दक्षिण भारतात यंदा वेळेवर झालेले पावसाचे आगमान  आणि जवळपास चार वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिसणाऱ्या सुगीची शक्यता ही आगामी काळात सोने-मागणी बळावण्याकडेच संकेत करणारी असल्याचे सोमवारी जागतिक सुवर्ण परिषद (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) या सोने व्यापाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटेनेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम यांनी प्रतिपादन केले. यंदा पाऊस सामान्य राहण्याचे हवामान खात्याकडून अधिकृतपणे करण्यात आलेले भाकीत पाहता, सध्या सर्वाधिक मागणी असलेल्या भारताच्या ग्रामीण भागातून सोन्याची मागणी आगामी काळात अधिक राहण्याच्या शक्यतेकडेच बोट दाखविते, असे सोमसुंदरम यांनी स्पष्ट केले. सुगीबरोबरच शेतकऱ्यांच्या खिशात खुळखुळणारा पैसा हा सोन्यामध्येच परावर्तित होतो असा देशाच्या ग्रामीण भागाचा अनुभव राहिला आहे. जून ते सप्टेंबरमध्ये पाऊसपाणी चांगले राहिल्यास, त्यानंतरच्या केवळ एका तिमाहीत भारतातून सोन्याची आयात ही ३०० ते ४०० टनांवर जाऊ शकेल असा अंदाजही त्यांनी वर्तविला. सरलेल्या २०१२-१३ आर्थिक वर्षांत भारतात ८५० टन सोन्याची आयात झाली आहे.