ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गहिनीनाथगडाच्या धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावल्यावर आठच दिवसांत या गडावर संस्कृत महाविद्यालय सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली, तर खासदार प्रीतम मुंडे यांनी महासांगवी येथील मीराबाईगडावर हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभास उपस्थित राहून गडाच्या विकासासाठी पूर्वीच दहा लाख रुपये मंजूर केले व संस्थानला सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी दोन महिन्यांपूर्वी भगवानगडावर राजकीय भाषणाबाजीला बंदी केल्याची घोषणा केल्यानंतर उठलेल्या वादंगाच्या पाश्र्वभूमीवर मुंडे भगिनींनी या दोन्ही गडांच्या धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावून या गडांना बळ दिल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात धार्मिक गडांना राजाश्रय मिळाल्यामुळे गडांच्या महंतांना आणि गडावरील धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व मिळत गेले. श्रीक्षेत्र भगवानगडावर दसरा मेळाव्यातील गोपीनाथ मुंडे यांचे भाषण राजकीय परिवर्तनाची दिशाच ठरले. त्यांच्या पश्चात गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना गडाची कन्या म्हणून जाहीर केले, मात्र गोपीनाथगडाच्या उद्घाटन सोहळय़ात महंतशास्त्री यांनी भगवानगडाचा श्वास मोकळा झाला, असे सांगत यापुढे भगवानगडावरून पंकजा मुंडे यांचे राजकीय भाषण होणार नसल्याचे जाहीर केले. त्यावर मुंडे समर्थकांतून आक्रमक नाराजी व्यक्त झाली.
महंतशास्त्री आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने समाजांतर्गत मोठे वादंग उठले. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील इतर गडांच्या महंतांनी पंकजा मुंडे यांना धार्मिक कार्यक्रमांसाठी निमंत्रण पाठविण्यास सुरुवात केली. पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगडावर संत वामनभाऊ पुण्यतिथीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाला पंकजा मुंडे खास हेलिकॉप्टरने उपस्थित राहिल्या. गडाचे महाराज बोलावतील तोपर्यंत येत राहणार अशा शब्दांत त्यांनी गडावरून सुरू असलेल्या भाषणबंदीवर भावना व्यक्त केली, तर गडाचे विठ्ठलमहाराज यांच्या मागणीनुसार आठच दिवसांत गडावर वाराणसी विद्यापीठाचे संस्कृत महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळवून दिली. याच तालुक्यातील महासांगवी येथे देशातील एकमेव मीराबाई संस्थानच्या धार्मिक कार्यक्रमाला खासदार मुंडे यांनी हजेरी लावली. संस्थानच्या राधाताई सानपमहाराज यांच्या मागणीवरून गडाला पूर्वीच दहा लाख रुपये मंजूर केले. विकासासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी जाहीरपणे दिली. भाजपच्या मुंडे भगिनींनी लागोपाठ दोन धार्मिक गडांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून या गडांना बळ दिल्याचे मानले जाते. आता इतर छोटय़ा गड- संस्थानांकडून राजाश्रय मिळवण्यासाठी मुंडे भगिनींना धार्मिक कार्यक्रमांची निमंत्रणे येऊ लागली आहेत.