देशातील वार्षिक तापमानाच्या सरारीमध्ये गेल्या ११० वर्षांच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून समुद्र पातळी तसेच समुद्र पृष्ठभागाच्या तापामानतही वाढ झाल्याचे भारतीय विज्ञान अकादमीने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. देशातील हवामान बदल ही चिंताजनक बाब असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचा सूर आयआयटी मुंबईत पार पडलेल्या ‘भारतातील हवामान बदलाच्या समस्या’ या विषयावरील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडला.
हवामान बदलासंदर्भातील समस्यांचे सामान्यांना ज्ञान व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान अकादमीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देशातील हवामान बदलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज'(आयपीसीसी)ने नुकत्याच सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत तज्ज्ञांनी आपली मते मांडली आणि उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. देशातील वाढत्या तापमानामुळे बर्फाचे डोंगरही वितळत असून उत्तराखंडातील पुरालाही हेच कारण असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
वातावरणात वाढणारे कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण हेही हवामान बदल दर्शविण्यास पूरक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या ५० वर्षांचा अभ्यास केला असता दीर्घकाळ टिकणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होत असून हाही हवामान बदलाचाच फटका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या परिसंवादात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्राध्यापक व्ही. राजमणी, अहमदाबाद येथील भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेचे प्रा. आर. रमेश, दिल्ली विद्यापीठाचे प्रा. देवेश सिन्हा, आयआयटी मुंबईचे प्रा. सुबिमल घोष, आयएआयआयचे डॉ. कैलाश बन्सल, मलेरिया इन्स्टिटय़ूटचे डॉ. आर. सी. धिमान, आयआयटी दिल्लीचे प्रा. कृष्णा अच्युता राव आणि बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे प्रा. एम. एस. शेषशायी सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.