ही गोष्ट तशी आताचीच म्हणजे २००३ सालातील. मुंबई शेअर बाजाराचा एकशेचाळीस वर्षांचा कालखंड पाहता बारा वष्रे म्हणजे जास्त  दूर नाहीत. तत्कालीन कॅडबरी इंडिया कंपनीला जनतेकडील सर्व शेअर्स खरेदी करून शेअर बाजारातून सूचिबद्धता संपुष्टात आणावयाची होती. २००२ मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांनी शेअर्स खरेदीची ऑफर भागधारकांना देण्यात आली होती. त्याला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला म्हणून २००३ साली नोंदणी रद्द करण्यापूर्वी पुन्हा ५०० रु. प्रत्येक समभागासाठी देण्याची ऑफर भागधारकांना देण्यात आली. त्या सुमारास बाजारात कंपनीच्या समभागांचे व्यवहार याच किमतीच्या जवळपास होत होते.
त्याच वेळी अचानक काही दुकानदारांकडे कॅडबरीच्या डेअरी मिल्क बारमध्ये अळ्या आढळून आल्या. पूर्वीच्या काळी (२००३ मध्ये) आजच्यासारखे टीव्हीवरील अहोरात्र सुरू राहणारे बिझनेस चॅनल्स भरपूर नव्हते. ही बातमी बिझनेस चॅनलवर दाखवण्याची नसूनसुद्धा एका चॅनलवर तीन दिवस दर दहा मिनिटांनी दाखविली जात होती. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी असा विचार केला नाही की डेअरी मिल्क चॉकलेट बनविताना मिश्रण गरम केले जाते. त्यात अळ्या जिवंत राहू शकत नाहीत. म्हणजे त्या अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या वेस्टनात घुसल्या कुठून? बरं घुसल्या तर फक्त डेअरी मिल्क मध्येच! अमूल किंवा नेस्लेच्या पाकिटांत किंवा इतर गोळ्या चॉकलेटच्या बरण्यात का घुसल्या नाहीत.
सामान्य जनता असा विचार करीत नाही. लोकांनी बाजारात शेअर्स विकायला सुरुवात केली. भाव कंपनीच्या बायबॅक ऑफरच्या खाली गेले. कंपनीचे साध्य पूर्ण झाले. २००३ साली कंपनीने शेअर्सची नोंदणी बाजारातून रद्द केली.

२००० साली झालेल्या केतन पारेख घोटाळ्यामुळे सेबीच्या अधिकारांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतरची ही घटना आहे. त्या वेळेस सेबीने काही चौकशी केल्याचे वाचनात नाही. उरल्यासुरल्या भागधारकांसाठी २००६ मध्ये कंपनीने किंमत २५० रुपयांनी वाढवून नव्याने पुनर्खरेदीची ऑफर दिली. परत २००७ मध्ये प्रत्येकी ८१५ रुपयाला दुसरी ऑफर दिली. २००९ साली १,०३० रुपयांनी तिसरी ऑफर आली. या ऑफरला प्रतिसाद न देता काही भागधारकांनी ही रक्कम अत्यल्प आहे, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार २,०१४.५० रु. प्रत्येक समभागामागे देण्यात आले. परंतु चॉकलेटमधील अळ्या पाहून शेअर्स देणाऱ्यांना फक्त पाचशे रुपयेच मिळाले.
ही एकच घटना नाही. १३ सप्टेंबर २००६ रोजी साताऱ्याची युनायटेड वेस्टर्न बँक दिवाळखोर म्हणून जाहीर केली गेली. त्या सुमारास शेअर बाजारात त्या शेअर्सचा भाव २२-२३ रुपयांच्या आसपास असेल. दिवाळखोर म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केल्यावर बाजारात शेअर्सचा भाव सात रुपयांवर उतरला. आयडीबीआय बँकेने युनायटेड वेस्टर्न बँक ताब्यात घेतली. त्यांच्या दोनशेच्या वर असलेल्या शाखा, साताऱ्याची बॅकेची मूळ इमारत, बँकेच्या उपकंपन्या, इतर मालमत्ता यासाठी प्रत्येक दहा रुपयाच्या एका समभागासाठी २८ रुपयांप्रमाणे आयडीबीआय बँकेने रक्कम निश्चित केली. बाजारभाव २२-२३ रु. असताना आयडीबीआय बँकेने २८ रु. दिले. दर्शनी मूल्य दहा रुपयांपेक्षा कमी दिले असते तर गोष्ट वेगळी! मग बँक दिवाळखोर कशी? असे प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत नाही. भारतात कोणत्याही नियंत्रकाला चुकीच्या निर्णयाची शिक्षा होत नाही. दिवाळखोर म्हणून बँकेचे शेअर्स बाजारात सात रुपयांना विकणाऱ्यांचे नुकसान झाले.
