनघोर युद्ध सुरू होते, मग त्या व्यक्तीला अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याकरिता त्या व्यक्तीच्या वैचारिक ठिणगीचा वणवा होतो आणि त्या वणव्यामध्ये जाचक, अन्यायकारक, अनिष्ट रूढी-परंपरा जाळून खाक होतात. काही दशकांपूर्वीची परंपरा महिला मान्य करायची कारण तिला सांगितलेलं असायचं की तू एक स्त्री आहे आणि तुला हे पाळाव लागेल. पण आज तीच महिला जेव्हा गरपरंपरांच्या कृष्णविवरला भेदून काढत, ही परंपरा कायमची मोडीत काढण्याचा पवित्रा घेऊन उभी आहे तर आपण अशा महिलांचा आणि या विचारांचा आदरसन्मानाच करायला हवा. पाणीटंचाई, दुष्काळ, भ्रष्टाचार या आजच्या प्राधान्यक्रमात नक्कीच वरच्या समस्या असल्या तरीसुद्धा ‘महिलांचा चौथरा प्रवेश’ या मुद्दय़ाला कोणीही दुर्लक्षित करता कामा नये. लहानपणी आम्ही कुटुंब शनििशगणापूरला गेल्याचे आठवते. दर्शन घेण्यासाठी मला आईने मामासोबत पाठवले. पण आई मागेच थांबली. मी विचारले तर मामा म्हणाले की, इथे पुरुषांनाच प्रवेश आहे. महिलांनी इथे यायचं नसत. तितक्यात आमची दर्शनाची वेळ आली. तेव्हा मला जास्त समज नसतानाही विचित्र वाटले आणि आज ते सगळे आठवले तर अशा रूढी-परंपरेची चीड येते. एखादी वस्तू किंवा देव ज्याला फक्त पुरुषस्पर्श करतायत, एखाद्या चौथऱ्यावर फक्त पुरुषांनाच प्रवेश आहे तर मग महिला त्याला स्पर्श का करू शकत नाही? तिथे प्रवेश का करू शकत नाही? काय वाटत असेल माझ्या माता-भगिनींना, आपले काय चुकले? ‘कदाचित एखादी चिमुरडी आपल्या आईला विचारतदेखील असेल की, आई-आई, दादाला आत जाऊ देत आहेत, मग मला का नाही?’ तेव्हा तिची आई नक्कीच तिला मारून तिच्या पडलेल्या प्रश्नांची गळचेपी करत असणार किंवा तिला सांगत असणार, ‘ते देवाच असत, आपण गेलो तर पाप लागेल, अशी भीती घालून, प्रश्नांचा जीव घोटून आशा, रूढी परंपरा प्रभावित ठेवल्या जातात. एखादी अन्यायकारक परंपरा जेव्हा समाजात अस्तित्वात येते किंवा असते, तेव्हा ती या समाजातील असंख्य साध्या-भोळ्या लोकांवर लादली जाते आणि असंख्य लोक अनिष्ट रूढी-परंपरांचे नाहक बळी बनत जात आहेत. एखादी परंपरा जर राबवली जात असेल, तर जी यंत्रणा ती परंपरा राबवते तिने त्याची कारणे द्यावी. तीसुद्धा तर्कशुद्ध, शास्त्रीय आणि आजघडीला ती कितपत योग्य आहेत हेदेखील सिद्ध करावे. असे करण्यास जर ती यंत्रणा अपयशी ठरत असेल तर ती परंपरा आज कित्येकांना अंध गुलाम बनवते आहे, हे समजावे. एकेकाळी परंपरा होती की, राजाच्याच पुत्राने पुढचा राजा बनावे. पण ही परंपरा मोडली गेली कारण ती योग्य नव्हती. जेव्हा ही मोडली गेली असेल तेव्हापण नक्कीच भीषण संघर्ष झाला असेल. अगदी तशीच आज एखादी चुकीची परंपरा मोडण्यात येत आहे, म्हणजे संघर्ष, विरोध होणारच आणि आजच्या परंपरेत जो बदल होतो आहे, हा आज नसता झाला तर उद्या झालाच असता. तो आज होतो आहे, हे आपले सुदैवच. शनििशगणापूरला होत असलेल्या घडामोडींवरून त्र्यंबकेश्वरला निर्णय घेण्यात आला की, मंदिराच्या गाभाऱ्यात महिला आणि पुरुष दोघांनाही बंदी. मग कोणालाही हा प्रश्न सहज पडू शकतो की, महिला आणि पुरुष जर गाभाऱ्यात प्रवेश करू शकणार नाही तर मग गाभाऱ्यातील धार्मिक विधीकार्य आणि इतर कार्य कोण करणार? आणि नक्कीच उद्या जर पुरुष व महिलांव्यतिरिक्त कोणी यांना गाभाऱ्यात प्रवेश करू देण्याची मागणी केली तर त्यांना कोणी अडवले नाही तरच नवल. एकंदरीत बदल ही काळाची नितांत गरज असते. प्रगतीचे दर्शक हे त्या ठिकाणी येणारे सकारात्मक बदल असतात. आपला समाज आनिष्ट रूढी-परंपरांचा इतका गुलाम झाला आहे आणि जाळ्यात इतका गुरफटून गेला आहे की, त्याला त्याच्या बुद्धीचादेखील विसर पडतो आहे. आणि जर त्याच्या बुद्धीने प्रश्नांचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला समाजाकडून भीतीचे कुलूप लावण्यात येते आणि त्याच्या विचारक्षमतेची चावीदेखील समुद्रात फेकून देण्यात येते. आज झालेल्या संघर्षांतून नवीन सकारात्मक बदल उदयाला आला आहे. महिलांना चौथऱ्यावर प्रवेश खुला करून शानिशिंगणापुरात परिवर्तनाची गुढी उभारण्यात आली. या परिवर्तनाच्या विरोधात जी पुरुषमंडळी असतील त्यांना मी नम्रपूर्वक विनंती करेन की, मनात श्रद्धा असूनदेखील मूर्तीला स्पर्श करू न शकणाऱ्या महिलेच्या जागी स्वत: असल्याची कल्पना करून बघा. मग तुम्हालापण हे प्रश्न नक्कीच पडतील आणि एकदा का प्रश्न पडला की, त्यांची उत्तरेपण स्वत:च्या तर्कशुद्ध बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न करावा आणि जर उत्तरे समाधानकारक मिळाली नाहीत तर समजावे की, या यंत्रणेत काही तरी चुकीचे आहे आणि मग ती चूक कायमची काढून टाकावी. शनिमंदिरात लाखो लिटर तेल वाहिले जाते. आता हीदेखील परंपरा किंवा अंधश्रद्धा म्हणता येईल; परंतु या गोष्टीला अधोरेखित करून का थांबवू नये? पण या लाखो लिटर तेलाच्या दानाचा फायदा जर गोरगरिबांना होत असेल, यातून उभ्या राहणाऱ्या निधीतून काही तरी चांगले कार्य घडत असेल तर याला अडवण्याचे कारण नाही. पण जर एखाद्या गरपरंपरेमुळे माझ्या लाखो माता-भगीनींच्या भावना दुखावणार असतील तर मी त्या परंपरेवर नक्कीच आक्षेप घ्यायला मागे हटणार नाही. एमआयडीएसआर दंतवैद्यकीय महाविद्यालय, लातूर