औरंगाबाद: दुचाकीवरून दोन बहिणींसह कंपनीत निघालेल्या भावाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी वाळूंज औद्योगिक क्षेत्रातील एनआरबी चौकाजवळ घडली. अनिता कचरू लोखंडे (२२), दीपक कचरू लोखंडे (२०) व निकिता उर्फ राणी कचरू लोखंडे (१८ सर्व रा. आसाराम बापू नगर, रांजणगाव), अशी अपघातात ठार झालेल्या भावंडांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, रांजणगाव येथील दीपक लोखंडे हा गुरुवारी सकाळी त्याची बहीण अनिता व निकिता या दोघींना दुचाकी (एमएच २१ एएम ६९९५) वरून वाळूंज एमआयडीसीतील रेणुका ऑटो कंपनीत सोडण्यासाठी निघाला होता. एनआरबी चौकाजवळील कार्तिकी हॉटेल समोर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच ०४ एफ जे -५२८८) दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तिघांचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून तिघांनाही घाटी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूंज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2022 रोजी प्रकाशित
अपघातात तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू
दुचाकीवरून दोन बहिणींसह कंपनीत निघालेल्या भावाचा अपघातात जागीच मृत्यू झाला.
Written by बिपीन देशपांडे
औरंगाबाद

First published on: 24-11-2022 at 21:08 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three siblings died in the accident near nrb chowka in industrial area ysh