मुंबई : चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत १.५९ कोटींहून अधिक करदात्यांना १.५४ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने गुरुवारी दिली. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (करनिर्धारण वर्ष २०२१-२२) १.२ कोटी करदात्यांना दिलेल्या २३,४०६.२८ कोटी रुपयांचा परतावादेखील समाविष्ट आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेअंतर्गत १ एप्रिल २०२१ ते १० जानेवारी २०२२ पर्यंत १.५९ कोटी करदात्यांना १,५४,३०२ कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला गेला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने ट्वीटद्वारे दिली. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, १.५६ कोटींहून अधिक करदात्यांना ५३,६८९ कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा मिळाला आहे. यासह कंपनी कराच्या बाबतीत २.२१ लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये एक लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. वैयक्तिक करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपली. मात्र प्राप्तिकर कायद्यानुसार, ज्या करदात्यांना त्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. अशा करदात्यांना सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करणे आणि त्याचा अहवाल ऑनलाइन माध्यमातून १५ जानेवारी २०२२ पूर्वी आणि विवरणपत्र १५ फेब्रुवारी २०२२ पूर्वी सादर करणे बंधनकारक होते. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आता या दोन्हींसाठी महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे.