दिलीप ठाकूर

म्हटलतं तर हा आपल्याकडील तर झालेच, पण जगभरातील कोणत्याही भाषेतील चित्रपटाचा एक नवा विक्रम ( अथवा उच्चांक) ठरावा, एकाच शुक्रवारी तब्बल नऊ मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झालेत. लकी, भाई उत्तरार्ध, रेडीमिक्स, धरपकड, प्रेमवारी, प्रेमरंग, आसूड, १० वी आंणि उनाड मस्ती असे ते नऊ चित्रपट आहेत.

अशा गोष्टीवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे अगदी स्वाभाविक आहे, कोणी म्हणाले मराठी चित्रपटाची निर्मितीच इतकी आणि अशी वाढलीय की एकादा शुक्रवार असा येणारच होता, तर कोणी म्हणाले दक्षिणकडे कसे खूप अगोदर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखेचे नियोजन होते, तसे आपल्याकडे का होत नाही ( अथवा कधी बरे होणार?) वगैरे बरेच काही यानिमित्ताने बोलले जातेय. अर्थात, अशा चर्चांतून खरंच काही निष्पन्न होत नसतेच.

एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, मराठी चित्रपटाची एकूणच निर्मिती अशी आणि इतकी बेफाट वाढलीय की वर्षभरात चित्रपटाचे शतक ओलांडणे सहज शक्य झालेय. एक आठवण म्हणून सांगतो, १९९७ साली, संपूर्ण वर्षभरात बहिणी बहिणी, कमाल माझ्या बायकोची, सरकारनामा, त्याग, सून माझी लाडकी, सडा हळदी कुंकवाचा आणि साखरपुडा असे मोजून सात मराठी चित्रपट सेन्सॉर संमत झाले आणि एकूणच मराठी चित्रपटांचे भवितव्य काय असा मोठाच प्रश्न निर्माण झाला. तो एक प्रकारचा सुका दुष्काळ होता म्हटलं तर आता जे निर्मितीचे अफाट पीक आलेय तो ओला दुष्काळ म्हणावा लागेल. आणि तो इतक्यात ओसरेल असे निदान आगामी चित्रपटाच्या संख्याबळावरुन तरी वाटत नाही. पूर्वी मराठी चित्रपटाच्या निर्मितीची प्रमुख केन्द्रे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असत. आता राज्याच्या इतर भागातूनही मोठ्याच प्रमाणात मराठी चित्रपट निर्माण होत आहेत. आणि त्यातील बरेचसे चित्रपट मुंबईवगळता उर्वरित भागात प्रदर्शित होतात. काही तर चक्क तेथे यशस्वीही ठरतात. प्रेमा किरणची भेट होताच अशा ग्रामीण भागात निर्माण होऊन तेथेच गर्दी खेचणारे चित्रपट कोणते ते समजतात. काही चित्रपट तर म्हसवड, शिखर शिंगणापूर, देऊळगावराजा अशा अनेक जत्रात तंबू थिएटर्समध्येच रिलीज होतात. यालट, काही मराठी चित्रपट देशाच्या तर झालेच पण विदेशातील चित्रपट महोत्सवात दाद मिळवतात, पण ते कधी बरे प्रदर्शित होणार हे कोणालाच सांगता येत नाही. कोती, क्षीतिज अशी याबाबत बरीच नावे घेता येतील. या विषयाला बाजू अनेक. तरी कोणती बाजू घ्यायची असा प्रश्न पडावा.

मराठीत निर्मिती वाढण्याची कारणे अगणित दिसतात / असतात.

‘सैराट ‘ यशाच्या प्रेरणेतुन अनेक ग्रामीण प्रेमकथा जन्माला आल्या. याच ‘सैराट’ने शंभर कोटीची घसघशीत कमाई केली या वृत्ताचाही अनेकांवर प्रभाव आहे. आपला दोन कोटीचा चित्रपट शंभर जाऊ दे, किमान दहा कोटीचा सहजच गल्ला जमवेल अशा आशेने खूपजण निर्माते झाले. तसेच ग्लॅमरस इव्हेन्टस वगैरेने मराठी चित्रपटाचे एकूणच फिल गुड वातावरण असल्याने एकाद्या चुंबकासारखे अन्य व्यावसायिक या क्षेत्रात येतात.

निर्मितीची ही वाढ होणारी कारणे तशी विविधरंगी, विविधस्पर्षी.

