लघू उद्योगांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच केंद्र व राज्य शासन लघू उद्योगांसाठी मोठय़ा अर्थ सहाय्याची घोषणा करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

‘यंगीस्थान फेसबुक ग्रुप’च्यावतीने आयोजित ‘बिझनेस टॉक’ या कार्यक्रमात देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले की, लघू उद्योग क्षेत्र हे उद्योगांचा कणा आहे. परंतु करोनामुळे हे क्षेत्र संकटात सापडले आहे. सध्या उद्योग क्षेत्र मोठय़ा आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील बहुतांश उद्योग ठप्प आहेत. करोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. परंतु या संकटातून बाहेर पडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या १५,००० हून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. ३ लाख कामगार रुजू झाले आहेत. उद्योग सुरू करताना कामगारांच्या वाहतुकीसाठी दुचाकींना परवानगी दिलेली आहे. उद्योगचक्र पूर्वपदावर येत आहे.

मुंबईमध्ये करोनाचा अधिक प्रादुर्भाव आहे. तरीही निर्यात केंद्रीत उद्योगांना आम्ही परवानगी दिली आहे. शेती क्षेत्राला अडचण होऊ  नये यासाठी कृषी साहित्याची निर्मिती करण्यास परवानगी दिली आह, असेही ते म्हणाले.

करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. उद्योगांना आव्हानात्मक परिस्थितीत सवलती देता येतील का याबाबत उद्योग विभाग काम करत आहेत.

लघू उद्योगांना सावरण्यासाठी लवकरच राज्य व केंद्र शासन पॅकेजची घोषणा करणार आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग त्यावर काम करत आहे. याशिवाय लघू उद्योगांचे वीजेचे स्थिर शुल्क स्थगित केले आहेत. जेवढा वीज वापर होईल, तेवढेच दर आकारले जातील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

शासनाचे उद्योगांसाठी असलेले प्रोत्साहने कामय ठेवले जातील. उद्योगचक्र गतीमान करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही देसाई म्हणाले.