छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे दोन गटांत गुरुवारी रात्री झालेल्या किरकोळ वादातून तिघांना चाकूने भोसकण्यात आले. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या नातेवाइकांनी सर्व आरोपींना अटक केली, तरच मृतदेह स्वीकारू, अशी भूमिका घेतल्याने वैजापूर व खंडाळा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे दोन हजार नागरिकांचा समुदाय वैजापूर उपजिल्हा रुग्णालयासमोर दिवसभर होता. एका गटाने रुग्णालयात रात्री ताेडफोड, तर खंडाळ्यात एका दुकानासमोर जाळपोळ केली होती. खंडाळा गावात रात्रीपासून पोलीस बंदोबस्त असून, पोलीस अधीक्षक डाॅ. विनयकुमार राठोड तळ ठोकून होते.

याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी शेखर ननवरे, नंदू जानराव, कुणाल जेजुरकर यांना अटक केली असून, अक्षय पवार व गौरव अनर्थे हे दोघे फरार आहेत. तर अन्य दोन अज्ञात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अक्षय व गौरवसह अन्य दोन अज्ञातांनाही अटक करा, अशी मागणी करत मृत तरुण मोईन अख्तार शहा (वय २०) याच्या नातेवाइकांनी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयासमोर गर्दी केली होती. त्यांच्या मागणीमुळे दुपारपर्यंत मोईनचे शवविच्छेदनही रखडले. दरम्यान, वैजापूरला शुक्रवारी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर वैजापूर व खंडाळ्यातील वातावरण गुरुवार रात्रीनंतर शुक्रवारी दिवसभर तणावपूर्ण शांततेचे होते.
खंडाळा गावात भायगाव येथील तरुण गौरव अनर्थे याचे केश कर्तनालय आहे. या दुकानाजवळच एक हॉटेल असून, तेथेच दोन गटांतील तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून तिघांवर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये मोईन शहा याचा मृत्यू, तर शेख अबरार शेख, शोएब असीम पठाण व अबुबुकर आरिफ शेख हे जखमी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत तरुणाच्या नातेवाइकांची समजूत घातली. पोलीस यंत्रणा वैजापुरातच अडकून पडल्याने तपासावरही परिणाम होतो. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी समजूत घातल्याने मृतदेह स्वीकारण्यात आला. सायंकाळच्या सुमारास शवविच्छेदन करून मृतदेह सुपूर्द केला. किरकोळ वादातून चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. रात्रीच खंडाळा गावात पोहोचून आढावा घेतला. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक