|| डॉ. मेधा शेटय़े

इच्छापत्र, ज्याला मृत्युपत्रही संबोधले जाते, हा खरे तर कुटुंबासाठी काही तरी कमावून ठेवलेल्या प्रत्येकाने पूर्ण करावयाचा महत्त्वाचा उपचार आहे. तथापि अनेक जण याबाबत अनभिज्ञ आहेत किंवा या संबंधाने त्यांच्या गैरधारणा आहेत. ‘इच्छापत्र: समज-गैरसमज’ या दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या लेखमालेतून त्याचे निरसन करताना, लोकांच्या या संबंधी प्रश्न आणि शंकांचेही समाधान केले जाणार आहे..

इच्छापत्र, असे कुणी म्हटले की लोक थोडे धास्तावतात. ‘अरे तब्येत तर बरी आहे ना?’ असा प्रश्न ताबडतोब ओठी येतो. पण असे का, तर आपल्या समाजात असलेले गरसमज. इच्छापत्र हे फक्त उतारवयात किंवा कुणी गंभीर आजारी असल्यास करण्याची प्रथा प्रचलित आहे. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. प्रत्येक प्रौढ माणसाने जंगम व स्थावर मालमत्ता संपादित केल्यावर हा विचार करायला हवा. हे केल्यास तुम्ही तुमच्या संपत्तीचे व्यवस्थापन उत्तम तऱ्हेने करू शकता.

इच्छापत्र मृत्यूपश्चात संपत्ती वितरण करण्याकरिता केलेला दस्तऐवज. याला ‘मृत्युपत्र’ म्हणूनदेखील संबोधले जाते. इच्छापत्र हा एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या संपत्तीचे वाटप तुमच्या इच्छेप्रमाणे करण्याची संधी देते. या दस्तऐवजामुळे तुम्हाला नातेसंबंधाव्यतिरिक्त कुणाला काही द्यायचे असेल तर ते सहज शक्य होते. भावनिक मूल्य असलेल्या वस्तू तुमच्या कौटुंबिक संबंध असलेल्या व ज्यांना त्याचे महत्त्व व कौतुक आहे अशाच व्यक्तींना देणे शक्य होते. तसेच तुम्हाला तुमच्या पश्चात प्रियजनांसाठी पुरेशी तरतूद करणे साध्य होते. अल्पवयीन मुले असल्यास त्याचा ताबा योग्य त्या विश्वासातल्या माणसाकडे सुपूर्द करता येतो. एवढेच नव्हे तर तुमचे क्रियाकार्य करण्याचा भारदेखील तुम्ही स्वत: उचलू शकता. प्रत्येक व्यक्ती विश्वास बाळगू शकते की, त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे विभाजन त्याच्या इच्छेप्रमाणेच होणार आहे. या सर्व गोष्टी पार पाडण्याकरिता तुमच्या विश्वासातला माणूस निष्पाद/ प्रबंधक म्हणून तुम्ही नेमू शकता.

इच्छापत्र तुमच्या पश्चात नातेसंबंधातील व्यक्तींची त्रेधा, मनस्ताप नक्कीच कमी करते आणि जंगम, स्थावर मालमत्तेचे नियोजन सुलभ मार्गाने पार पाडू शकते. असे न केल्यास संपत्तीचे वाटप वारसा हक्क कायद्याप्रमाणे होते. यामुळे कित्येकदा इच्छापत्र कर्त्यांच्या मनाविरुद्धही वितरण होऊ शकते. नको असणाऱ्या व्यक्तीला मालमत्ता जाऊ शकते. मुख्य म्हणजे हे दस्तऐवज अगदी अल्पदरात तयार करता येते. इच्छापत्र हे अगदी सोप्या व सरळ भाषेत तयार केले जाते. जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्याचे आकलन सहज करता येते व अंमलबजावणी सुरळीत पार पडू शकते.

अलीकडच्या काळात ‘लिव्हिंग विल’ ही संकल्पनादेखील बऱ्याच लोकांच्या चच्रेचा विषय आहे. लिव्हिंग विल आणि इच्छापत्र याच्यात काही साम्य आहे का? असे प्रश्न अनेकांना भेडसावत असतात. चला थोडक्यात समजून घेऊ या ‘लिव्हिंग विल’बद्दल! या दस्तऐवजात प्रामुख्याने गंभीर आजारी पडल्यावर तुमच्या बाबतीत कोणते वैद्यकीय निर्णय स्वत:करिता घेण्यात यावेत हे नमूद करता येते. प्रामुख्याने दीर्घकाळ आजाराने त्रस्त व कृत्रिम यंत्रसामग्रीवर जीवन व्यतीत करायचे नसेल व आपले जीवन संपुष्टात आणायचे असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांना, घरातील सदस्यांना आपली इच्छा सांगणारे हे पत्र होय. याची अंमलबजावणी माणूस हयात असतानाच पण प्रभावी संवाद साधण्यास असमर्थ झाल्यावर होते. या दस्तऐवजामुळे डॉक्टर आणि घरातील सदस्यांना मौल्यवान मार्गदर्शन मिळते. घरातील मंडळींना बुचकळ्यात टाकणारे पेच आणि होणारा मानसिक ताण टाळता येतात. हे दस्तऐवजदेखील अगदी स्वत: तयार करता येऊ शकते.

‘लिव्हिंग विल’ आणि ‘इच्छापत्र’ या दोन्ही गोष्टी आजकाल ऑनलाइनदेखील करता येतात.

(लेखिका कायदाविषयक तज्ज्ञ) (या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com)