गेल्या काही दशकात राजकारणात प्रचंड उलथापालथ घडत आल्या आहेत. राजकारण जसे बदलत गेले तस तसे राजकीय पक्षांचे वर्तनही बदलत गेले. परिणामी, त्या पक्षातील कार्यकर्ते ते नेत्यांपासून पक्षांतराचा प्रघातही झपाटय़ाने आला. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरापर्यंत जाण्याच्या प्रवृत्तीतून पक्षांतराचा आलेख उंचावतच राहिला. मात्र, सर्वाचेच पक्षांतर यशस्वी ठरले, असे नाही. योग्य वेळी योग्य पक्षात गेलेल्यांचेच हीत साधले गेले. भाजपातून इतर पक्षात विशेषत: काँग्रेसमध्ये गेलेल्यांच्या पदरी निराशा, तर काँग्रेस व इतर पक्षातून भाजपात आलेल्यांच्या झोळीत यश आले. यात प्रामुख्याने कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, नाना श्यामकुळे, संध्या गोतमारे आणि सेनेतील कृपाल तुमाने यांचा समावेश आहे.
एकेकाळी सतीश चतुर्वेदींचा उजवा हात मानले जाणाऱ्या कृष्णा खोपडे यांनी अचानक काँग्रेसला रामराम ठोकून १९९२ मध्ये भाजपात कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. अनेकदा पक्षबदल निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होतो, पण खोपडे यांच्याबाबत तसे घडून आले नाही. काहीही अपेक्षा न ठेवता एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी भाजपात काम सुरू केले. भाजपाची यशस्वी रेकॉर्डब्रेक सदस्यता नोंदणी त्यांच्या कार्यकाळातच यशस्वी झाली. या कामाचे फलित त्यांना नगरसेवकपदापासून मिळायला लागले. चारदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर उपमहापौरपदी ते विराजमान झाले. त्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची खुर्ची त्यांनी मिळवली. २००९ मध्ये सतीश चतुर्वेदींच्या विरोधातच त्यांनी निवडणूक लढवली आणि सुमारे ३० हजार मतांनी विजय मिळवला. खोपडे यांच्यासारखीच स्थिती सुधाकर देशमुखांबाबतही घडून आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करीत असतानाच वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचीही चव चाखली. खोपडेंप्रमाणेच त्यांनीही कार्यकर्त्यांपासून प्रवास सुरू केला. पुढे त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. अनिस अहमद यांच्यासारख्या काँग्रेसच्या मुरलेल्या मातब्बराला त्यांनी चीत केले.   नाना श्यामकुळे हे कोणे एकेकाळी रिपाइंचे दमदार नेता होते. गटागटात विभागलेली रिपाइं शेवटची घटका मोजत असताना श्यामकुळे यांनी भाजपाचा हात पकडला. भाजपाला त्यावेळी दलित चेहरा हवा होता आणि श्यामकुळेंच्या रूपाने त्यांना तो मिळाला. भाजपात प्रवेश केल्यावर ते दोनदा नगरसेवक झाले. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आणि चंद्रपूरची जागा आरक्षणात गेल्यानंतर तेथून लढण्याची संधी त्यांना मिळाली. या आमदारांच्या स्नुषाही आता नागपूर महापालिकेच्या नगरसेविका आहेत.
हिंगण्यातील काँग्रेसची कार्यकर्ती आणि नंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिरवणाऱ्या संध्या गोतमारे यांचे काँग्रेसशी बिनसले. २००७ पासून काँग्रेसच्या साथीने वावरणाऱ्या संध्या गोतमारे यांनी २०१२ मध्ये भाजपात प्रवेश केला. महिला आरक्षित अध्यक्षपदामुळे आणि हिंगण्यातील वर्चस्व कायम राखायचे असल्यामुळे गोतमारेंला संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवून त्यांनी ती जिंकून दाखवली.  
याच यशस्वी पक्षांतरात कृपाल तुमानेही आहेत. त्यांनी २००८ मध्ये सेनेत प्रवेश केला. २००९ मध्ये त्यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळाली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. या पराभवाचा वचपा त्यांनी अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काढला. प्रचंड मताधिक्य मिळवून ते यशस्वी ठरले.

मुद्दय़ावर आधारित पक्षांतर
देशभरात वादळ उठतील अशा कित्येक घटना राजकीय क्षेत्रात घडल्या, पण राममंदिर-बाबरी मस्जीद नावाचे वादळ अनेक वर्षे घोंगावत राहिले. अजूनही त्याचे पडसाद काही प्रमाणात दिसूनच येत आहेत. या लाटेत अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांचे हात धुवून घेतले. १९८४ मध्ये लोकसभेत अवघी दोन सदस्य संख्या असणाऱ्या भाजपची सदस्य संख्या १९९१ मध्ये १२० वर येऊन पोहोचली. विविध पक्षातील नेत्यांनी त्यावेळी पक्षांतर करीत भाजपात प्रवेश केला. त्यावेळी या पक्षांतरात सहभागी असणारे नागपुरातील एकमेव बनवारीलाल पुरोहित होते.काँग्रेसमध्ये असताना खासदारकीच्या तीन खेळी यशस्वीरित्या खेळल्यानंतरही पुरोहितांना भाजपचे आकर्षण वाटावे, याबद्दल अनेकांनी त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले. राममंदिर-बाबरी मस्जीद प्रकरणाला १९८९ मध्ये सुरुवात झाली आणि ६ डिसेंबरला बाबरी मस्जीदचा ढाचा पूर्णपणे कोसळला. संघाने सुरू केलेल्या या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेनेही साथ दिली आणि भाजपावर संघ व परिषदेचा प्रचंड पगडा आहे. त्यावेळी कुठेही नसलेला भाजपाची जिकडेतिकडे घोडदौड सुरू झाली. या घोडदौडीत १९९१ मध्ये पुरोहितही सामील झाले. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले. मात्र, ही विजयी घोडदौड त्यांना टिकवून ठेवता आली नाही. २००४ मध्ये त्यांना पराभवाचा फटका बसला आणि २००९च्या निवडणुकीतही तो कायम राहिला. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य असले तरीही त्यांचे अस्तित्त्व मात्र फारसे दिसून येत नाही. राममंदिर-बाबरी मस्जीद प्रमाणेच वेगळा विदर्भ नावाचे वादळही गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात घोंगावत आहे. विदर्भाच्या मुद्दय़ावर सर्वाधिक पक्षांतर करण्याचा मान जांबुवंतराव धोटेंकडे जातो.