‘लोकसत्ता’च्या वक्ता दशसहस्रेषु या वक्तृत्व स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीत अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाची अर्चना निंबा राजपूत हिने प्रथम पारितोषिक पटकावले. मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीसाठी या खान्देश कन्येची निवड झाली. विभागीय अंतिम फेरीत १० स्पर्धकांपैकी अर्चना राजपूतने ‘साहित्य संमेलनाने साधते काय?’ हा विषय प्रभावीपणे मांडला. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या वैष्णवी मुळे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांनी ‘भारत संघराज्य आहे का?’, ‘शेती की उद्योग?’, ‘साहित्य संमेलनाने साधते काय?’, ‘पुरस्कार वापसी’, व ‘कोलावरी ते शांताबाई’ या पाच विषयांवर वक्तृत्व स्पर्धा गाजवली. बहुतांश स्पर्धकांचा कल ‘साहित्य संमेलनाने साधते काय?’ या विषयावर केंद्रित होता. स्पर्धेत हिंगोलीच्या आदर्श महाविद्यालयाच्या प्रणव खाडे याने तृतीय क्रमांक मिळवला, तर देवगिरी महाविद्यालयाचा भरत रिडलॉन व लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयाचा शामराव जगन्नाथ पाटील या दोघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुधीर अनवले व कृष्णा केंडे यांनी काम पाहिले. प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. दुपारी साडेतीन वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. प्राथमिक फेरीत निवडण्यात आलेले दहाही स्पर्धक विभागीय अंतिम फेरीसाठी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे प्रायोजक व आयसीडीचे कार्यकारी संचालक डॉ. आशिष मिरजगावकर यांची उपस्थिती होती. ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांनी प्रास्ताविक, तर समीर कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘वक्तृत्व ही ललित कला, विविधांगी सराव गरजेचा’
वक्तृत्व ही ललित कला आहे. या कलेसाठी अनेक प्रकारे सराव करण्याची आवश्यकता असते, असे परीक्षक अनवले व केंडे यांनी सांगितले. वक्तृत्व म्हणजे केवळ पाठांतर करून बडबड करणे नाही तर प्रत्येक शब्द आतून यायला हवा. त्यासाठी मनन, चिंतन आणि त्याचबरोबर वाचन आवश्यक असल्याचे डॉ. आशुतोष जावडेकर यांनी सांगितले. वाचनासाठी केवळ इंटरनेट एवढे एकच माध्यम न हाताळता पुस्तकांच्या संगतीने इंटरनेटचा योग्य उपयोग केला तर आपण अधिक प्रगल्भ होतो, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2016 रोजी प्रकाशित
खान्देश कन्या अर्चना राजपूत महाअंतिम फेरीत
‘लोकसत्ता’च्या वक्ता दशसहस्रेषु या वक्तृत्व स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीत अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाची अर्चना निंबा राजपूत हिने प्रथम पारितोषिक पटकावले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-02-2016 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Archana rajput first in loksatta oratory competition