भारताला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसविणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांना पर्यावरणविषयक चिंतेतून नाहक अडसर निर्माण केला जात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी केले. तथापि जागतिक पर्यावरणीय असंतुलनास विकसित राष्ट्रेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
एक्स्प्रेस समूहाचा उपक्रम ‘एक्स्प्रेस टेक्नॉलॉजी सभे’द्वारे गत शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी येथे आयोजित विशेष सत्राचे प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना गीते म्हणाले, ‘‘जितकी विकसित देशांमध्येही काळजी घेतली जात नाही, इतके आज आपण पर्यावरणाबाबत चिंता वाहताना दिसतो. खूप मोठी प्रगती करायची तर विकास प्रकल्पही येतील. पण पर्यावरणाच्या नावावर हा प्रगतीपथ अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’ आपण पर्यावरणविरोधी नाही, पण जोवर माणूस जगतो आहे तोवरच पर्यावरणाला महत्त्व आहे, माणूस नसेल तर पर्यावरण संवर्धानाला काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी केला.
या दोन दिवसांच्या उपक्रमात विविध सावर्जनिक उपक्रमांचे प्रमुख, सरकारचे प्रतिनिधी, सनदी अधिकारी आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. २८ नोव्हेंबरला तेलंगणचे मुख्य सचिव एस. नरसिंग राव यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. केवळ साजशृंगारासाठी नव्हे, तर सार्वजनिक उपक्रमांनी माहिती-तंत्रज्ञानाचा कार्यात्मक वापर केल्यास अमर्याद प्रगती करणे शक्य आहे.
प्रत्येक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने आपले ‘आयटी आराखडा’ तयार करून, त्यात विद्यमान तंत्रज्ञान स्तराला मानदंड ठरवून, भविष्यासाठी कालबद्ध नियोजन आखायला हवे, असे नियोजन आयोगाचे वरिष्ठ सल्लागार बी. एन. सत्पथी यांनी सांगितले. धोरणात्मक गरजा लक्षात घेऊन आणि स्पर्धक सार्वजनिक तसेच खासगी कंपन्यांमध्ये वापरात असलेले तंत्रज्ञान पाहून सरकारी कंपन्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा, असे त्यांनी सांगितले.
या चर्चासत्राचा समारोप केंद्रीय मंत्री अनंत गीते, डॉ. एस पी एस बक्षी, फर्टिलायजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जयवीर श्रीवास्तव आणि भारतीय अन्न महामंडळाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आलोक सिन्हा यांच्या सहभागाने आयोजित परिसंवादाने झाला. या सत्राचे समन्वयक म्हणून इंडियन एक्स्प्रेस लि.चे पूर्णवेळ संचालक आणि नव-माध्यम विभागाचे अध्यक्ष अनंत गोएंका यांनी भूमिका बजावली. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या यशस्विततेत सावर्जनिक उपक्रमांच्या योगदानासंबंधाने चर्चेने या परिसंवादात फेर धरला.
एक्स्प्रेस समूहाचा उपक्रम ‘एक्स्प्रेस टेक्नॉलॉजी सभे’च्या गत शनिवारी हैदराबाद येथे आयोजित विशेष सत्राचे प्रमुख पाहुणे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना स्मरणचिन्ह भेट देताना इंडियन एक्स्प्रेस लि.चे पूर्णवेळ संचालक आणि नव-माध्यम विभागाचे अध्यक्ष अनंत गोएंका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green concerns are raised to derail indias developmental efforts anant geete
First published on: 04-12-2014 at 12:58 IST