सुहास सरदेशमुख औरंगाबाद : क्रातिसूर्य सावित्रीबाई फुले यांनी १८५४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर काव्य रचले. कोणती गोष्ट पुराणाची आणि कोणता इतिहास हे स्पष्ट करणारे हे काव्य होते. अशा सावित्रीबाईंच्या ४० कविता ‘काव्यफुले’ या संग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातील निवडक नऊ कवितांना औरंगाबादमधील संगीतकार डॉ. संजय मोहड यांनी चाली लावल्या असून विविध रागात बांधलेली सावित्रीबाई फुले यांच्या कवितेच्या रचनांचा ‘स्वरफुलोरा’ रसिकांसाठी खुला करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिवशी ३ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे सादरीकरण एमजीएम विद्यापीठात होणार आहे. वामनदादा कर्डकांच्या गीत रचनांवर ‘गीत भीमायन’ मधील काही गाणी करण्यापूर्वीपासून गेल्या काही दिवसापासून ‘तत्त्व संगीत’ असा नवा विचार मनात घोळत होता. भगवान महावीर, गौतम बुद्ध, ज्ञानेश्वरांची ओवी, कबीर, दुष्यंतकुमार यांच्या मांडणीने नेहमीच मोहरून टाकायला होतं. त्यातील काहींना चाली दिल्या. स्वरांचा गालिचा अंथरला की ते काव्य अलगद त्यावर येते. तसे तत्त्वसंगीतामधील रचनांचे होते. याच काळात सावित्रीबाई फुले यांच्या काव्यरचना समोर आल्या आणि त्यावर काम करता आल्याचे डॉ. संजय मोहड आवर्जून सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा समाजमनावर असणारा प्रभाव वर्षांनुवर्षांचा. सावित्रीबाईंच्या कवितेत पुराण आणि इतिहास याचा भेद सांगत शिवाजीराजांची स्तुती आहे. ती भावली आणि ‘आसा’ या रागातील रचना निर्माण झाली. एरवी संगीताचे शास्त्र किंवा तत्त्व असतेच. पण विविध विचारधारांना संगीतबद्ध करण्याचा संकल्प केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कवितांवरील स्वरफुलोरा आता पुढे सरकतो आहे. ‘संसारात वाट’ हा अभंग भिन्न षड्जातील यमन रागात बांधला असल्याचे संजय मोहड सांगतात. या रचना मधा लखपती, विद्या धनेधर, सुप्रिया खरात, पूनम साळवे सादर करतात. तबल्यावर जगदीश व्यवहारे, व्हायोलिन- पंकज शिरभाते, बासरी- निरंजन भालेवर, पखवाज- बंकट बैरागी, सहताल वाद्यांसाठी राहुल जोशी आदी कलाकार सहभागी होणार आहेत. मोडी लिपीतील कच्चे टाचण उपलब्धसावित्रीबाई यांनी लिहिलेल्या १२ कवितांचे मोडी लिपीतील कच्चे टाचण उपलब्ध आहे. हे कागद मुंबई येथील कृष्णाजी गोरे यांनी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख ‘सावित्रीबाई फुले- समग्र वाड्मय’ या डॉ. मा. गो. माळी यांनी संपादित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रकाशित सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या ४० हून अधिक कवितांचा संग्रह एकत्रित देण्यात आला आहे. ‘धरित्रीची माती’, ‘सर्वाचा निर्मिक’, ‘उठा बंधूंनो’ तसेच अन्य नऊ कवितांना चाली बांधून झाल्या आहेत. ‘पहाडी’, ‘मिश्र पहाडी’ तसेच ‘भैरवी’ रागातील या रचना ओठी याव्यात अशी त्याची रचना करण्यात आली आहे. या रचनांद्वारे औरंगाबादच्या कलाकारांनी स्वरफुलोरा सजविला आहे.