छत्रपती संभाजीनगर : देशातील एकमेव मयूर अभयारण्य असलेल्या नायगावातील (ता. पाटोदा) मोरांची सध्या वाढत्या तापमानाने होरपळ होत आहे. ३ हजार हेक्टर वनक्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यात वन विभागाच्या माहितीनुसार २९ कृत्रिम पाणवठे असले, तरी मोर नैसर्गिक जलस्रोतांच्या शोधात नजीकच्या गावांपर्यंत भटकत येत असल्याचे चित्र आहे. नायगाव मयूर अभरण्यात ५ ते ७ हजारांवर मोर आहेत. दर वर्षी गणना होत नसली, तरी वन विभागाकडूनच ही माहिती मिळाली. तर नायगावच्या मयूर मित्र मंडळाच्या दाव्यानुसार ही संख्या सहा हजारांवर आहे. अभयारण्यात मोरांच्या पाणवठ्यांमधील अंतर २ ते ३ किलोमीटरचे आहे. त्यातील पाणी वेळेवर बदलले जात नाही. अनेक पाणवठे दिवसभर पूर्णपणे उन्हातच राहणारे असून, त्यावर छप्पर उभारणे अपेक्षित आहे. पाणीही दर दोन-तीन दिवसांनी बदलण्याची गरज आहे. खाद्यान्न पाण्यात पडल्यामुळे त्यात अळ्याही होतात. उन्हामुळे पाणी गरम होते. परिणामत: मोरांची तहान भागत नाही. पाणवठ्यांमधील अंतर अधिक असल्याने मोरांना वेळेत पाणी मिळत नाही. परिणामी अंधारी येणे, भोवळ येऊन कोसळणे, असे प्रकार मोरांबाबत होत असल्याचा आरोप मयूर मित्र मंडळाकडून करण्यात येतो.
पाण्याचा गुणधर्मच फार कडक होण्यासारखा नाही. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास पाणी थंडच असते. नायगाव मयूर अभयारण्यात एकूण २९ कृत्रिम पाणवठे असून, ते सर्व सुस्थितीत आहेत. त्यामध्ये डीहायड्रेशनचे डोसही टाकले जातात. पाणवठे आठ दिवसांनी स्वच्छ केले जातात. नजीकच्या गाव परिसरात तलावासारखे नैसर्गिक जलस्रोतही आहेत. ए. आर. सांगुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नायगाव
उन्हामुळे पाणवठ्यातील पाणी पातळी कमी होते. बहुतांश पाणवठे उन्हातच आहेत. त्यावर निवाऱ्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. मोरांना पाणी वेळेत मिळाले नाही, तर अंधारी येणे, भोवळ येणे असे प्रकार घडतात. मोर दगावण्याचीही भीती असते. मोरांची काळजी घेणे वन विभागाचे काम आहे. सय्यद शाहीद हबीब, अध्यक्ष, मयूर मित्र मंडळ