छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्याचे पाणी हा प्राधान्यक्रम असल्याने प्रसंगी आवश्यकता भासली तर मद्य आणि बिअर उत्पादक कंपन्यांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जगभरात लोकप्रिय असणाऱ्या सहा बिअर व सहा विदेश मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. ३७७८.२८ लाख लिटर बिअर उत्पादन तसेच ७६१.५३ लाख लिटर विदेशी मद्यनिर्मिती वर्षभरात करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्य सरकारला या वर्षी ५,४५५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तो अपेक्षित उत्पादच्या तो ८६.४१ टक्के असला तर गेल्या वर्षीपेक्षा तो सात टक्के अधिक आहे. 

 यंदा पाऊस कमी झाल्यामुळे जायकवाडी धरणात कमी जलसाठा आहे. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातून समन्यायी वाटपातून आठ अब्ज घनफूट पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आले होते. जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचा वेगही आता १.०५५ असा असल्याची माहिती गोदावरी खोरे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी दिली. जायकवाडी जलाशयातील अतिशय कमी पाणी बिअर आणि मद्य विक्री कंपन्यांना लागते, असा युक्तीवाद केला जातो. टंचाईच्या क्षेत्रात या कंपन्यांनी आता कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचे वेगवेगळे प्रयोगही हाती घेतले आहेत. हवेचा अधिक दाब आणि कमी पाणी असे नोजल वापरून बाटल्या धुण्यापासून ते पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या अनेक पद्धती वापरल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>>बाप-लेक आमनेसामने! गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा लढवणार; म्हणाले, “मुलगा पुढे जातोय तर…”

पिण्याचे पाणी हा प्राधान्यक्रम आहे. पाण्याचे स्रोत टिकले तर टँकरने पाणी देता येईल. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा तपशील अजून तपासला नाही. मद्यनिर्मितीला लागणारे पाणी अधिक असेल तर प्रसंगी ते कपात करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. – दिलीप स्वामी,  जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पिण्याचे पाणी हा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास मद्य, बिअर उत्पादक कंपन्यातील पाणीपुरवठय़ात कपात केली जाणार आहे.

कोणत्या कंपन्या?

’विदेशी मद्य : युनायटेड स्पीरीट, कोकण अ‍ॅग्रो, एबीडी पीएलएल, रॅडिको एन. व्ही., ग्रेनॉच इंड, बीम ग्लोबल. 

’बिअर : यू. बी मिलिनिअम, यू. बी. अजिंठा, काल्सबर्ग , ए.बी. इन बेव्ह, लिलासन्स, फोस्टर, ग्रे नोच, कोकण अ‍ॅग्रो सीएल

काही कंपन्यांनी त्यांचे उत्पादन बारामती आणि नाशिक जिल्ह्यात नेले आहे.  तरीही मार्च अखेरीस ८६.४१ टक्के महसूलचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या वर्षी सहा हजार ३१३ कोटी रुपये महसूल जमा होईल, असे अपेक्षित होते. या वर्षी ५,४५५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. निवडणुकीदरम्यान कोठेही अधिक विक्री होत आहे काय, याची रोज तपासणी केली जात आहे. – महेश झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर