Chanakya Niti for Money: ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सोपं होऊन जातं असं म्हटलं जातं. कारण, पैशांमुळे अनेक समस्या सुटतात. आचार्य चाणक्यही गरीबी हे विषप्रमाणे असल्याचं सांगतात. गरीबीतून बाहेर येण्यासाठी लोक कधी कधी चुकीच्या मार्गाचा देखील वापर करण्यास धजावत नाही. चाणक्य नीतीमध्ये संपत्तीबाबत अशाच काही गूढ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हव्या. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये ठराविक मार्गाने मिळवलेली धन संपत्ती ही तुमच्या मान-सन्मानाच्या हानीचं कारणं ठरू शकतं, असं सांगितलं आहे.
आचार्य चाणक्य यांची गणना भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. ते एक कुशल राजकारणी, मुत्सद्दी आणि रणनीतिकार असण्यासोबतच अर्थशास्त्राचे तज्ज्ञ देखील होते. समस्या टाळण्यासाठी, लोक अनेकदा चाणक्य नीतीचा अवलंब करतात. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये व्यावहारिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना आजही महत्त्व आहे. या गोष्टींचा अवलंब केल्यास अनेक समस्या आणि संकटे टळू शकतात. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये पैशासंबंधी एक महत्त्वाचे धोरण दिले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पैशाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पैशाच्या जोरावर तो त्याच्या गरजांबरोबरच छंदही पूर्ण करू शकतो. चाणक्य म्हणतात की, काही मार्गांनी संपत्ती मिळवणे योग्य नाही. काही मार्गांनी मिळवलेली संपत्ती टिकत नाही आणि ती लवकरच नष्ट होते, असे ते म्हणतात. ते कोणते मार्ग आहेत, जाणून घेऊया…
१. सदाचाराचं त्याग: आचार्य चाणक्य म्हणतात, व्यक्तीला पैसा कमवण्यासाठी जर सदाचाराचं त्याग करण्याची वेळ येत असेल तर अशा संपत्तीमुळे तुमचा सन्मान कमी होतो. अशा मार्गाने पैसे कमवताना फसवणूक केली जात असते. अशा कामांमधून मिळालेला पैसा तुमच्या संकटांत कधीच साथ देत नाही. पण याउलट तुमच्या मान-सम्मानाची हानी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आचार्य चाणाक्य सदाचार बाळगूनच धन संपत्ती कमावण्याचा सल्ला देतात.
२. शत्रूची चापलूसी करणे: आचार्य चाणक्य अशा संपत्तीला निरुपयोगी मानतात, जी संपत्ती शत्रूला चापलूसी करून कमावली गेली आहे. कारण असा पैसा मिळवून माणसाला नेहमीच अपमानित व्हावं लागतं.
३. यातना सहाव्या लागतील अशा पैशाचा त्याग करावा: आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या धनासाठी व्यक्तीला शारीरिक व मानसिक यातना सहन कराव्या लागतात, अशा धनाचा त्याग करणेच श्रेयस्कर असते. कारण अशा प्रकारच्या पैशासाठी मेहनत करताना आपल्याला होणाऱ्या त्रासामुळे आपल्या कुटुंबीयांनाही दुःख सहन करावं लागतं. म्हणून, अशा संपत्तीचा त्याग केल्यानेच मन:शांती व कुटुंबातील आनंद टिकून राहतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)