-परप्पनंगडी उन्नीकृष्णन पणिककर (लेखक हे ज्योतिष या विषयाचे अभ्यासक आहेत.)

Lok Sabha Elections and Astrological Predictions निवडणुकीचे वारे घोंगाऊ लागले आहेत. नोकरशहा, राजकारणी आणि प्रसारमाध्यमांसाठी निवडणुका हा व्यग्र काळ असतो. तसा तो ज्योतिषांसाठी देखील असतो, परंतु बहुतांशवेळा सामान्यांला हे माहीत नसते. स्पष्टच सांगायचं तर राज्यशास्त्र (पोलिटिकल सायन्स) या विषयात शास्त्र-विज्ञान असण्यापेक्षा राजकारणाचं अधिक असते. आणि या दोन घटकांमध्ये इतर अनेक बाबींचा समावेश होतो. त्याच अनेक बाबींपैकी एक म्हणजे ताऱ्यांवरून केलेली भविष्यवाणी ! अर्थात आपल्यापैकी अनेकजण ही केवळ एक अंधश्रद्धा म्हणून या शास्त्राचे अस्तित्त्वच नाकारतील. परंतु तुमचे संपूर्ण अस्तित्त्वच आठ ते दहा आठवड्यांच्या मोहिमांवर अवलंबून असते त्यावेळी मात्र असा एखादा अज्ञात गोष्टींवर प्रकाश टाकणारा कोणताही मार्ग देखील स्वागतार्ह असतो. म्हणूनच अनेक नेते आणि उमेदवार ज्योतिषांना भेटून त्यांच्या निवडणुकीच्या संभाव्यतेबद्दल चर्चा करतात. ज्योतिषशास्त्र नाकारणारे आणि माध्यमांसाठी पुरोगामी पोशाख धारण करणारे अनेक राजकारणी ज्योतिषांचा खाजगीत सल्ला घेताना दिसतात.

अधिक वाचा: २४ की २५ मार्च होळी नक्की कधी? होलिका दहनासाठी ‘हा’ पावणे दोन तासांचा मुहूर्त सर्वात शुभ, पाहा नियम

काही वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान एका दिग्गज राजकारणी, माजी मंत्र्याच्या भाषणाची ध्वनीचित्रफित पाहिल्याचे मला आठवते. जयललिता यांनी ज्योतिषशास्त्रावर दाखविलेल्या विश्वासामुळे ती व्यक्ती त्यांची थट्टा करत होती. विशेष म्हणजे त्याच व्यक्तीने महिन्याभरापूर्वी त्यांच्या जन्मकुंडलीच्या वाचनासाठी मला भेट दिली होती, त्यामुळे त्यांची थट्टा मस्करी ऐकून मला गंमत वाटली.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्योतिषशास्त्र

आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची ज्योतिषशास्त्र नाकारणारे तर्कवादी आणि अज्ञेयवादी अशी ओळख आहे. परंतु त्यांनीही आपल्या मुलीला “आपल्या नातवाची कुंडली एखाद्या सक्षम व्यक्तीकडून तयार करून घेण्यास सांगितले होते”. कृष्णा हठीसिंह यांनी संपादित केलेल्या ‘नेहरू लेटर्स टू हिज सिस्टर’, (१९६३) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात याचा स्पष्ट उल्लेख आहे.

