निवडणुकांच्या तोंडावर बाजार नेहमीच अस्थिर असतो. आगामी सार्वत्रिक निवडणुका तर देशाच्या राजकारण-अर्थकारणालाच कलाटणी देणाऱ्या ठराव्यात. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाबाबत स्पष्टता येत नाही, तोवर निदान शेअर बाजार तरी आपला कल स्पष्ट न करता, पुढचे तीन अल्पावधीत सारख्या वध-घटी दाखवीत राहील, हे निर्विवादच! मग प्रश्न येतो गुंतवणूकदारांनी करावे काय? विद्यमान स्थितीत भारताच्या भांडवली बाजारपेठेत मग ती थेट शेअर्समध्ये असो अथवा इक्विटी म्युच्युअल फंडामार्फत असो गुंतवणूक करण्याजोगी स्थिती आहे काय?
आपल्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले नेमके  प्रश्न आणि त्याची ही तज्ज्ञ उत्तरे.. ‘बिर्ला सन लाइफ एएमसी’ या आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ए. बालसुब्रमण्यम यांच्याकडून!
विद्यमान स्थितीत नव्याने गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य ठरेल का?
– अर्थव्यवस्थेतीतील घसरणीमुळे गेली काही वष्रे भारतीय भांडवली बाजारपेठही तणावाखालीच आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अर्थस्थितीत सुधारणा आल्या आहेत. जागतिक स्तरावरही अर्थव्यवस्थेत सुधाराचे संकेत आहेत. अशा स्थितीत इक्विटी (समभाग) हा उत्तम कामगिरी करू शकणारा मालमत्ता वर्ग निश्चितच आहे. गुंतवणूकदाराने दीर्घकाळाचा विचार करून त्याच्या गरजांनुसार इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे. नव्या गुंतवणूकदारांनी बाजारपेठेकरिता थांबून न राहता पद्धतशीर रीतीने गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी.
या बाजारपेठेत किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग तितकासा समाधानकारक नाही. यामागे कारण कोणते असावे?
– सामान्य गुंतवणूकदारांकडून (रिटेल) असलेला असमाधानकारक सहभाग खरोखर दुर्दैवी म्हटला पाहिजे. छोटे गुंतवणूकदारही अनिश्चितेच्या वातावरणात निश्चितता शोधण्याचा प्रयत्न करणार हे तर ओघाने आलेच. त्यामुळे हा वर्ग गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहतो. त्याची दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टे आणि गुंतवणूकविषयक ध्येये याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने या क्षेत्रातील गुंतवणूक समाधानकारक नसावी असे मला वाटते. मात्र ही स्थिती येत्या काही काळात बदलेल अशी आशा वाटते.
छोटय़ा गुंतवणूकदारांना त्यांचा कष्टाचा पसा सध्याच्या बाजारस्थितीत सुरक्षितरीत्या गुंतवण्याकरिता मार्गदर्शन काय असेल?
– गुंतवणूकदारांनी कर्ज आणि इक्विटीविषयक पर्यायांमध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. मग बाजारस्थिती काहीही का असेना. जोखीम तर टाळता येणार नाही; मात्र कोणत्याही एकाच मालमत्ता वर्गवारीवर लक्ष केंद्रित न करता वेगवेगळ्या मालमत्ता वर्गामध्ये संतुलित प्रमाणात गुंतवणूक विभागली गेल्यास जोखमीचे उत्तम व्यवस्थापन करता येणे शक्य आहे.
छोटय़ा गुंतवणूकदारांकडे वेगवेगळे गुंतवणूक पर्याय जोपासून पाहता येण्याइतपत पसा नसतो. अशा स्थितीत गुंतवणुकीचा कोणता मार्ग योग्य राहील?
– इक्विटीत गुंतवणूक करण्याकरिता एसआयपीमधून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आणि कर्जविषयक गुंतवणूक करण्याकरिता ‘रिकरिंग सेव्हिंग्ज प्लॅन’मध्ये (आवर्ती ठेव योजना) गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा उत्कृष्ट मार्ग आहे. बँकेच्या आवर्ती ठेवीसारखी ‘रिकरिंग सेव्हिंग्ज प्लॅन-आरएसपी’ काय्रे गुंतवणूकदारांना त्यांची दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात. छोटय़ा गुंतवणूकदाराने नियमित मासिक उत्पन्न सुरू होताच प्रत्येक महिन्याला कमीतकमी गुंतवणूक करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. म्युच्युअल फंडात नियमित तत्त्वावर पद्धतशीर गुंतवणूक सुरू करण्याकरिता १,००० रुपये इतकी रक्कमही पुरेशी ठरावी.
इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याकरिता कोणता कालावधी आदर्श म्हणता येईल? छोटय़ा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडामधून कशा प्रकारच्या परताव्यांची अपेक्षा करता येईल?
– इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे हे एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे आणि दीर्घ काळातील वाढीकरिता लाभ मिळवण्याकरिता गुंतवणूक कायम ठेवण्यासारखे असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक किती कालावधीची असावी याबद्दल निश्चितपणे काही सांगता येणार नाही. मात्र ३ ते ५ वर्षांचा कालावधी याकरिता आदर्श ठरावा. इतक्या दीर्घ कालावधीकरिता केलेल्या गुंतवणुकीवर साधारणत: सकल राष्ट्रीय उत्पन्नातून मिळतील त्याहून जास्त परतावा मिळतो.
येत्या दोन ते तीन वर्षांत बाजारपेठेची स्थिती कशी असेल? आणि कोणती क्षेत्रे उत्तम कामगिरी करतील?
– सर्वच क्षेत्रे उत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. त्यातही माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, वाहन, बँक या क्षेत्रात उत्तम कामगिरी होईल, असे वाटते.
भारतीय अर्थव्यवस्थेचा आगामी प्रवास तुम्ही कसा अधोरेखित कराल? महागाई आणि व्याजदर यांची स्थिती यापुढे कशी असेल?
– अर्थव्यवस्थेने आता वेग पकडण्याची अपेक्षा आहे आणि ही गती नव्या आर्थिक वर्षांतच येईल असे वाटते. येत्या वर्षांत महागाईचा दर कमी झालेला दिसून आला तरी तो पुन्हा वाढू नये म्हणून अर्थव्यवस्था आणि मिळकतीतील बचत राखून ठेवण्याकरिता व्याजदर उच्च स्तरावरच राहतील.
अल्प ते मध्यम कालावधीकरिता विचार करावयाचा झाल्यास छोटय़ा गुंतवणूकदारांकरिता कोणत्या प्रकारची क्षेत्रे आणि फंड उत्तम ठरावेत?
– गुंतवणूकदारांनी लार्ज-कॅप आणि मिड-कॅप क्षेत्रातील वैविध्यपूर्ण (डायव्हर्सिफाइड) इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल. एमएनसी फंड, आयटीविषयक फंड असे ‘सेक्टोरल’ फंडही उत्तम कामगिरी करतील.