मुंबई : गेल्या दोन वर्षांत प्राथमिक बाजारातून विक्रमी निधी उभारल्यानंतर नवीन वर्षात जागतिक प्रतिकूल परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरतेमुळे बहुतांश कंपन्यांना प्रारंभिक समभाग विक्री योजना (आयपीओ) लांबणीवर टाकण्यास भाग पाडले. परिणामी २०२३ च्या जानेवारी महिन्यात कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीतून केवळ ४७८ कोटी रुपयांची निधी उभारणी केली.

जानेवारी २०२३ मध्ये केवळ १२ कंपन्यांनी आयपीओ बाजारात आणले. त्यापैकी केवळ दोन कंपन्यांनी मुख्य बाजार मंचावर सूचिबद्धतेसाठी समभागांची विक्री करून ३२३ कोटी रुपये उभारले. तर १० कंपन्यांनी लघू आणि मध्यम उद्योगांसाठी असणाऱ्या ‘एसएमई मंचा’वर सूचिबद्धतेसाठी समभाग विक्री करून १५५ कोटी रुपयांचा निधी गोळा केला, अशी माहिती भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये उच्चांकी पातळीपासून १० टक्क्यांची घसरण झाली आहे. बाजारातील सध्याची ही अस्थिर परिस्थिती ‘आयपीओ’साठी अनुकूल नाही. मात्र तरीही आकर्षक किमतीचे ‘आयपीओ’ गुंतवणूकदारांना आकर्षित करतील, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही के विजयकुमार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच, सरलेल्या वर्षात (२०२२) ३८ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्री करून ५७,००० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला. तर त्याआधीच्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये ६३ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून १.२ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा केला होता. जे गेल्या दोन दशकांतील आयपीओसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले होते. गेल्या वर्षी भारतीय आयुर्विमा महामंडळाने आयपीओच्या माध्यमातून २०,५५७ कोटींचा निधी उभारला होता. परिणामी सरलेल्या वर्षात प्राथमिक बाजारातून निधी उभारणीचा एकत्रित आकडा ५७,००० कोटींपुढे सरकण्यास मदत झाली. याचबरोबर विद्यमान वर्षातील जानेवारी महिन्यात नऊ हक्कभाग विक्रीद्वारे (राइट इश्यू) ६४४ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. प्राधान्यक्रमाने समभाग वाटपाद्वारे (प्रीफरन्स इश्यू) ८२९ कोटी रुपये जमा करण्यात आले. मात्र या कालावधीत, एकही पात्र संस्थागत गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयपी) विक्रीची योजना बाजारात दाखल झाली नाही.