मुंबई : मुंबईतील हिरे- आभूषण उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण असून येत्या काळात राज्यभरात या उद्योगाचा विस्तार होण्यासाठी लवकरच नवीन धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली. हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या चर्चेत सत्यता नसून उलट देशातील सर्वात मोठे एकात्मिक ज्वेलरी पार्क नवी मुंबईत उभे राहत असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

वांद्रे- कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स तसेच जेम्स अँड ज्वेलरी निर्यात आणि प्रबंधन कौन्सिलच्या (जीजेईपीसी) कार्यालयाला सामंत यांनी भेट देऊन या प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शहा, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, भारत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष मेहुल शहा, सब्यासाची राय आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला, ऑक्टोबरमध्ये गाठली आठ महिन्यांची नीचांकी पातळी

या उद्योग क्षेत्रातील मंडळींनी हिरे उद्योग मुंबईच्या बाहेर जाणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उद्योगांना आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहे. त्यांना उद्योग वाढीसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. व्यवसाय वाढीसाठी काही मंडळींनी दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ येथील व्यवसाय त्यांनी बंद केला असा होत नसल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : लॅपटॉप आयातीसाठी ११० कंपन्यांचे परवाने मंजूर; ॲपल, डेल, लिनोव्होसह इतर कंपन्यांचा समावेश

नवी मुंबईत महापे येथे देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क उभे राहत आहे. त्याठिकाणी किमान एक लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात इतर ठिकाणी व्यवसाय विस्ताराची भूमिका उद्योजकांनी मांडली आहे. निश्चितपणे त्यांना त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठीचे धोरण बनवले जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा : Gold-Silver Price on 2 November 2023: सोन्या-चांदीच्या दरामध्ये किरकोळ वाढ; काय आहे आजची किंमत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्न व आभूषण उद्योगाला अनुदान आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून जी मदत लागेल ती केली जाईल. एखाद्या व्यवसायाचे विस्तारीकरण म्हणजे स्थलांतर नव्हे, अशी स्पष्ट भूमिका सामंत यांनी मांडली. राज्य शासनाकडून हिरे उद्योगाला पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे शहा यांनी सांगितले.