छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील ८२ हजार घरांमध्ये बंदिस्त नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्याचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. स्फोटक विभागाकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर श्रीगोंद्यामधून गॅस सोडण्याची कारवाई सप्टेंबरअखेर पूर्ण होईल असा दावा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला. केवळ घरगुती वापरासाठी नाही तर वाळुज आणि शेंद्रा या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जुलैअखेर नैसर्गक वायू बंदिस्त पाईपने पुरवला जाईल, असे भारत पेट्राेलियमचे प्रमुख अक्षय वाढवा यांनी सांगितले.

शहरातील प्रभाग क्रमांक ७, ९, ४ व ५ मध्ये बंदिस्त नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरात १ हजार ५५५ किलोमीटरचे पाईप टकण्याचे ठरविण्यात आले असून त्यातील ४५० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी महापालिका, अहिल्यानगरमधील वनविभाग, जिल्हाधिकारी यांच्या समन्वयासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दोन महिन्यातून एकदा देयक आकारणी होणाऱ्या या बंदिस्त पाईपलाइनमधून गॅस सोडण्यासाठी स्फोटके विभागाने परवानगी दिली की, ही कारवाई सुरू केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेसात लाख गॅसजोडणी पाईपच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यातील ८२ हजार जोडणी पूर्ण झाली आहे. नव्याने पाईप टाकताना शहरातील कोणताही रोड उखडला जाणार नाही. जायकवाडी धरणाच्या खालून ज्याप्रमाणे खोदकाम करण्यात आले तसेच काम शहरातही केले जाईल, असे वडवा यांनी सांगितले. केवळ शेंद्रा आणि वाळुज नाही तर नव्याने मोठी गुंतवणूक झालेल्या बिडकीनसाठी स्वतंत्र पाईप टाकण्यात येतील, असेही सोमवारी पत्रकार बैठकीत सांगण्यात आले. महापालिका निवडणुकीपूर्वी पाईपने गॅस पुरवठा करण्याच्या प्रक्रियेला आता वेग दिला जात आहे.