हिमालयाच्या कुशीत टिहरी गढवालमधील धंगण या लहानशा गावात जन्मलेल्या लीलाधर जागुडी यांच्या काव्यप्रतिभेला निसर्गाची प्रेरणा आहे. त्यांनी हिंदूीतील साठोत्तरी कवितेला नवीन दिशा दिली. अलीकडेच त्यांना गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. संबळपूर विद्यापीठ हा पुरस्कार देते. ओडिशाचे कवी गंगाधर मेहेर यांच्या नावाने गेली २५ वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. त्यांना यापूर्वी साहित्य अकादमी, रघुवीर सहाय सन्मान, शतदल व नमित पुरस्कार मिळाले आहेत. कवी, शिक्षक, संपादक व पत्रकार अशी त्यांची ओळख. हिंदीतून एम.ए. केल्यानंतर त्यांनी गढवाल रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून काम केले. नंतर अनेक शाळा व महाविद्यालयांत अध्यापन केले. नंतर ते माहिती व जनसंपर्क खात्यात उपसंचालक बनले. त्यांनी नऊ कवितासंग्रह लिहिले असून प्रौढ साक्षरांसाठी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ‘अनुभव के आकाश में चाँद’ हा त्यांचा अनेक पुरस्कारविजेता काव्यसंग्रह आहे. त्यात अनेक सामाजिक प्रश्नांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या कवितांत आठवणींची रचना एका विशिष्ट लयीत केलेली दिसते. ‘अनुभव के आकाश में चॉँद’ या काव्यसंग्रहाने हिंदूीत मोठी भर घातली आहे. ‘नाटक जारी है’, ‘शंखा मुखी शिखारो पर’ हे त्यांचे इतर काव्यसंग्रह. त्यांना २००४ मध्ये हिंदी साहित्यातील कामगिरीसाठी पद्मश्री किताबही मिळाला आहे. ‘उत्तर प्रदेश’ या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. ‘इस यात्रा में’, ‘रात अब भी मौजूद है’, ‘घबराये हुए शब्द’, ‘बाछी हुई पृथ्वी पर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मुलाखतींवर आधारित ‘मेरे साक्षात्कार’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्यांच्यावरची अनेक पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. त्यात ‘समकालीन कवी लीलाधर जागुडी और धुमिल’ तसेच ‘समकालीन कविता और लीलाधर जागुडी’ या दोन पुस्तकांचा समावेश आहे. १९९७ मध्ये त्यांना ‘अनुभव के आकाश में चॉँद’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. उत्तराखंडमधील जोशियारा येथे ते वास्तव्यास आहेत. येथील तरल निसर्गरम्य वातावरणाने त्यांना काव्यलेखनाची प्रेरणा दिली. कविता केवळ भाषेचे सौंदर्य वाढवते असे नाही तर संवादाचा अर्थ व सौंदर्य वाढवते असे ते सांगतात. जीवनातील एरवी सुटून गेलेले अनुभव ते कवितेच्या मुठीत पकडतात व त्यांना शब्दरूप देतात. समाजातील अंतर्विरोध त्यांच्या कवितांतून साकारलेला दिसतो. त्यांची कविता दुबरेध आहे, असा जो आरोप केला जातो त्यालाही त्यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या मते कविता आकलनासाठी एक संवेदनशीलता लागते ती असेल तरच तुम्हाला माझी कविता समजेल.