छत्रपती संभाजीनगर : नाशिक व नगर जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर गोदावरीमध्ये पाणी सोडल्याने जायकवाडीच्या धरण साठ्यात वाढ झाली आहे. आता धरणसाठा ३८.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मराठवाड्यातील प्रमुख धरणांमध्ये निम्न तेरणा, मांजरामध्ये पाणीसाठा वाढला आहे. धरणसाठा वाढत असला तरी पेरणीचा वेग मात्र तुलनेने कमी आहे. मराठवाड्यात ४९.१९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे २३.७२ टक्के पेरणी झाली आहे. मराठवाड्यात एकूण सरासरी १४३ टक्के पाऊस नाेंदविण्यात आला. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या दिवसात ५७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड आणि हिंगोलीमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

मे महिन्यात झालेल्या पावसामुळे तसेच नगर व नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे आतापर्यंत साडेतीन अब्ज घनफुटापेक्षा अधिक पाणी वाढले आहे. मात्र, मृग नक्षत्रानंतर अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने पेरण्यांचा वेग मंदावला होता. एका बाजूला धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असतानाच या वर्षी जायकवाडी धरणाच्या दुरुस्तीचेही काम सुरू करण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी धरणाच्या पाळूसह दुरुस्तीची विविध प्रकारची कामे हाती घेण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांडवा भागातील काही भेगा इपॉक्सी रसायनाने दुरुस्त केल्या जाणार असून या भागातील भेगाही बुजवण्याचे काम सुरू झाल्याचे जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकारणाचे कार्यकारी अभियंता एस. के सब्बीनवार यांनी सांगितले. धरण सुरक्षेसाठी लागणारे कॅमेर, भूकंपरोधक यंत्र, धरणावरील पाण्याचा दाब मोजणारे यंत्र बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मराठवाड्यात पडणाऱ्या पावसाचे प्रारूप पाहता जूनपर्यंत चांगला पाऊस झाल्याने या वर्षी मूग, उडदाची पेरणीही होत आहे. कापसाऐवजी मका पिकास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेरा वाढू शकतो, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.