वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर जानेवारी ते मार्च तिमाहीत ६.९ टक्के राहण्याचा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने सोमवारी वर्तविला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) व्यक्त केलेल्या विकास दराच्या अनुमानापेक्षा तो कमी राहण्याचा अहवालाचा अंदाज आहे. सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकास दर ६.९ टक्के राहील, असा इक्राचा अंदाज आहे. तिसऱ्या तिमाहीत विकास दर ६.२ टक्के होता. याचवेळी एनएसओचे चौथ्या तिमाहीसाठी विकास दराबाबत ७.६ टक्क्यांचे अनुमान आहे. येत्या ३० मे रोजी चौथी तिमाही आणि २०२४-२५ आर्थिक वर्षाचे विकास दराचे आकडे जाहीर होणार आहेत.  

गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील खासगी उपभोग आणि गुंतवणुकीत अनिमयतिता दिसून आली आहे. आयात शुल्काशी निगडित अनिश्चिततेमुळे गुंतवणुकीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे २०२४-२५ आर्थिक वर्षात विकास दर ६.३ टक्के राहील, असे ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनएसओच्या सुधारित अनुमानानुसार, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी विकास दर ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनेही गेल्या आर्थिक वर्षासाठी ६.५ टक्के विकास दराचा अंदाज वर्तविला आहे. तर आधीच्या म्हणजेच २०२३-२४ आर्थिक वर्षात विकास दर ९.२ टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थसत्ता ठरली होती. त्याआधी २०२१-२२ मध्ये विकास दर ८.७ टक्के आणि २०२२-२३ मध्ये ७.२ टक्के होता.