नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच मोदी सरकारच्या काळात बँकांना बुडीत कर्जदारांकडून पैसा परत मिळविता आला, त्याउलट आधीच्या काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात अशा कर्जबुडव्यांकडून एकही पैसा वसूल झालेला नाही. कर्ज खाती अनुत्पादित मालमत्तांमध्ये बदलणाऱ्यांकडून वसुलीतील कथित अपयशाबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आधीच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढविला. विविध फसव्या कारवायांमधून बँकांच्या छोटय़ा ठेवीदारांची ज्यांनी फसवणूक केली अशा हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे नोंदवण्यासह विविध प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, असे सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना स्पष्ट केले. रिझव्र्ह बँकेकडून अॅप-आधारित वित्तीय कंपन्यांच्या फसवणुकीच्या प्रकरणावरील कारवायांवरही सरकार लक्ष ठेवून असल्याचे त्या म्हणाल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकूण कर्जबुडव्यांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर, एकूण १०,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकबाकीदारांकडून वसूल केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.