Goa Statehood Day : दि. ३० मे. गोवा घटकराज्य दिन (गोवा स्टेटहूड डे) म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच दि. १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा करण्यात येतो. दोन स्वातंत्र्य दिन असणारे भारतातील गोवा हे एक राज्य आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यामध्ये दोन वेळा गोवा स्वातंत्र्य दिन का साजरा करण्यात येतो आणि गोव्याचा संघर्षमय इतिहास काय आहे, हे जाणून घेणे उचित ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कहाणी गोवा राज्याची…

गोवा राज्य भारतातील तसेच विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. परंतु, गोवा हे राज्य म्हणून स्थापन होण्यासाठी त्यांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. दि. १९ डिसेंबर, २०२१ मध्ये गोवा राज्याने आपल्या स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा केला. तसेच, ३० मे, २०२३ रोजी गोवा ३६ वा स्थापना दिन उर्फ घटकराज्य दिन साजरा करत आहे. १९ डिसेंबर आणि ३० मे हे दोन दिवस गोव्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.

हेही वाचा : विश्लेषण : दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून कवी मोहम्मद इक्बाल यांना वगळण्याची शक्यता ? कोण आहेत मोहम्मद इक्बाल ? त्यांना ‘पाकिस्तानचे जनक’ का म्हटले ?

गोवा मुक्ती दिन

गोवा मुक्ती संग्राम हा ‘ऑपरेशन विजय’ म्हणून ओळखला जातो. ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत गोवा आणि दीव-दमण हे प्रदेश स्वतंत्र झाले. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वतंत्र झाल्यावरही पोर्तुगीज भारतातील मुक्काम सोडण्यास तयार नव्हते. धर्मांतरणे, मंदिरांचा होणारा विध्वंस, हिंदू हत्याकांड, मूर्तिभंजन, पोर्तुगीजांचे वर्चस्व याला गोव्यातील जनता कंटाळली होती. त्यांचा वाढता आडमुठेपणा पाहून भारत सरकारने पोर्तुगीजांप्रति असणारी आपली सामंजस्याची भूमिका बदलली. १९५३ पासून पोर्तुगालशी असलेले राजनैतिक संबंध थांबवले. १९४६ पासून डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सुरू केलेले आंदोलन १९५४ पासून अधिक तीव्र झाले. पोर्तुगीजांच्या साम्राज्यवादी भूमिकेच्या विरोधात जागृती करण्याचे काम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले. गोव्याचे शांततापूर्ण मार्गाने हस्तांतरण होण्यासाठी सत्याग्रहींनी गोव्यामध्ये प्रवेश करावा, असे ठरले. त्यानुसार ऑगस्ट १९५५ मध्ये सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी, नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यामध्ये शिरल्या. या अहिंसक सत्याग्रहींवर पोर्तुगीज पोलिसांनी अमानुष गोळीबार केला. काहींना अटक करून अंगोला व लिस्बन येथील तुरुंगात पाठवून दिले.
शांततापूर्ण आंदोलनावर पोर्तुगीजांनी केलेला हल्ला बघून क्रांतिकारी पक्षाने सशस्त्र आंदोलन करायचे ठरवले. गोवा मुक्ती सैन्याची स्थापना शिवाजीराव देसाई यांनी केली. ते भारतीय सैन्यातील अधिकारी होते. अनेक बॉम्बस्फोट करून त्यांनी पोर्तुगीजांना जेरीला आणले. ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत भारतीय सैन्याच्या मदतीने गोवा, दीव-दमण प्रदेशांनी संघर्ष केला. गोवा या राज्याला दि. १९ डिसेंबर, १९६१ रोजी पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. या दिवशी भारतीय सेनेने पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त केले. तसेच या दिवशी भारत युरोपियन राजवटीपासून पूर्णपणे मुक्त झाला होता. १९ डिसेंबर रोजी पोर्तुगीज सरकारने भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली आणि रात्री ८ वाजता पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासाल द सिल्वा यानी शरणागती पत्रावर सही केली.

हेही वाचा : विश्लेषण : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शुद्धीकरणावरून शाब्दिक चकमक; ही ‘शुद्धता’ नेमकी आली कुठून ?

‘गोवा स्थापना दिना’चा इतिहास

गोव्याच्या इतिहासात ३० मे, १९८७ हा दिवस संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यामुळे महत्त्वपूर्ण ठरला. १९ डिसेंबर, १९६१ मध्ये गोवा राज्य पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाले असले, तरी भारत सरकारने त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. निदान दहा वर्षे तरी केंद्राच्या अखत्यारीत गोव्याचा राज्यकारभार चालेल असे ठरवण्यात आले, त्यानंतर गोव्‍याला स्‍वतंत्र राज्‍याचा दर्जा देण्‍यात येईल, असे आश्वासन जवाहरलाल नेहरू त्यांनी दिले होते. ऑक्टोबर १९७६ मध्ये पुरुषोत्तम काकोडकर यांनी लोकसभेत गोवा स्वतंत्र राज्य व्हावे, हे विधेयक सादर केले. त्यानंतर ४ एप्रिल, १९७७ रोजी एदुआर्दो फालेरो यांनी लोकसभेत पुन्हा हा मुद्दा चर्चेत आणला. गोव्‍यापेक्षा कमी लोकसंख्‍या असलेल्‍या ईशान्‍य भारतातील प्रदेशांना राज्‍याचा दर्जा मिळाला असून, गोव्यालाही स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, असा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. परंतु, लहान आकाराच्या राज्याच्या निर्मितीबद्दल केंद्र सरकारने फार अनुकूलता दर्शवली नाही. नंतर फालेरो यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीसमोर हा मुद्दा आणला. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी राजभाषेबाबत प्रश्न उपस्थित केला. गोव्याची एक राज्यभाषा मान्य होणे हे आव्हानात्मक होते. १९ जुलै, १९८५ रोजी राजभाषा १४ जानेवारी, १९८५ रोजी कोंकणी ही गोव्याची राजभाषा व्हावी आणि गोवा हे स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण व्हावे, यासाठी खासगी विधेयक मांडण्यात आले. परंतु, तत्कालीन काँग्रेस सरकारने हे विधेयक फेटाळून लावले. परिणामी कोंकणी भाषाप्रेमींमध्ये चीड निर्माण होऊन त्यांनी आंदोलन केले.जवळजवळ ५७३ दिवसांच्या या भाषिक संघर्षानंतर ४ फेब्रुवारी, १९८७ रोजी कोंकणी गोव्याची राजभाषा म्हणून संमत झाली. त्याच वर्षी ३० मे, १९८७ रोजी गोवा हे केंद्रशासित प्रदेशातून मुक्त होऊन भारताचे २५ वे राज्य बनले.

भारत स्वतंत्र झाल्यावरही गोवा राज्याला स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावाच लागला. १९ डिसेंबर, १९६१ मध्ये पोर्तुगीजांपासून मिळालेले स्वातंत्र्य आणि ३० मे, १९८७ मध्ये केंद्रशासित प्रदेशातून मिळालेले स्वातंत्र्य आणि घटकराज्याची झालेली निर्मिती यामुळे गोवा राज्य दोनदा आपले स्वातंत्र्य दिन साजरे करते.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does goa state celebrate two independence days what is the history behind goa becoming independent twicevvk
First published on: 30-05-2023 at 15:11 IST