चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऊसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ट्रकखाली दबून दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही मुले खेळत असताना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे ही घटना घडली.

गोंदी येथून समर्थ सहकारी साखर कारखान्यावर ऊस घेऊन जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटला. दरम्यान, या ठिकाणी घराजवळ अंगणात खेळत असलेले सार्थक राजेंद्र थेटे (वय ५), ओंकार कृष्णा चोरमारे (वय ६) ही दोन मुले या ट्रकखाली आले.

ही दोन्ही मुले प्रचंड वजनाच्या ट्रकखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. जेसीबीच्या सहाय्याने ऊस हटवून गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतू, त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.