11-lp-abhijit-panseआजची तरुणाई टीव्हीसमोर बसून सासू-सुनांच्या ड्रामेबाज मालिका बघत डोळे पुसणाऱ्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करत धमाल वेब सीरिज बघते. त्यापैकी प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘पर्मनंट रुममेट्स’विषयी-

दर दोन मिनिटानंतर ‘कसं असतं ना..!’ अशा वाक्याने सुरुवात करणे, अगदी ठरावीक टीव्ही मालिकाबाज साचेबद्ध भाषा बोलणे, प्रेक्षकांच्या अंगावर ‘क्लोज अप्स’चे धाड धाड आवाज करणारे बॉम्बगोळे फेकून त्यांच्या नेत्र आणि मनाला विदीर्ण करणे, सासूचे चार दिवसच सांगून ते हजारांच्याही पलीकडे नेणे किंवा अगदी चावून चोथा झालेल्या विषयांवरील टीव्ही मालिका या सर्व कारणांमुळे घरातील तरुण मंडळीचं त्यांच्या घरातच दररोज संध्याकाळी सहा ते दहा मानसिक शोषण होतं; पण सांगणार कुणाला, करणार काय! अशा वेळी चार तास आपापले चलदूरध्वनी काढून सोशल साइट्सवर रमणे हा एक पर्याय सोशिक तरुण मंडळींकडे असतो.

टीव्ही मालिकांच्या रूक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात ‘लगान’मधील गावकऱ्यांप्रमाणे आम्ही तरुण मंडळी आकाशाकडे डोळे लावून होतो. ‘जब जब धरतीपे पाप का आतंक बढा तब उसे खतम करने जाते है त्रिदेव!’ (नव्वदच्या दशकात नसिरुद्दीन शहा यांच्या व्हॉइस ओव्हरमध्ये समस्त मानव जातीला दिलेला विश्वास शेवटी खरा ठरला.) टीव्ही मालिकेच्या शुष्क वाळवंटात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आम्हा तरुण गावकऱ्यांसाठी घनन घनन घन.. वरून वरुणदेव धावून आला.

हो ते आलेत.. आम्ही पाहिलं.. (आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत.. जिंकताहेत.

त्या लाइफ सेव्हर गोष्टीचं नाव म्हणजे वेब सीरिज!

टीव्ही वा चित्रपटात संवादाच्या भाषेचा स्तर वापरताना, दृश्य दाखवताना सेन्सॉर बोर्डाची टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळे मनाप्रमाणे हवं ते (आणि प्रेक्षकांनाही हवंच असतं ते) दाखवता, बघता येत नाही. म्हणून नेहमीप्रमाणे साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय, ‘आणि कसं असतं ना.’ अशी सतत वाक्यं अंगावर टाकावी लागतात. जी तरुण प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्यात जातात; पण वेबसीरिज या यू टय़ूबवर किंवा त्यांच्या अ‍ॅपवर असल्या कारणाने तिथे सेन्सॉरची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्या यापासून ‘पहलाज’ . परहेज करावा लागत नाही. हे सारे पदार्थ वेब सीरिजमध्ये मोकळेपणाने वाढलेले असता प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात आणि आजच्या तरुण पिढीचं हे वाक्यच आहे ‘गुगल हमारी माता है और यू ट्यूब हमारा पिता!’

शिवाय तीस मिनिटांच्या एपिसोडमध्ये दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनस्ताप वेब सीरिजमध्ये नसतो. इथे सासूचे चार दिवस चार हजार न होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळे थोडक्यात मजा होते आणि अति परिचयात अवज्ञा टळते. वेब सीरिजचे जास्तीत जास्त पाच ते सात एपिसोड्स असतात; पण या सगळ्यात जमेची बाजू म्हणजे निरनिराळ्या, नाजूक, जड विषयांना हात घालून मालिका तयार केली जाते, जी प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालते, स्पर्श करते. यामुळे वेब सीरिजचं प्रस्थ, क्रेज वाढतेय.

‘पर्मनंट रूममेट्स’, ‘लिटल िथग्स’, ‘ट्रिपिलग’, ‘लव बाइट्स’, ‘आयेशा’ या काही हिट आणि लोकप्रिय मालिका आहेत. ‘पर्मनंट रूममेट्स’ ही सर्वार्थाने लोकप्रिय, हृदयाला स्पर्श करणारी, मनापासून हसवणारी, विचार करायला लावणारी मालिका आहे. बिस्वपती सरकार याने ‘पर्मनंट रूममेट्स’चा पहिला सीझन लिहिला. बंगाल हे राज्य  साहित्य, कला, विचारवंत यासाठी शतकांपासून प्रसिद्ध आहेच. शुजित सरकार, दिवाकर बॅनर्जी, सुजॉय घोष इत्यादी उच्चस्तरीय बंगाली दिग्दर्शक प्रसिद्ध आहेतच. आता हा पर्मनंट रूममेट्स लिहिणारा आणखी एक हुशार, आजच्या काळातील बंगाली लेखक.

प्रफुल व्यास या िहदी रंगभूमीशी जोडलेला अभिनेत्याला आजवर काही चित्रपटात छोटय़ा भूमिका करताना पाहिलं आहे. त्यात त्याचं खरं अभिनय कौशल्य कधी दिसलंच नाही. पर्मनंट रुममेट्समधून मात्र त्याला मनसोक्त, मोकळेप्रमाणे स्वत:चं कौशल्य दाखवता आलं. त्याच्याकडे असलेली जबरदस्त अभिनयाची जाण, शरीराची भाषा, विनोदाचं टायिमग हे सारं या सीरिजमधून दाखवता आलं. कोणीही प्रेमात पडेल अशी भूमिका त्याने साकारली आहे.

निधी सिंग ही आजवर यूटय़ूबवर छोटय़ा व्हिडीओजमध्ये काम करायची. तिची स्वत:ची अशी खास ओळख नव्हतीच. पण तिने पर्मनंट रूममेट्समध्ये साकारलेली भूमिका तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते. प्रचंड अभिनय क्षमता, आवाजावर पूर्ण नियंत्रण, संवाद, शब्दफेक अगदी आजच्या काळातील भूमिकेसाठी योग्य. या मालिकेमुळे निधी सिंग राष्ट्रीय स्तरावर स्टार झाली आहे. तिने नुकतेच दोन चित्रपट स्वीकारले असून एकाचं शूटिंग नुकतंच संपलं आहे.

पर्मनंट रूममेट्स ही गोष्ट आहे एका तरुण जोडप्याची. ते तीन वर्षांपासून लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यापूर्वी १५ दिवसच त्यांनी सोबत घालवले आहेत. मिकेश चौधरी आणि तानिया नागपाल अशी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. मिकेश हा बराचसा बावळट, मनाने अत्यंत चांगला, त्याच्या नोकरीच्या कामात हुशार असलेला, सतत ऑनलाइन शॉिपग करत असलेला आणि त्यात फसणारा, अमेरिकेत तीन वष्रे नोकरीसाठी राहिलेला तरुण मुलगा असतो. तो तानियाला सरप्राईज द्यायचं म्हणून भारतात, मुंबईत ठरल्यापेक्षा एक महिना लवकर येतो. विमानतळावरून सरळ तानियाच्या फ्लॅटवर जातो आणि तिला लग्नासाठी प्रपोज करतो.

तानिया म्हणजे निधी सिंग ही व्यावहारिक, काहीशी तापट, नात्यात गोंधळ उडालेली आणि संपूर्ण दोष मिकेशला देणारी, लग्नाचा निर्णय घेताना प्रचंड गोंधळात पडलेली आणि त्याचा राग मिकेशवरच काढणारी तरीही नात्याचं महत्त्व जाणणारी ही मुलगी. ती निधी सिंगने अप्रतिम रंगवली आहे. यांच्या सोबत इतर पात्रे रंगवणारे कलाकारही तितकेच जबरदस्त ताकदीचे आहेत. प्रत्येक एपिसोड हा पूर्णत: वेगळ्या विषयावर असतो. त्यातले संवाद अगदी सहज, आजच्या काळातील आणि आवडणारे आहेत.

कुठलीही ठरावीक ‘स्लॅपस्टिक कॉमेडी’ न करता नसर्गिकपणे परिस्थितीजन्य आणि शाब्दिक विनोद  आहेत. सर्व भावभावनांचा अंतर्भाव असलेली ही वेब सीरिज आहे. पहिला सीझन खूप लोकप्रिय झाल्यावर दुसरा सीझन आला. विविध चित्रपटांत चांगल्या भूमिका करणारा दर्शन जरीवाला, असरानी सुद्धा या मालिकेमध्ये आहे. असरानीने त्याच्या तारुण्यानंतर एक आजवरची चांगली भूमिका केली आहे. एक विघ्नसंतोषी, खवट म्हातारा असरानीने अप्रतिम रंगवला आहे. आणि या संपूर्ण मालिकेमध्ये विनोदी भूमिकेत उत्तम काम केलंय ते नवोदित कलाकार दीपक कुमार मिश्रा याने. ‘थ्री इडिएट्स’मध्ये आमिर खान, आर माधवन या बडय़ा अभिनेत्यांसमोर पहिल्यांदाच काम करणारा ओमी वैद्य जसा मनाला भावून गेला आणि भाव खाऊन गेला अगदी तसाच हा दीपक मिश्रा सपोर्टिग रोलमध्ये भाव खाऊन जातो आणि आवडतोसुद्धा.

वेब सीरिज बघताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, प्रचंड टॅलेंट असलेले कलाकार आपल्याकडे आहेत. ते आता स्वत:चा मार्ग स्वत: तयार करून त्यावर मार्गक्रमणा करीत यशस्वी होताहेत. आणि इथेच इंटरनेट सीरिज हा वेगळा प्लॅटफॉर्म ठरतो. तो प्रेक्षकांनाही भावतो. म्हणून येत्या काळात वेब सीरिजची क्रेझ वाढणार हे नक्की!

वेब सीरिज यू टय़ूबवर किंवा त्यांच्या अ‍ॅपवर असल्याने तिथे सेन्सॉरची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्या या साऱ्याचा तरुण प्रेक्षक मनापासून आस्वाद घेताना दिसतात.
अभिजीत पानसे – response.lokprabha@expressindia.com