मारहाणीतून घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप दुचाकी चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या संशयित राहुल गायकवाड याचा शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र ज्या वाहनातून संशयिताला नेण्यात येत होते त्यातून तो उडी मारणे शक्य नाही, त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतूनच झालेला आहे, असा आरोप मृत आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित केले आहे. हा तपास राज्य गुन्हे शाखेकडे दिलेला असून न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. औरंगाबाद शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. दिवसभरात चार ते सहा दुचाकी चोरीच्या घटना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद होत आहेत. यातील तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक दौलताबाद भागात मिळालेल्या माहितीच्या आधारे २६ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास गेले होते. पोलीस ज्या वाहनातून गेले होते त्या गाडीची मागील बाजूची काच फुटलेली होती. पोलिसांनी संशयित म्हणून राहुल अर्जुन गायकवाड (रा. ढोमेगाव, ता. गंगापूर), लक्ष्मण तुपे व साजन अशोक गायकवाड या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांना औरंगाबादेत आणत असताना वाळूजजवळ राहुल गायकवाड याने मागच्या बाजूच्या काच फुटलेल्या खिडकीतून पळून जाण्याच्या उद्देशाने उडी मारली. मात्र राहुल डोक्यावर पडला. त्याला जखमी अवस्थेत घाटीत दाखल केले. मात्र राहुलचा उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी ताब्यातील संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न करण्यामागे पोलिसांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असून त्यामुळे अशोक त्र्यंबक नरवडे, दत्तू भाऊराव सांगळे, युनूस शहा दौलत शहा, संतोष काकडे, फिरोज खान शौकत खान या पाच जणांना निलंबित केले आहे. पाचही पोलिसांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. तपासासाठी प्रकरण राज्य गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. राहुल गायकवाडचे शवविच्छेदन छायाचित्रणासह तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे. प्रकरणाची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना दिली. मृत राहुल गायकवाडच्या नातेवाईकांनी निलंबित पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. मृत आरोपी २४ तासापेक्षा अधिक काळ ताब्यात मृत आरोपी राहुल गायकवाड हा २४ तासापेक्षा अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती असून त्याला अटक केल्याची नोंद का केली नाही, आरोपींच्या मानसिक अवस्थेचा पोलिसांना चांगला अभ्यास असतो आणि राहुलच्या २४ तासातील हालचालीतून तो उडी मारेल, याचा अंदाज पोलिसांना कसा आला नाही, जीपच्या खिडकीच्या काचेतून उडी मारण्याची हालचाल होत असतानाही पोलिसांनी काहीच कसे केले नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पोलिसांकडून केवळ संशयितांनी दुचाकी चोरीची कबुली दिल्याचेच सांगितले जात आहे. राहुलनेही नेवासे येथे नेऊन दोन दुचाकी विकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.