तरुणाईच्या सृजनशीलतेला, ऊर्जेला साद घालणारा दर्जेदार उत्सव म्हणजे सेंट झेवियर्सचा मल्हार फेस्टिव्हल. यंदाच्या या फेस्टिव्हलमध्येही नेहमीप्रमाणे उत्साह, आनंद, जल्लोश होता.

हेच भरकटणे उद्या होईल

मग माझी दिशा

फक्त माझा एकदा

तारा चमकला पाहिजे

चंद्रशेखर सानेकरांच्या या शेरप्रमाणे आजची तरुणाई धडपडत का होईना, काही नवीन घडवण्यासाठी प्रयत्न करते आहे. सगळ्यांना सगळ्याच गोष्टींचं शास्त्रशुद्ध शिक्षण नाही हे अजूनही जाणवतं, पण ही त्यांची धडपडच त्यांना भविष्यात उत्तमतेकडे नेणारी आहे, सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार २०१६’ महोत्सवाच्या िहदी बॅण्ड स्पध्रेवेळी परीक्षक मिथिलेश पाटणकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सृजनाचा मूíतमंत आविष्कार म्हणजे झेवियर्स कॉलेजचा ‘मल्हार’! दरवर्षी मल्हार नवीन थीम घेऊन कॉलेज तरुणांना आव्हान देत असतो. या वर्षीची थीम ‘द जंक्शन’ अर्थात जिथे विविध संस्कृती आणि कला हातात हात गुंफून चालतात. प्रत्येक स्पध्रेच्या आयोजनात या ‘जंक्शन’चा समावेश होता. जिथे स्पर्धकांच्या सर्जनशीलतेला अमाप वावही होता आणि खडतर आव्हानही!

िहदी बॅण्डसाठी जुन्या िहदी गाण्यांना नवा स्वरसाज चढवण्याचं शिवधनुष्य स्पर्धकांनी पेललं होतं. बहुतेकांनी केवळ रेट्रो गाणी निवडलेली असताना एका गटाने मात्र टिपिकल फिल्मी गाणं निवडण्याऐवजी शास्त्रीय बाज असलेलं गाणं निवडलं आणि त्यातही नवीन प्रयोग करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. िहदी बॅण्डमध्ये शहनाई, बासरीसारख्या भारतीय वाद्यांचा आवर्जून समावेश त्यांनी केला. इंग्रजाळलेल्या वातावरणात आपली संस्कृती आणि ‘भारतीय’पण टिकवून ठेवण्याचा हा ‘दर्जेदार’ प्रयत्न होता.

‘जंक्शन’च्या थीमला अनुसरून सगळ्याच स्पर्धाची रचना होती. ज्यात िहदी बॉलीवूड डान्सचाही समावेश होता. बॉलीवूड गाण्यांवर नृत्य करायचं असलं तरीही त्यातून सामाजिक संदेश देणं या स्पध्रेच्या नियमांत अनिवार्य होतं. मनोरंजन आणि समाजभान यांचा कलात्मक संगम ‘जंक्शन’साठी अत्यंत अनुरूप होता. स्पर्धकांनीही आपलं सगळं नृत्यकौशल्य पणाला लावून त्यात जीव ओतला. सामाजिक संदेशात शेतकरी आत्महत्या, बेटी बचाओ, दारूबंदी हे विषय तर मांडले गेलेच, मात्र नव्याने समोर येत असलेले समलंगिकता, तृतीयपंथीयांचं सामाजिक स्थान अशा विषयांनाही आजच्या सजग तरुणाईने हात घातला. इतर विषयांसोबतच या विषयांबद्दलदेखील तरुणाईला असलेली आस्था त्यांच्या सादरीकरणातून दिसून आली.

‘तीन तिगाडा, काम बिगाडा’ या िहदी थिएटर इव्हेंटमध्ये अत्यंत कमी वेळात रंगमंचावर आपली कला दाखवण्याचं, दिलेल्या विषयाला हात घालण्याचं आणि दिलेले सगळे नियम व अटी पाळण्याचंही आव्हान स्पर्धकांना पेलायचं होतं. तीस सेकंदांची एक फ्रेम त्यात असली पाहिजे, अशीसुद्धा अट या स्पध्रेत होती. ‘कन्फ्युजन’ अर्थात ‘गोंधळ’ ही या स्पध्रेमागची मूळ संकल्पना होती आणि या मुद्दय़ाला धरूनच त्याभोवती फिरणारी छोटी नाटिका बसवणं अपेक्षित होतं. मन आणि मेंदू शांत आणि एकाग्र करून मनातला गोंधळ दूर करा, असा संदेश देणाऱ्या एका गटाच्या नाटुकलीला प्रेक्षकांनी आणि परीक्षकांनी मनापासून दाद दिली. तरुणाईच्या प्रतिभेचे नवनवीन आविष्कार त्यांच्यातील केवळ सर्जनशीलताच नव्हे तर प्रगल्भताही दर्शवत होते. आपल्या आजूबाजूच्या परिसराचं, समस्यांचं, समाजाचं, संस्कृतीचं आणि घडामोडींचं तरुणाई किती सजगपणे अवलोकन करते हे त्यांच्या सादरीकरणातून आणि कल्पकतेतून दिसून आलं.

प्रायोगिक रंगभूमीवर नवनवीन कलाकारांनी आपली कला आणावी या हेतूने प्रायोगिक रंगमंचाच्या ‘द कर्टन कॉल’ या स्पध्रेमध्ये नरकातल्या सर्व दुष्ट शक्ती तिथून गायब होऊन पृथ्वीवर आल्या आहेत या थीमच्या आधारे पंधरा ते वीस मिनिटांची नाटुकली बसवायची होती. या कल्पनेचा प्रत्येक गटाने वेगवेगळ्या पद्धतीने विस्तार केला आणि प्रत्येक नाटुकलीतून आसपासच्या वातावरणाचा आणि दिलेल्या संकल्पनेचा संबंध जोडलेला दिसून आला. अशा स्पर्धाच्या माध्यमातून ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करणाऱ्यांना अधिक चालना मिळेल आणि नवनवीन प्रयोग रंगभूमीवर होतील अशी आशा नाटय़सृष्टीने करायला हरकत नाही.

ज्या तरुणाईवर आपण संस्कृती पुसून टाकण्याचे आरोप करतो, तीच तरुणाई आपली संस्कृती, आपल्या पद्धती किती उत्तम प्रकारे जपते हे लोकनृत्यासारख्या स्पर्धामधून दिसून आलं. लोकनृत्य केवळ सादर करणं हीच एक कला नव्हे तर त्याच्या मागे त्या विशिष्ट नृत्याचा, त्या प्रांताचा, तिथल्या भौगोलिक, सामाजिक आणि आíथक परिस्थितीचा, तिथल्या संस्कृतीचा सखोल अभ्यास असणं गरजेचं असतं. नृत्यात केवळ त्याचं सादरीकरण करणारेच कलाकार असतात असं नव्हे तर नृत्य बसवणारे, नृत्यासाठी वेशभूषा ठरवणारे, नृत्याची संस्कृती शोधून काढणारे अशा अनेक कलाकारांचा त्याला हातभार लागलेला असतो. एकाच प्रांतातले अनेकविध नृत्यप्रकार या स्पध्रेतून दिसून आले.

तरुणाईला शास्त्रीयदृष्टय़ा प्रगल्भता नाही असं मत असणाऱ्या अनेकांना तोंडात बोटं घालायला लावेल अशा तयारीने आणि ताकदीने शास्त्रीय संगीत गायन स्पध्रेत स्पर्धक गायले. आजची तरुणाई अध्र्या हळकुंडाने पिवळी आहे, कशाचंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यात त्यांना रस नाही असं म्हणणं असणाऱ्या सगळ्यांना सूरमय उत्तर या स्पर्धकांनी दिलं. कर्नाटकी किंवा िहदुस्थानी अशा दोन शैलींपकी एक निवडून त्यातली बंदिश, तराणा आणि भजन किंवा नाटय़गीत असं सादर करण्याचं स्पर्धकांवर बंधन होतं, तेही ठरावीक वेळेत आणि ठरावीक क्रमाने! त्यात काहींनी सूर साथीला असावा म्हणून इलेक्ट्रॉनिक तानपुरा किंवा तालासाठी इलेक्ट्रॉनिक तबला यांची साथ घेतली; एका स्पर्धकाने मात्र प्रत्यक्ष तबला आणि संवादिनी आणून, त्यासाठी साथीदार आणून आपलं गायन सादर केलं. तरुणाईची झोकून देऊन शिक्षण घेणं आणि उत्तमतेसाठी रियाज करणं या दोन्हीची तयारी यातून प्रकर्षांने समोर आली.

यू. व्ही. लाइट परफॉर्मन्स ही ‘मल्हार’ची खासियत! सामान्यत: कोणत्याही कॉलेजच्या महोत्सवात सादर न होणारा हा कलाप्रकार. संपूर्ण काळोख्या थिएटरमध्ये केवळ यू. व्ही. लाइट्सच्या माध्यमातून दिलेल्या कन्सेप्टवर नृत्यनाटय़ सादर करणं आणि त्यासाठी लागणारी तयारी केवळ एका मिनिटात करणं अशी दोन्ही आव्हानं स्पर्धकांनी एकावेळी समर्थपणे पेलली. हा एक ग्रुप इव्हेंट होता ज्यात दिसणारे लोक कमी आणि त्यामागची टीम मोठी होती. प्रत्यक्ष दिसणारे लोक वेगळे आणि वातावरणाचा आभास निर्माण करायला त्यांना मदत करणारे वेगळे अशा सगळ्यांचंच कौशल्य पणाला लागलं होतं. झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हा इव्हेंट सर्वात प्रेक्षणीय मानला जातो आणि याच कारणासाठी तो दरवर्षी शेवटच्या दिवशी सगळ्यात शेवटी आयोजित केला जातो.

‘मल्हार २०१६- द जंक्शन’च्या मूळ संकल्पनेला धरूनच सर्व स्पर्धाची आखणी केली गेली होती. प्रत्येक स्पध्रेत स्पर्धकांना एकापेक्षा जास्त आणि विविध प्रकारची, विविध पातळीवरची आव्हानं पेलायची होती. स्पर्धक आणि आयोजक या सर्वानी मिळून दरवर्षीप्रमाणे ‘मल्हार’ जल्लोशात आणि दिमाखात साजरा केला.

मल्हार‘वारी’चे नियोजन

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा ‘मल्हार’ फेस्टिव्हल पाहिला की जाणवते ती आजच्या तरुणाईची मेहनत, सृजनशीलता आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती. आणि हे सगळं रसायन एकत्र येऊन थीम होते – मल्हार ‘कॉनक्लेव्ह’! आशिया खंडातील मोठय़ा फेस्टिव्हल्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणारा मल्हार इतका भव्यदिव्य ठरतो तो चोख ‘नियोजना’मुळे.

‘मल्हार’चं नियोजन हा त्याच्या यशस्विततेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या नियोजनात कमालीची सुसूत्रता आणि शिस्त असते.

‘मल्हार’च्या गेटपासूनच त्यांचं नियोजन सुरू होतं. व्हीआयपी, पाहुणे, पत्रकार यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आणि पासधारी व्यक्तींना वेगळी अशी विभागणी जरी असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सगळी काळजी घेतली जाते. ‘मल्हार’च्या नियोजनाचं सगळ्यात मोठं श्रेय त्याच्या कार्यकर्त्यांना जातं. त्यांच्या आदरातिथ्यात आपुलकी असते. व्यवस्थापन करताना प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीसोबत एक स्वीय-सहकारी दिला जातो, जो तुम्हाला तिथे घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मिनिटा-मिनिटाला अपडेट्स देत राहतो. एखाद्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यास विलंब होणार असेल तर दिलगिरी व्यक्त करायला न विसरता हा सहकारी काही इतर महत्त्वाच्या गोष्टी दाखवून वेळ सत्कारणी लावतो, जसे पुस्तक प्रदर्शन, सह-प्रायोजकांचे स्टॉल्स, वगरे.

एकाच वेळेस अनेक प्रकारचे इव्हेंट्स तेथे घडत असल्याने त्या प्रत्येक इव्हेंटला आपली हजेरी कशी लागेल, याचा पुरेपूर आणि प्रामाणिक प्रयत्न केला जातो. नियोजनाचा भाग म्हणून त्यांना हे सगळं करणं अनिवार्य असतं आणि तितक्याच प्रेमाने ते करतातसुद्धा. कारण प्रत्येक वर्षीचा अनुभव हा नवीन काहीतरी शिकवणारा असतो. आणि त्याचप्रमाणे पुढील वर्षांकडे तो अनुभव ‘पासऑन’ करायचा असतो.

‘मल्हार’च्या नियोजनासोबतच त्यांच्या स्पर्धाप्रकारातलं वैविध्यही बरंच काही सांगून जातं. प्रत्येक स्पर्धाप्रकारात सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मग ती ‘हिंदी डान्स इव्हेंट’सारखी स्पर्धा असो किंवा ‘लोकनृत्य स्पध्रे’तून पारंपरिक लोकनृत्याला दिलेली उजळणी असो. सामाजिक अनुभूती हा ‘मल्हार’चा पाया आहे. त्यातून तरुणांना प्रगल्भ करण्याचा त्यांचा मानस हा बऱ्याच अंशी सफल झालेला दिसतो.

तरुणाईला झगमगीत आणि चंदेरी जगाचं आकर्षण प्रचंड असतं. अशीच काहीशी दुनिया ‘मल्हार’मध्ये अनुभवता येते. बऱ्याचदा िहदी सिनेसृष्टीतील तारे-तारका येथे हमखास हजेरी लावतात. मग ती यादी नसिरुद्दीन शाह, शर्मिला टागोर यांच्यापासून सुरू होऊन मराठीतील नकुल घाणेकरांपर्यंत येते. हे सेलिब्रिटी चेहरे ‘मल्हार’ चिरतरुण असण्याची साक्ष देतात. एवढा मोठा फेस्ट उभारत असताना त्यांच्या शिक्षकांचीही त्यात मोजकीच, पण मोलाची भूमिका आहे. या सगळ्यात कुठेही शिक्षक अवाजवी मार्गदर्शन करताना दिसत नाहीत. दरवर्षीचा ‘मल्हार’ हा मनात नव्याने ऊर्जा देणारा असतो, पण त्याचसोबत तो संपताना पुढील वर्षांचं आतुरतेनं निमंत्रण देणाराही असतो. व्यवस्थापन, नियोजन आणि सामाजिक बांधिलकी या त्रिकुटाच्या आधारावर ‘मल्हार’ची तरुणाई प्रभाव टाकणारी ठरत आहे.
– सौरभ नाईक

वेदवती चिपळूणकर – response.lokprabha@expressindia.com