जानेवारी २००९ मध्ये सत्यमचा घोटाळा उघडकीस आला. सत्यम शेअर्समध्ये फॉरवर्ड ट्रेिडग होत असल्याने शेअर्स कोसळला. ‘सíकट ब्रेक’ नसल्याने जास्तच गडगडला. दोन दिवसांत भाव आठ रूपयांवर आला. या कंपनीची परदेशी ग्राहकांशी असलेल्या व्यवहारांची किंमत, उपकंपन्यांचे मूल्य, त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या कार्यालयांचे मूल्य याची किंमत न ठरवता, विश्वासार्हता गमावल्याने, सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करत होते. मिहद्र उद्योग समूहाने ही कंपनी ताब्यात घेतली व काही महिन्यांनी त्यांच्या टेक मिहद्र कंपनीत विलीन केली. विलिनीकरणाच्या सुमारास शेअर्सचा भाव आठ रुपयावरून शंभरच्या जवळपास गेला होता.
सर्वसामान्य गुंतवणूकदार कोणत्याही बातमीची सखोल माहिती काढत नाही व फसवला जातो. सर जॉन टेम्पल्टन यांनी गुंतवणुकीचे सोळा नियम सांगितले आहेत. त्यातील पहिला असा की, देवाची प्रार्थना करा. (म्हणजे डोके शांत राहील व निर्णय चुकणार नाहीत!) हे सर्व किस्से आज आठवायचे कारण? .. अर्थात मॅगी नूडल्स.
बाजारातील बातम्यांवर नेस्ले कंपनीचा शेअर गत ५२ आठवड्यांच्या उच्चांकापासून (७,५०५ रु., दि. १० मार्च २०१५ रोजी) ५,५०० रुपयांपर्यंत खाली आला. या कंपनीचे ६२.७६% शेअर्स प्रवर्तकाकडे (स्विस) तर १२.४८% शेअर्स परदेशी गुंतवणूकदार संस्थाकडे (एकूण ७५.२४%) आहेत. म्हणजे वैयक्तिक भारतीय गुंतवणूकदारांजवळ फक्त २०% शेअर्स आहेत.
मॅगीचे परिक्षण अन्न व औषध प्रशासनाच्या किंवा इतर प्रयोगशाळांत झाले नसेल, त्यापेक्षा जास्त व्हॉट्स अप आणि इतर माध्यमात चालू आहे. त्याला भावनात्मक बाजू जास्त आहे. आíथक निर्णय भावनात्मक अंगाने घ्यायचे नसतात. मॅगी हे नेस्लेचे एक उत्पादन आहे या व्यतिरिक्त त्यांची कॉफी, दुग्धजन्य उत्पादने, अन्य खाद्यपदार्थ उत्पादने आहेत. त्या उत्पादनांच्या विक्रीवर अजून तरी काहीही परिणाम झालेला नाही. निर्यातीवरही विशेष परिणाम झालेला नाही.
व्यावसायिक स्पध्रेतून हा गोंधळ निर्माण झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे असेल तर याचा परिणाम संपूर्ण ग्राहकोपयोगी खाद्य उत्पादनांवर (एफएमसीजी सेक्टरवर) होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात सर्व राज्य आणि केंद्र सरकारने ‘खूप मेहनत’ घेतल्यासारखे वाटते. तशीच मेहनत सेबीने घेऊन मागील १५ दिवसांत नेस्लेचे शेअर्स विकणाऱ्यांची व खरेदी करणाऱ्यांची माहिती काढावी. कदाचित कॅडबरीच्या वेळेस न सापडलेली माहिती आज मिळू शकते.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी बातम्यांवर विश्वास न ठेवता, शेअर्स विकण्याची घाई करू नये. भाव खाली गेल्यास, प्रत्येक वेळेस थोडे थोडे खरेदी करत जावे. नेस्ले ही आंतरराष्ट्रीय कंपनी असून, १९७ देशात त्यांचे अस्तित्व आहे. दोन हजारापेक्षा जास्त नाममुद्रांची मालकी आहे. संपूर्ण जगात ३,३९,००० लोक या समूहात काम करतात. मॅगी प्रकरणाने कंपनीच्या आíथक बाजूवर थोडय़ा दिवसांसाठी परिणाम होईल. परंतु त्यातून कंपनी सहज सावरू शकते. माझ्याजवळ या कंपनीचे शेअर्स नाहीत किवा कंपनी बरोबर कोणत्याही स्वरूपाचे आíथक व्यवहार नाहीत. शेअरबाजारातील अशा विसंगतीत, माझ्यातील पूर्वीचा शेअर ब्रोकर जागा होतो. तो मला शांत बसू देत नाही.
sebiregisteredadvisor@gmail.com
लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार