– शेफ यशोधन देशमुख

आठवड्यातील किमान दोन दिवस कमीतकमी कर्बोदके आणि चांगल्या प्रमाणात प्रथिने आणि फायबरयुक्त आहाराचे सेवन केल्यास अशा उपवासाचा आपल्या आरोग्याला आणि पर्यायाने वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच फायदा होईल. श्रावण आणि उपवास हे एक जणू समीकरणच आहेनाही का पण एवढे सारे उपवास श्रावणातच का? आणि उपवास केल्याने नक्की फायदा होतो की तोटा? कारण आपल्याकडे सध्या एकादशी आणि दुप्पट खाशी असंच सगळीकडे चाललंयअसो. श्रावणातील परंपरांना अध्यात्माबरोबरच शास्त्रीय आधारही आहेच आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत…

खरं तर उपवास म्हणजे काय, इथूनच सुरुवात करायला हवी. उपवास म्हणजे लंघन. म्हणजे आपल्या पचन संस्थेला दिलेली विश्रांती. श्रावणात उपवास आणि व्रतवैकल्यं मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यालाही एक कारण आहेच. श्रावण महिन्यात जेव्हा शेतीची कामे पूर्ण करून शेतकरी विसावलेला असतो, त्यावेळी अंगमेहनतीची कामे कमी झालेली असतात आणि त्यामुळे साहजिकच शरीराची ऊर्जेची  गरज ही कमी झालेली असते. अशा काळात उपवास किंवा लंघन केल्याने पचन संस्थेला आराम तर मिळतोच, पण त्याचबरोबरच चयापचय क्रिया मंदावल्याने शरीरात अतिरिक्त मेद साठण्याचीही शक्यता वाढते. म्हणून मग अशा वेळी हलका आणि प्रथिनयुक्त आहार घेतल्यास त्याचा फायदा निश्चितच होतो.

सध्या उपवासाच्या नावाखाली साबुदाणा, बटाटा, रताळी आणि साखर अशा कर्बोदकांच्या सेवनाची नुसती भरभराट दिसते आहे. त्यामुळे उपवासापासून जो फायदा होणे अपेक्षित असतो, तो न होता तोटाच वाट्याला येत आहे. दुर्दैवाने, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत उपवासाला आपण फक्त पारंपारिक अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच बघतो आणि मग जबाबदारी असल्याप्रमाणे श्रावणी सोमवारसारख्या एखाद्या विशिष्ट दिवशी अगदी ठरवून साबुदाण्याची खिच़डीसारखा विशिष्ट  पदार्थच खातो. त्यापेक्षा, जर असंच ठरवून जबाबदारीने आठवड्यातील किमान दोन दिवस कमीतकमी कर्बोदके आणि चांगल्या प्रमाणात प्रथिने आणि फायबरयुक्त आहाराचे सेवन केल्यास अशा उपवासाचा आपल्या आरोग्याला आणि पर्यायाने वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच फायदा होईल. चला तर मग, आज बघूया एक आरोग्यदायी उपवासाची रेसिपी.

लाल भोपळ्याची कटलेट्स

साहित्य – २५० ग्रॅम किसलेला लाल भोपळा, २ हिरवी मिर्ची, १/२ चमचा काळी मिरी पूड, १/२ वाटी शिंगाड्याचे पीठ, १/२ चमचा जिरे, २ चमचे तूप, १/२ वाटी शेंगदाणा कूट, चवीनुसार मीठ

कृती – एका कढईत १ चमचा तूप गरम करावे. त्यात  जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिर्ची आणि किसलेला लाल भोपळा टाकून २ मिनिटे व्यवस्थित परतून घ्यावे. आता त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि शेंगदाण्याचे कूट घालून व्यवस्थित परतावे आणि २ मिनिटे झाकण ठेऊन शिजू द्यावे. आच बंद करून त्यात शिंगाड्याचे पीठ टाकावे आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.  मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर कटलेट बनवावी आणि तव्यावर तूप गरम करून त्यावर खरपूस भाजून घ्यावीत आणि गरमा गरम सर्व्ह करावे.

लागणारा वेळ १५ मिनिटे

 साधारणपणे साहित्य १० कटलेटसाठी