महापालिकेतील दहा घोटाळ्यांची ‘काळी पत्रिका जाहीर करण्याची घोषणा करणाऱ्या किरीट सोमय्या यांना शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी तुम्ही काळी पत्रिका काढाच, त्यात तुमचेच तोंड काळे होईल असे आव्हान दिले आहे. तसेच 'नगरविकास विभाग हा मुख्यमंत्रयाकडे आहे, महापालिकेत घोटाळे झाले असतील, तर त्याला जबाबदार कोण, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे,' अशी मागणीही शेवाळे यांनी उपस्थित करीत भाजपवर पलटवार केला. त्यामुळे युती तुटल्यानंतर शिवसेना भाजपमधील आरोप प्रत्यारोपाचा संघर्ष अधिकच तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेवर केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. 'महापालिकेचे प्रमुख आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात. प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीवर आयुक्त आणि अर्बन डेव्हलपमेंट विभाग आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे. तर त्याला जबाबदार कोण?, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली. 'रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांवर चार्जशीट दाखल झाल्या आहेत. मात्र त्यांचे कोट्यावधींचे पैसे अजून महापालिकेने वितरित केले नसल्याने घोटाळा झाला', असा आरोप सोमय्या करत आहेत. कचरा घोटाळ्यातील आरोपींकडून भाजपच्या कार्यक्रमांना स्पॉन्सरशिप मिळाल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे. मिठी नदी आणि माहुल गावातील अनधिकृत बांधकामाबाबत जनहित याचिका किरीट सोमय्या यांनी दाखल केली. मात्र त्याचं पुढे काय झाले, कोणालाच माहित नाही, असेही शेवाळे म्हणाले. 'आतापर्यंत किरीट सोमय्या हे माफियाराज संपवणार, असे फक्त म्हणत होते. मात्र माफिया कोण हे सांगत नव्हते. आता आम्ही माफियांचे नाव सांगतो. गृहखाते असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी,' अशी मागणी शेवाळेंनी केली. 'सोमय्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. हिंमत असेल तर आम्ही सांगितलेल्या माफियांवर कारवाई करून दाखवावी,' असे आव्हानदेखील शेवाळे यांनी दिले. मुंबईतील कंत्राटदारांचे नावे पुरोहित आणि शाह आहेत. या नावाची लिंक कुठल्या पक्षात आहे आणि त्यांचे काय संबंध आहेत, हे शोधून काढावे. हे सर्व कंत्राटदार एकाच राज्यातील, एकाच जिल्ह्यातील, एकाच तालुक्यातील आहेत. त्यांच्या गावापासून सरपंच ते आमदार, खासदार सर्व भाजपचे आहेत,' असेही शेवाळे म्हणाले. 'पारदर्शी कारभाराबाबत आम्हाला बोलत आहात, पण पहिल्यांदा पारदर्शकता शब्द बोलायला शिका,' असा टोलाही शेवाळे यांनी किरीट सोमयया यांना लगावला. किरीट सोमय्या यांनी टँकर घोटाळ्याचा आरोप केला. मात्र त्यांच्याच मतदासरसंघात शिवाजी नगरमध्ये टँकरने पाणी पुरवण्याबद्दल सोमय्या यांच्या सह्यांचे पत्र आहेत.