मुंबई: उत्तराखंड गुंतवणूक परिषदेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांबरोबर एक लाख कोटींच्या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मुंबईत सोमवारी केली. उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीला अत्यंत पोषक वातावरण असून याचा लाभ गुंतवणूक करणाऱ्या सर्व उद्योग-व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. उद्योजकांना उत्तराखंडमध्ये प्रकल्प गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याकरिता उत्तराखंड सरकारने मुंबईत ‘रोड शो’ आणि गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री धामी हे उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे उत्तराखंडमध्ये नोकरीच्या संधीत वाढ होऊ शकते. आतापर्यंत उत्तराखंडमध्ये या गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने एक लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार विविध उद्योगसमूहांनी केले आहेत. समाधानाची बाब म्हणजे परकीय गुंतवणूकदारही उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीस पुढाकार घेत आहेत. यासाठी आम्ही जाणीवपूर्वक काही बाबतीत सुधारणा केल्या, असे मुख्यमंत्री धामी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाेरणाचे अनुकरण आम्ही राज्यात केले असून उद्योगधंद्यांना व्यवसायसुलभ वातावरणास मदत करणे हे धोरण आम्ही अवलंबले आहे. त्यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबविली असून उद्योग स्थापन करण्यासाठी काही दिवसांत सर्व परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जातात. रस्ते, वीज, पाणी, वाहतूक यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर सरकारी जमीन उपलब्ध असून, त्याचा उद्योगधंद्यासाठी वापर केला जाणार आहे. याशिवाय राज्यात कामगार आणि मालक यांच्यातील तक्रारी सरकारच्या माध्यमातून सोडवल्या जातात. कामगार आणि मालक यांच्यातील चर्चेचा दुवा म्हणून राज्य सरकार भूमिका पार पाडत आहे. यामुळे राज्यात गुंतवणूकदारांच्या पाठीशी राज्य सरकार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये, या शब्दांत धामी यांनी उद्योजकांना आश्वस्त केले. येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी उत्तराखंड राज्यात ‘उत्तराखंड गुंतवणूक परिषद-२०२३’चे आयोजन केले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री धामी यांच्यासह उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव डॉ. एस.एस. संधू, सचिव डॉ. मीनाक्षी सुंदरम आदींनी मुंबईत उद्योगपती, व्यावसायिक यांच्या गाठीभेटी घेतल्या.