दुर्गा दास यांनी ‘इंडिया: फ्रॉम कर्झन टू नेहरू आणि आफ्टर’ (१९६९) या पुस्तकात नमूद केले आहे की, तत्कालीन नियोजन मंत्री गुलज़ारीलाल नन्दा यांच्या सल्ल्यानुसार, नेहरूंनी १९६२ मध्ये एका ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. या ज्योतिषाने चिनी आक्रमणाचा अंदाज वर्तवला होता, त्यावर पंडित नेहरू चिडले आणि ज्योतिषाला म्हणाले, “तुम्ही निरुपयोगी बोलत आहात”. “त्यानंतर लगेचच चिनी आक्रमण झाले आणि नेहरूंनी ज्योतिषांचे म्हणणे ऐकण्याची सकारात्मकता दर्शवली ” असे दास लिहितात. ज्योतिषांनी यावेळी नेहरूंच्या प्रकृतीबाबत इशारा दिला होता. परंतु “त्यानंतरच्या चर्चेबद्दल अत्यंत गुप्तता पाळण्यात आली.
त्यानंतर दिल्लीच्या कालकाजी येथील मंदिरात पन्नास विद्वान पुजारी नेहरूंच्या समर्थकांनी सांगितलेली पूजा करण्यात व्यग्र होते. यानंतर त्या पुजाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना शुभ तिलक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थाकडे कूच केल्याचा संदर्भ दुर्गा दास देतात. ज्येष्ठ ज्योतिषांकडे राजकारण्यांबद्दल अशा अनेक रंजक कथा आहेत; परंतु, अर्थातच, ज्योतिषी म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांची गोपनीयता गांभीर्याने घेतो, त्यामुळे तुम्हाला या कथा उघड ऐकायला मिळणार नाहीत.

या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालखंडात ज्योतिषांना सर्वसाधारणपणे विचारले जाणारे प्रश्न हे निवडणुकीच्या सर्वसाधारण निकालाबाबत असतात. आपल्या देशावर कोण राज्य करणार आहे? कुणाच्या हातात सारी सूत्रे असतील? पंतप्रधान कोण होणार? कोण मंत्री होणार? हे सारे प्रश्न पत्रकार खऱ्या उत्सुकतेपोटी विचारू शकतात किंवा मग अनेकदा ज्योतिष शास्त्राची खिल्ली उडवण्याच्या छुप्या उद्देशानेही ते प्रश्न विचारले जातात. (हा मुद्दा ज्योतिषी व्यावसायिक जोखीम म्हणून स्वीकारतात!).

अधिक वाचा: शनी उदय: आजपासून ५० टक्के राशींच्या नशिबाला येईल जाग; ‘या’ ६ राशी शनी जयंतीआधी होणार करोडपती?

एखाद्या ज्योतिषाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे प्रश्न विचारले जातात, ते ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही गुंतागुंतीचे असतात आणि अचूक विश्लेषण करणे कठीण असते. निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांच्या कुंडल्यांचे विश्लेषण करणे अवघड आहे. याशिवाय, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही अशा अनेक गोष्टी आहेत, त्यांचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. यात उमेदवाराच्या जन्म कुंडलीपासून ते त्याने उमेदवारी अर्ज कधी भरला आहे, अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. आमचे विश्लेषण हे डेटा सेंट्रिक बाबींवर अवलंबून असले तरी, सर्व तपशील एकत्रित करणे आणि तो पडताळून पाहणे कठीण असते. या अडचणी असूनही ज्योतिषी निवडणुकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. यावरील एक मार्ग म्हणजे नेत्यांच्या जन्म कुंडलींचा अभ्यास करणे. त्यांची कुंडली नेमकी काय सांगते, तुम्ही तक्ते पाहू शकता आणि तारे काय सांगतात हे तपासू शकता.

सध्याची वेळ ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे का आणि नेता परत सत्तेत येईल का?, तो किंवा ती त्यांच्या ठरवलेल्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करू शकतात का? शत्रूवर मात करून आपल्या योजना अमलात आणू शकतात का? तुमच्या खात्यात काय वाढून ठेवले आहे?

अर्थात, स्पष्ट ज्योतिषीय चित्र मिळविण्यासाठी इतर अनेक तक्त्यांचे आणि पैलूंचे विश्लेषण करावे लागेल. पण प्रश्न असा आहे की, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अशी सखोल तपासणी करणे आवश्यक आहे का? ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणे ही वैज्ञानिक नसतात असे कोणीही म्हणू शकते. मी त्यांना सेफोलॉजिस्टच्या “वैज्ञानिक” अंदाजांकडे लक्ष देण्याची विनंती करेन. ज्योतिषी त्यांच्यापेक्षा बऱ्याचदा अचूक अंदाज वर्तवतात हे सहज लक्षात येईल!

(हा मूळ लेख इंडियन एक्स्प्रेसमध्ये १७ मार्च २०२४ रोजी प्रकाशित झालेला असून येथे त्या लेखाचा भावानुवाद दिलेला आहे.)