मराठी संस्कृतीच्या रथाचा आस म्हणजेच संत साहित्य होय. त्याची प्रतिष्ठा जोपर्यंत आहे तोपर्यंत हा रथ वेगानेच धावत राहील. संत साहित्य हाच सर्व प्रकारच्या मराठी साहित्याचा पाया आहे. त्यामुळे वाचनालयांना, ग्रंथालयांना संतांची नावे देणे हे अतिशय औचित्यपूर्ण व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक चकोर बाविस्कर यांनी केले.शहरातील द्वारका परिसरात असलेल्या माणेकशा नगरात संत नामदेव वाचनालयाचे उद्घाटन बाविस्कर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बाविस्कर यांनी संत नामदेवांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य याविषयी माहिती देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते ‘महानामा’ या नामदेव कार्याचे विराट स्वरूप मांडलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे संपादक सचिन परब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. परब यांनी संत नामदेवांच्या भारतव्यापी कार्याचे महत्त्व उलगडून दाखवले. सातशे वर्षांपूर्वी एक मराठी संत पाचवेळा भारताची परिक्रमा करतो आणि अन्याय, अत्याचार यांनी भरडून निघालेल्या पंजाबात वास्तव्य करतो हे मोठे आश्चर्य आहे. त्यांचा प्रभाव तिथे अजूनही टिकून आहे हे तर त्याहीपेक्षा अद्भुत. असे असताना मराठी माणसाला या अखिल भारतीय नामदेवांची फारशी ओळखच झाली नाही हे दुर्दैव म्हटले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.