पालक, टोमॅटोही महागले शेतकरी संपानंतर आणि लग्नसराईच्या काळात भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. औरंगाबादेत कोथिंबिरीचा दर रविवारी शेकडा आठ ते दहा हजार रुपये भेळा (मोठी गड्डी) एवढा होता. रविवारच्या आठवडी बाजारात तर कोथिंबिरीची लहान जुडी ५० रुपयांना होती, तर तीन ते चार काडय़ांचा वाटा दहा रुपयांना होता. पुढील दीड महिना म्हणजे साधारण पंचमीपर्यंत तरी कोथिंबिरीचा दर चढाच राहील, असे सांगितले जात आहे. ऐन लग्नसराईच्या स्थितीत कोथिंबिरीचा दर वाढल्याने जेवणाच्या बजेटवरही त्याचा परिणाम दिसत आहे. कोथिंबिरीसोबत टोमॅटोचेही दर चांगलेच वाढलेले आहेत. किरकोळ आणि रविवारच्या बाजारात टोमॅटो ४० रुपये किलोने विकला गेला. टोमॅटो विक्रेत्याच्या मते २० किलोचे एक कॅरट सातशे रुपयांना खरेदी करावे लागले. जाधववाडीतून खरेदी करून खोकडपुऱ्यातील आठवडी बाजारापर्यंत आणण्याचा खर्च धरून ४० रुपये किलोने विक्री करावा लागला. एक ते दोन रुपयांच्या नफ्यावरच समाधान मानावे लागत आहे. त्यापेक्षा अधिकच्या दराने ग्राहक खरेदी करीत नाही. कोथिंबिरीची लहान जुडी ४० ते ५० रुपयांना होती, तर मोठा भेळा हा ८ हजार रुपये शेकडय़ाने विक्री झाला. हातगाडेवाल्यांनी कोथिंबीर भाज्यांच्या ठेल्यात ठेवणेच बंद केले आहे. ग्राहकांच्या घरापर्यंत नेऊन विकण्यापर्यंत कोथिंबिरीचा दर ६० रुपये जुडी, एवढा जातो. सर्वसामान्य ग्राहकांना एवढय़ा महागडय़ा दराने कोथिंबीर घेणे परवडत नाही. घेतलेली कोथिंबीर विकली गेली नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत सुकून जाते. त्यामुळे कमीच खरेदी करून तेवढी विकेपर्यंत कोण काळजी करीत बसा, असा प्रश्न विक्रेते करीत आहेत. मागील आठवडय़ापासून कोथिंबिरीचे दर वाढत आहेत. मागील आठवडय़ात १५ ते २० रुपये गड्डी, असा कोथिंबिरीचा दर होता. आता तर तो दुप्पटीपेक्षाही अधिक वाढला आहे. सध्या बाजारात कोथिंबिरीची आवकच घटली आहे. पावसाळ्यापूर्वी लागवड केलेला माल संपलेला आहे. त्यामुळे तुटवडा भासत आहे. आता नवीन माल बाजारात येण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. पंचमीपर्यंत कोथिंबिरीचे दर चढेच राहतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. सध्या लग्नाच्या तिथी असून ३ जुलैच्या आधी आणि नंतरही काही मुहूर्त आहेत. या काळात जेवणाच्या मेनूमध्ये कोथिंबिरीचे महत्त्व अधिक असते. विशेषत मसाले भात, रस्सा भाज्या, कोशिंबीर, भजे, अशा अनेक पदार्थामध्ये कोथिंबिर लागते. कोथिंबिरीचा गंध आणि रंग, असे दोन्हीही त्या पदाथरंची चव उंचावत असल्याने त्याला मागणी अधिक असते. मात्र सध्याचा दर जेवणासाठीच्या वरण, भाज्या व पदार्थासाठी कोथिंबीर खरेदी करणे परवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दररोज ५० हजार भेळा जाधववाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत औरंगाबादसाठी दररोज ५० हजार भेळा एवढाच माल येत आहे. मालाची आवक कमी असल्यामुळेच दर वाढलेले आहेत. बाजार समितीकडे लहान कोथिंबिरीच्या गड्डीचा दर हजार ते बाराशे एवढा नोंदला गेला आहे. व्यापाऱ्यांकडे अधिक दराने विक्री केली जाते. बाजारातील ८ हजारांचा दर ऐकण्यात येत असल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.