मुंबई : केंद्र सरकारच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’च्या आयपीओने मंगळवारी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकडून १.९८ पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळविल्यानंतर बुधवारी खुल्या झालेल्या टाटा टेक्नॉलॉजीज आणि गांधार ऑइल रिफायनरी इंडियाच्या प्रारंभिक समभाग विक्रीलादेखील गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्राथमिक बाजाराच्या इतिहासात प्रथमच पाच कंपन्या गुंतवणूकदारांना अजमावत असून, ७,३०० कोटींचा निधी उभारण्याचा त्यांचा मानस आहे. टाटा समूहातील ‘रत्नां’पैकी एक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवारी सुरू होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये दुप्पट भरणा झाला. तर दिवसअखेर ५.७५ पट अधिक मागणी नोंदवण्यात आली. टाटा टेक्नॉलॉजीजकडून ‘आयपीओ’च्या माध्यमातून सुमारे ४.५० कोटी समभागांची विक्री करण्यात येणार आहे. मात्र २२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत खुल्या असलेल्या भागविक्रीच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांकडून ८.७३ कोटी समभागांची मागणी नोंदवली गेली. तर दिवसअखेर २५.८९ कोटी समभागांची गुंतवणूकदारांनी नोंदवली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शामध्ये जवळपास दुप्पट म्हणजेच ५.४२ पट भरणा झाला आहे. याचबरोबर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गवारींमध्ये अनुक्रमे ११.६९ पट आणि ४.०८ पटीने अधिक भरणा झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या प्रारंभिक समभाग विक्रीला सुकाणू गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुकाणू गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शातून ७९१ कोटी रुपये उभारण्यास योगदान दिले आहे. कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या भागासाठी १.१० पट, तर टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी राखीव हिश्शासाठी ९.३० पट अधिक भरणा झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या कर्मचाऱ्यांसाठी २०.२८ लाख समभाग आणि प्रवर्तक टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी ६०.८५ लाख समभाग राखीव ठेवले आहेत. टाटा समूहातील सध्या ध्वजाधारी असलेली कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा समभाग २००४ मध्ये बाजारात सूचिबद्ध झाला. त्यानंतर आता तब्बल १८ वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनी बाजारात सूचिबद्ध होणार असल्याने सर्वांचे तिच्याकडे लक्ष लागले आहे. ‘टाटा’ हे नाव जोडले गेल्यामुळे गुंतवणूकदारांकडून आणखी मोठा प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजीज’च्या आयपीओसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. कंपनीने भाग विक्रीसाठी प्रति समभाग ४७५ रुपये ते ५०० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ३० आणि त्यानंतरच्या ३० च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल. भागविक्रीतून कंपनीचा ३,०४२ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. गांधार ऑइल रिफायनरी इंडियाच्या ‘आयपीओ’लादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला असून दिवसअखेर ५.६६ पट अधिक भरणा झाला. कंपनीने ‘आयपीओ’साठी १६० ते १६९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. मुंबईस्थित कंपनीचा या माध्यमातून ५००.५६ कोटींहून अधिक निधी उभारण्याचा मानस आहे. बुधवारीच खुल्या झालेल्या फ्लेयरच्या ‘आयपीओ’लाही गुंतवणूकदारांकडून दुपटीहून अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळवला.