खंडणीसाठी गेल्या पंधरा वर्षांत क्रूरकम्र्यानी सात निष्पाप बालकांचा बळी घेतल्याचे युग चांडकच्या (वय ८) निर्घृण खुनानंतर स्पष्ट झाले आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशा भावना व्यक्त केली जात आहे.
बालकांचे अपहरण केल्यास हवे ते साध्य होते, या हेतूने आरोपी बालकांचे अपहरण करू लागले आहेत. परंतु आपण पूर्ण घेरलो गेल्याचे कळताच आरोपी या निष्पाप मुलांची हत्या करतात. शहरात गेल्या पंधरा वर्षांपासून या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशा घटना घडल्यानंतर समाजात तीव्र संतापाची लाट निर्माण होते. ही लाट शांत होताच पुन्हा दुसरी घटना घडते आणि जुन्या घटनेला उजाळा मिळतो. २९ मे २००० रोजी आरोपींनी अंबाझरी भागातून आदित्य पारेख याचे अपहरण केले. या घटनेला चौदा वर्षे पूर्ण झाले तरी आदित्य पारेखही सापडला नाही आणि आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत.
या घटनेनंतर चार महिन्यानेच २५ सप्टेंबर २००० रोजी गांधीबागेतून हरेकृष्ण ठकराल या बालकाचे अपहरण करण्यात आले. हरेकृष्णाचे अपहरण करण्यासाठी घरातील नोकर विनोद श्रीपात्रे याची मदत घेण्यात आली होती. विनोदचा उमरेड मार्गावरील मकरधोकडा शिवारात खून करण्यात आला. तर हरेकृष्णाचा मृतदेह वाशीम जिल्ह्य़ातील एका जंगलात आढळला होता. या दोन घटनांनी शहर हादरले असतानाच इमामवाडा भागात राहणाऱ्या फेंडर कुटुंबातील एका चिमुकल्याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. त्याचा मृतदेह पोत्यात गुंडाळून मेडिकल कॉलेजच्या परिसरातील झुडपात फेकण्यात आला होता. ११ ऑक्टोबर २०११ रोजी हिवरीनगर भागातून कुश कटारियाचे (वय ८) अपहरण करण्यात आले. त्याचा सूर्यनगरातील एका अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत खून करण्यात आला. या घटनेने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या घटनेतील आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिक करत होते. या घटनेतील आरोपी हा घराशेजारी राहणारा आयुष पुगलियाच निघाला. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याने या शिक्षेविरुद्ध अपील केले आहे.
१० जून २०१३ रोजी खापरी येथील यश उर्फ साहिल नितीन बोरकर या चिमुकल्याचे दोन लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. मिहानमधील प्रशासकीय इमारतीच्या उड्डाणपुलाखाली त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. चार वर्षांंपूर्वी अत्रे ले-आऊट येथील शिकवणी वर्गासाठी आलेल्या सारंग ढुमे याचे अपहरण करून वाडी येथे हत्या करण्यात आली होती. तो दहावीचा विद्यार्थी होता. १ सप्टेंबरला छाप्रूनगरातून युग चांडक याचे अपहरण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी लोणखैरी-पाटणसावंगी मार्गावरील बाभुळगाव शिवारातील एका नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या सर्व घटनांच्या इतिहासात डोकावले तर अंगावर शहारे येतात, एवढे क्रौर्य यातील आरोपींनी दाखवले आहे.