पीटीआय, नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील प्रतिकूल आर्थिक धक्के पचवत भारतीय अर्थव्यवस्था मजबूतपणे मार्गक्रमण करत असल्याने ‘जागतिक बँके’ने भारताच्या विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ६.९ टक्क्यांवर जाईल, असा ‘जागतिक बँके’ने सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. याआधी अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने प्रगती करेल, असे तिचे अनुमान होते. सरलेल्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेची गती अपेक्षेपेक्षा चांगली राहिल्याने तिने आपल्या आधीच्या अनुमानात बदल करून त्यात ४० आधारबिंदूची भर घातली आहे. अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये ६.३ टक्क्यांचा वृद्धीदर नोंदविल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकतेच जाहीर केले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांनी विस्तारली होती. प्रामुख्याने निर्मिती आणि खाण क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे विकासदराला खीळ बसली आहे. जागतिक पातळीसह देशांतर्गत पातळीवर उसळलेली महागाई आणि ती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून सुरू असलेल्या व्याज दरवाढ अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने प्रथमच आर्थिक विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये जागतिक बँकेने सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा अंदाज ७.५ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर आणला होता. जागतिक पातळीवरील बिघडत चाललेले बाह्य वातावरण भारताच्या विकासाच्या संभाव्यतेवर परिणाम करेल. मात्र इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत अर्थव्यवस्था तुलनेने चांगल्या स्थितीत आहे, असे जागतिक बँकेने ‘वादळातून मार्गक्रमण’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक पातळीवरील आव्हानांना न जुमानता, देशांतर्गत सुधारत असलेल्या मागणीमुळे जीडीपीमध्ये वाढ अपेक्षित आहे आणि भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असा जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांनी विश्वास व्यक्त केला. मात्र जागतिक प्रतिकूल घडामोडी कायम राहिल्याने सतत दक्ष राहणे आवश्यक आहे. पुढच्या म्हणजे २०२३-२४ आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ६.६ टक्क्यांपेक्षा किंचित कमी दराने वाढेल असा अंदाजही या अहवालाने व्यक्त केला आहे. ‘फिच’कडून ७ टक्क्यांवर विकासदर अंदाज जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या विकासदराचा अंदाज ७ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मात्र पुढील दोन वर्षांसाठी विकासदर अंदाजाला कात्री लावली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर २०२३-२४ मध्ये ६.२ टक्के आणि २०२४-२५ मध्ये ६.९ टक्के राहण्याचा अंदाज तिने वर्तविला आहे. चालू आर्थिक वर्षांत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान कायम राहणार असून जागतिक पातळीवरील प्रतिकूल धक्क्यांपासून सुरक्षित राहिल्याने अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झालेला नाही. देशांतर्गत आघाडीवर वाढलेला ग्राहक उपभोग, मागणी आणि गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्था बाह्य प्रतिकूलतेला निष्प्रभ करू शकली असल्याचे ‘फिच रेटिंग्ज’ने म्हटले आहे.