मराठी चित्रपट ऑस्करसाठीच्या आपल्या प्रवेशिकेत स्थान मिळवू शकतो, राज्य शासनाच्या कृपेने कान्स चित्रपट महोत्सवात मार्केट विभागात दाखल होऊ शकतो, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत बाजी मारु शकतो, भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफीत भारतीय पॅनोरमात स्थान मिळवू शकतो अशाही काही कारणास्तव मराठीत निर्मिती वाढलीय. ‘…. आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर ‘ आणि ‘ठाकरे ‘च्या यशाने आता बायोपिकला पसंती वाढलीय.
कोणाचे लहानपणापासूनचे चित्रपट निर्मितीचे स्वप्न असते, कोणाला ग्लॅमरचे आकर्षण, तर कोणी भरपूर पैसा आहे तर चित्रपट निर्मितीचा अनुभव घ्यावा म्हणून येते. प्रियांका चोप्रा वगैरे हिंदी स्टार हिंदीच्या तुलनेत मराठीचे बजेट आणि व्यावसायिक धोका कमी म्हणून येते. तर कोणी, महाराष्ट्राने आपल्याला खूप काही दिलेय, त्याची परतफेड म्हणून मराठी चित्रपटाची निर्मिती करते.

‘श्वास ‘( २००३) पासून मराठी चित्रपटाच्या निर्मितीला उर्जितावस्थता आली हा कौतुकाचा मुद्दाही एव्हाना गुळगुळीत वाटावा अशी ही चौफेर वाढ आणि वाटचाल आहे. अर्थात, जगातील कोणत्याही भाषेतील सगळेच चित्रपट उत्कृष्ट दर्जाचे नसतात. सर्वोत्कृष्ट, उत्तम, साधारण बरे आणि वाईट अशीच वर्गवारी असते आणि तोच अलिखित नियम मराठीला आहे, आणि सगळेच चित्रपट गल्ला पेटीवर यशस्वी ठरत नसतात. मग एकाद्या शुक्रवारी एकच चित्रपट प्रदर्शित झाला म्हणजे यश हमखास असे नसते.

बरं, एकूणच वर्षभरात मराठीत फक्त बारा चौदा चित्रपट यशस्वी ठरतात, तरीही ही निर्मितीची लाट ओसरत नाही हे एक प्रकारचे जणू कोडे वा रहस्यच झालयं. अनेक निर्माते एकच चित्रपट निर्माण करुन पुन्हा आपल्या व्यवसायात परततात आणि परत नवे निर्माते येताहेत. हे चक्र थांबणे सोपे नाही. या सगळ्यातून कलाकारांचे मानधन वाढले, जीवनशैली उंचावली असा एक निष्कर्ष काढला जातो. पण त्यात गैर काय? ऐंशीच्या दशकात मराठी स्टार्स चक्क एशियाड बसने पुण्याला तर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला ये-जा करत आणि ते पाहून प्रेक्षक वृत्तपत्रात वाचकांच्या पत्रात ते लिहित. वाढत्या निर्मितीने अधूनमधून युरोपात मराठी चित्रपटाचे शूटिंग होते याचा काही आनंद/अभिमान वाटायला हवा की नको?

एकदमच नऊ चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांचा गोंधळ उडणार नाही का असा एक भावनिक प्रश्न आहेच. पण आपण कोणता चित्रपट पाह्यचा याबाबत आपण कमालीचे सुज्ञ व जागरुक आहोत, याचा छानसा प्रत्यय काही वेळा प्रेक्षक देतातच, याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान’ला पूर्णपणे नाकारुन ‘… आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर ‘ला उत्फूर्त प्रतिसाद दिला यावरून दिसले.

असो. पूर्वी दक्षिणेकडील प्रत्येक प्रादेशिक भाषेत प्रत्येक वर्षी शंभरपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होत तेव्हा आपण त्याकडे डोळे विस्फारून म्हणायचो, मराठीत असे कधी बरे होणार? मराठी चित्रपट गरीबच राहणार काय? आता मराठीत तेवढेच चित्रपट निर्माण होऊ लागताच ते चांगले की वाईट याचे उत्तरच मिळेनासे झालेय. यावर एकच मोठे उतर आहे, एकाच शुक्रवारी तब्बल पाच/सात/नऊ असे कितीही चित्रपट प्रदर्शित होऊदेत, आपण कोणते आणि किती चित्रपट पाह्यचे याचा योग्य निर्णय घेण्यास प्रेक्षक सुज्ञ आहेत. ते गोंधळून वगैरे वगैरे जाणारे असते तर त्यांनी अतिशय पडत्या काळातही मराठी चित्रपटाला साथ दिलीय. विशेषतः ‘माहेरची साडी ‘( १९९१)चे खणखणीत यश ते ‘श्वास ‘ ( ०३) या काळात मराठी चित्रपटाचा प्रवास खूपच अडखळता होता , पण प्रेक्षकांनी मराठीवरचे प्रेम जराही कमी होऊ दिले नाही. आणि आताच्या ‘ चित्रपटाच्या गर्दी ‘तही ते तीच साथ कायम ठेवतील. खरी गरज, निर्मितीची नव्हे तर दर्जा उंचवण्याची व तो कायम ठेवण्याची आहे….