नवी दिल्ली : देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) २०४७ पर्यंत ३० लाख कोटी डॉलरवर नेण्याची कार्य योजना देशातील प्रख्यात बँकर उदय कोटक मांडली. देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मांडल्या गेलेल्या आराखड्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोटक यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. हेही वाचा >>> वित्तीय तूट वार्षिक अंदाजाच्या ५० टक्क्यांवर; नोव्हेंबरअखेर ९.०६ लाख कोटी रुपयांवर कोटक यांनी समाज माध्यम मंचावर ही कृती योजना मांडली आहे. त्यांच्या मते, देशातील बचतकर्त्यांचा ८० च्या दशकाच्या सुरूवातीला अतिशय कमी विश्वास वित्तीय मालमत्तांवर होता. त्यांचे प्राधान्य सोने आणि जमिनीला होते. नंतर हळूहळू लोकांचा कल बँकांच्या ठेवी, यूटीआय आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) वळू लागला. देशात ९० च्या दशकात भांडवली बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे सट्टाच मानला जात होता. त्यामुळे भांडवलाची गरज असलेल्या कंपन्या परकी संस्थात्मक गुंतवणूकदाराकडे जात. अतिशय कमी जणांना माहिती असणाऱ्या लक्झेम्बर्ग भांडवली बाजारातून कंपन्यांनी भांडवल उभे केले होते. या परिस्थितीत २००० सालाच्या सुरूवातीपासून बदलास सुरूवात झाली. म्युच्युअल फंड, भांडवली बाजार आणि वायदे बाजार, विमा फंड यासह इतर योजनांमुळे बचत करणारा वर्ग गुंतवणूकदार बनला. हेही वाचा >>> सरत्या २०२३ मध्ये गुंतवणूकदारांना २० टक्के परतावा; सलग आठवे वर्ष लाभाचे; शेवटच्या सत्रात मात्र घसरण कंपन्यांनी भांडवली बाजारात कमी खर्चातून भांडवल उभे करावे, कर विवाद भारताने टाळावेत, दुहेरी करपद्धतीच्या फायद्यांचा पुनर्विचार करावा, कमी खर्चिक वायदे वित्तीय बाजाराला धोके निर्माण करू शकत असल्याने त्याकडे लक्ष द्यावे, बचतकर्ता गुंतवणूदार बनल्याने बँकांनी मध्यम कंपन्या आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांकडे वळावे, अशा शिफारशी कोटक यांनी केल्या आहेत. दरम्यान, कोटक यांच्या योजनेबद्दल केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तुमचा वित्तीय क्षेत्रातील अनुभव वाखाणण्याजोगा आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले आहे. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही कोटक यांच्या शिफारशींचे स्वागत केले आहे.